Wednesday, 30 April 2025

अक्षय नामाचा अक्षय आनंद

 || श्री स्वामी समर्थ ||



माणसाच्या इच्छा म्हणजे अथांग महासागर म्हंटला पाहिजे. कितीही संकटे येवुदेत मृत्यू कुणीही मागणार नाही . मला ह्या संकटातून सोडव म्हणतील म्हणजे पुन्हा जगणे आहेच . माणसाचा सर्वात जास्ती जीव हा त्याच्या स्वतःवर असतो आणि म्हणूनच मनुष्य जन्म दिला आहे तो सार्थकी सुद्धा लावता आला पाहिजे . असंख्य भौतिक सुखे आणि त्यांची तृप्तता , भोग ह्यात प्रपंच जणू हरवल्यासारखा भासतो तर परमार्थाचे काय ? तो तर दूर दुरचीच गोष्ट आहे. 

मनासारखे सर्व काही मिळणे म्हणजे आम्ही सुखी समाधानी असे समीकरण म्हंटले तर सुख सुद्धा दुरापास्तच म्हणावे लागेल आता . रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग असे जीवन जगणाऱ्या तुम्हा आम्हा भक्तांना अक्षय तृतीय हा दिन म्हणजे वाळवंटात मृगजळ म्हणावे लागेल. 

अक्षय म्हणजे अखंड . आणि इतर काही नाही पण नाम अखंड घेतले तर इतर गोष्टी आपोआपच आपल्या कडे येणार आहेत .मागणे उरणारच नाही पण आजकाल सबब आहे ती वेळ नाही. खरच चांगल्या गोष्टींसाठी आपल्याकडे वेळ नसतोच कधी . नामस्मरणाची लज्जत आणि त्याची अवीट गोडी चाखणे हे सुद्धा शेवटी भाग्याचेच लक्षण आहे आणि त्यासाठी मनाचा निर्धार , दुर्दम्य इच्छा शक्ती आणि संयम हवाच . हा त्रिवेणी संगम असेल तर अक्षय आनंदाच्या परामोच्च शिखरावर आपण पोहोचण्यास वेळ लागणार नाही .

मग त्यासाठी प्रत्यक्ष अक्कलकोट शेगाव ला गेले पाहिजे का? सहज जाता आले तर नक्कीच जायचे शेवटी स्थानाचेही वेगळे असे महत्व शास्त्रात सांगितले आहेच पण एखाद्याला गाडीभाडे परवडले नाही किंवा अन्य कुठल्याही कारणाने जाता आले नाही तर नामस्मरण करायचे नाही का . कि तिथे स्थानावर नाही गेलो तर आपली आपल्या सद्गुरूंशी भेट होणार नाही का? नामस्मरण न करायच्या ह्या सर्व सबबी पळवाटा आहेत . असो .

तिथे असाल तिथे प्रत्येक क्षणी नामस्मरण करा हेच अपेक्षित आहे. श्वास घेतो त्याचसोबत नाम घ्या . नामाचे वेड लागले पाहिजे. नित्याची कर्म करतो त्याचप्रमाणे प्रत्येक क्षणी नाम घेता आले पाहिजे इतक्या आपल्या चित्तवृत्ती नामात एकवटल्या पाहिजेत . उठता बसता नाम , जरी त्याचा अधे मधे विसर पडला तरी पुन्हा नमस्कार करून नाम घेत राहणे.  जमेल तसे पण घ्यायचे हाच आजचा अक्षय संकल्प करुया .

नामाची जादू अफाट आहे , सगळ्या प्रश्नांची ती गुरुकिल्ली आहे , मुक्तीचा महामार्ग आहे तो आणि म्हणूनच आयुष्यात काहीही झाले तरी चालेल पण नामाला पर्याय नाही . पुन्हा मी हे करतो ते करतो ...अजिबात नाही.

आज ह्या अक्षय तृतीयेच्या सुमुहूर्तावर “ मी “ हा आपल्या शब्दकोशातून जणू हद्दपार करण्याचा प्रयत्न करूया आणि उभे आयुष्य आपला प्रपंच सर्व काही त्यांच्या चरणी अर्पण करुया . मी पारायण केले मी हे केले मी महाराजांना चाफा आणला...सुटका करून घेवूया आजच्या सोनियाच्या दिनी ह्या “ मी “ तून .  महाराज माझ्याकडून सेवा करून घेत आहेत हेच वाक्य आता मुखात असुदे उर्वरित आयुष्यात , निदान तसे करण्या वागण्याचा प्रयत्न करुया . सोपे नाही ते कारण हा “ मी “ जन्मल्यापासून आपल्या सोबत आपल्याला घट्ट चिकटून बसलेला आहे. 

वऱ्हाड प्रांतातील आजचा विशेष खास दिवस आहे. संतशिरोमणी गजानन महाराज ह्यांच्या लीलांनी ह्या दिवसाला अनमोल असे महत्व प्राप्त झालेले आहे. आज घरोघरी महाराजांच्या अनमोल रसाळ “ श्री गजानन विजय ग्रंथाचे “ पारायण भक्त करत आहेत .

आपली भक्ती श्रद्धा , गुरूंच्या साठी असणारी तळमळ खरी असेल तर असाल तिथे जेवून प्रत्यक्ष महाराज भक्ताला दर्शन देतील ह्यात शंकाच नाही. दर्शनाची आस , आपल्या भेटीची ओढ जितकी अधिक तितके त्याचे फळ अधिक. महाराजांच्या  कडे काही मागण्यापेक्षा त्यांना मी एक चांगला माणूस कसा होवून दाखवीन , समाजासाठी चांगले काम मी कसे करीन ह्या साठी आज प्रत्येक भक्ताने प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे. हे सुद्धा सेवेपेक्षा कमी नाही . 

जे काही चांगले काम आणि विचार सुद्धा जसे आजपासून मी लवकर उठीन सकाळी ६ वाजता सूर्याला अर्घ्य घालीन , रोज निदान एक तरी अध्यायाचे वाचन करीन , रोज नित्य नामस्मरण करीन , आपली जी काही उपासना आहे त्यात आपले चित्त एकरूप करण्याचा प्रयत्न करीन निदान इतके केले तरी खूप झाले. हळूहळू आयुष्य बदलू लागेल , अक्षय आनंदाने आयुष्य जगावेसे वाटेल . आजच्या दिवसाला विशेष असे महत्व आहे त्यामुळे आज केलेली कुठलीही सेवा पुण्य पदरात घालील ह्यात दुमत नाही.

तुमच्या आमच्या सर्वांच्याच आयुष्यात जे जे काही आनंद देणारे आहे ते अक्षय राहावे हीच श्री गजानन महाराजांच्या चरणी प्रार्थना .

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230


Sunday, 27 April 2025

दशा स्वामीची रजामंदी -द्वितीय विवाह

 || श्री स्वामी समर्थ ||

गेल्या आठवड्यात एका स्त्री जातकाची पत्रिका पहिली. डिटेल पाठवल्यावर तिने २-३ वेळा फोन केला त्यावरून काय ते समजले. मी काय सांगणार ह्यासाठी तिचे कान जणू आसुसले होते .  नैसर्गिक आहे कारण आपण फार सामान्य माणसे आहोत . एक अपत्य पदरात आणि द्वितीय विवाहाचा प्रश्न म्हणजे थोडी नागमोडी वाट. 

आयुष्याच्या मध्यात जोडीदार अचानक कुठल्याही कारणाने सोडून गेला मग ती स्त्री असो अथवा पुरुष त्यांना सहवास , आर्थिक प्रश्न आणि उरलेले आयुष्य व्यतीत करण्यासाठी गरज असते ती जोडीदाराची आणि ह्या अनेक अनुषंगाने द्वितीय विवाहाचा विचार करावा लागतो. पण तो व्यवस्थित होणार असेल तर आणि तरच करण्यात अर्थ आहे नाहीतर ज्या ज्या गोष्टीसाठी विवाह करायचा त्याच मिळणार नसतील आणि पुन्हा दुसरा घटस्फोट किंवा आयुष्यातील सगळी शांतता पणाला लागणार असेल तर आहे हीच स्थिती बरी म्हणायची वेळ येते म्हणून शांतपणे अभ्यास करूनच पुढे जाणे इष्ट ठरते.

ह्या जगात कुणीही एकटे नाही कारण आपल्याला आपले महाराज प्रत्येक क्षणी सांभाळत आहेत हि श्रद्धा हवी , आपण त्यांच्या लेकी आहोत आणि त्यांच्या सेवेत आहोत . 


असो वास्तव असे कि ह्या स्त्रीचा विवाह झाला तेव्हा दशास्वामी 2 आणि 7 ह्या भावाचे फळ देत असल्यामुळे विवाह झाला . पण विवाह पश्च्यात ३-४ वर्षांनी दशा बदलली आणि दशा स्वामी ने षष्ठ भावाची फळे जोरदार द्यायला सुरवात केली . आधीची दशा 2 7 भाव  देत होती तर आत्ताची 3 6. त्यामुळे पुढे न बोलणेच योग्य . ह्या दशेने फळ दिलेच घटस्फोटाचे . सद्य दशा खूप कालावधीची असणार आहे त्यामुळे ह्या दशेत द्वितीय विवाह होणे अशक्य . ओढून ताणून केलाच तर टिकणे अशक्य कारण पहिल्या विवाहाचे झाले तसेच कडबोळे दुसर्याचेही होणार हे निश्चित .

आजचे जग आणि पर्यायाने आयुष्य खूप वेगळे आहे. पूर्वी एकत्र कुटुंब नांदत असत त्यामुळे घरात अनेक माणसे वेगवेगळ्या पिढीतील होती . शेती असे, घरातील पैसा हा सर्वांसाठी असे त्यामुळे अश्या वेळी त्यात एखाद दुसरा माणूस सहज सामावून जाई. पण आता विभक्त कुटुंबे त्यात कमी  माणसे राहतात त्यामुळे अश्यावेळी चरितार्थ  चालणार कसा तसेच मानसिक आधार , सुरक्षितता आणि सगळ्यात मुख्य एकटेपणा अश्या अनेक बाजूंचा विचार करून व्यक्तीने दुसर्या विवाहाचा पर्याय निवडणे अयोग्य नाहीच आहे. कित्येक द्वितीय विवाह  हे प्रथम विवाहापेक्षाही उत्तम चालले आहेत पण त्यासाठी लागणारी ग्रहस्थिती अनुकूल हवी . ती नसेल तर आगीतून फुफाट्यात असे होयील. 

ज्या आनंदासाठी द्वितीय विवाह करावा तो आनंद देणारी दशा ह्या स्त्री जातकाला नाही त्यामुळे माझे उत्तर अर्थातच नकारात्मक होते . आपण आपले खरे सांगावे. चार दिवस वाईट वाटेल पण नंतर आहे ती स्थिती स्वीकारून व्यक्ती आयुष्याला सामोरी जायील. मी म्हंटले तुझ्या पदरात एक अपत्य आहे आता तो तुझा आधार बनेल आणि तू त्याचा . काही दिवस गेले कि तू सर्व स्वीकारशील . काळ कुणासाठी थांबत नाही . मनोधर्य खचून चालणार नाही . 

आहे हे असे आहे. प्रत्येकाच्या आयुष्यातील एखादा कोपरा रिकामा आहे म्हणून आपण जगणे सोडून देतो का?  नक्कीच नाही . आपण रडत राहिलो तर असलेले द्रव्य सुद्धा आजार पणावर खर्च होयील आणि त्यातून मग अधिक नवीन प्रश्न निर्माण होतील . 

ह्या अनुषंगाने एक सांगावेसे वाटते कि गुणमिलन करून ह्या गोष्टी कळतील का? तर नाही . दशा आत्यंतिक महत्वाच्या असतात हे पुन्हा पुन्हा नमूद करावेसे वाटते कारण त्याच घटनांना हिरवा कंदील देत असतात . आयुष्यातील पुढील काळात येणाऱ्या दशा काय देणार आहेत ? दोघांचे पटणार कि नाही ? एखादी व्यक्ती  वैफल्य ग्रस्त होते आणि व्यसनांच्या आहारी जाते  हे गुणमिलन नाही सांगू शकणार . म्हणूनच गुण आणि ग्रह मिलन व्यवस्थित करून घेतल्याशिवाय निर्णय घेणे चुकीचे ठरेल इतकेच सुचवावेसे वाटते.  जन्म आणि मृत्य हे पत्ते देवाकडे आहेत ते आपल्याला माहित नाही म्हणून जीवनात आनंद आहे . पण विवाहासाठी फक्त चालू असणारी दशा पाहू नका पुढील २५ वर्षाच्या दशा बघा त्यात आयुष्य मर्यादा , संतती , अपघात , व्यसने अनेक गोष्टी समाविष्ट आहेत .

आयुष्य सगळ्यांसाठी सोपे नसतेच पण कठीण सुद्धा नसते , मार्ग काढता येतो पण त्यासाठी ओढवून संकटे घ्यायची गरज खरच आहे का? तर नाही . त्या दोघांचे पटले नाही म्हणजे त्या दोन्ही व्यक्ती वाईट आहेत का? अजिबात नाही पण चुकीच्या दोन व्यक्ती एकत्र आल्या तर काय होणार ते ह्या उदा वरून समजेल. स्वभाव , दशा सर्व बघा आणि विवाहासाठी घाई करू नका . गुण मिलन ग्रहमिलनासाठी नक्कीच आग्रह धरा.

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230 




  


Friday, 25 April 2025

अंतर्मुख

 || श्री स्वामी समर्थ ||




“ स्वामींची सेवा करावी तरी कशी “ असा प्रश्न कित्येकांना नेहमीच पडतो आणि विचारलाही जातो . मी नामस्मरण करू कि पोथी वाचू ? मी स्मरण करू कि मानसपूजा करू ? कि सरळ अक्कलकोट ला जावून दर्शन घेवू ? सगळेच सहमत असतील असे नानाविध प्रश्नांची सरबत्ती केली जाते . 

मुळात स्वामींची सेवा करावी हा विचार मनात यायला सुद्धा त्यांची कृपा लागते. आपले पूर्वसुकृत सुद्धा बळकट असावे लागते तरच संत चरण लाभतील . सेवा करायची आहे हा एकदा का हा विचार मनात रुजला कि समजावे ह्या जन्मातील तुमची आणि स्वामींची भेट आता फार दूर नाही. एखाद्या देवतेची भक्ती करताना ह्याच देवतेची भक्ती मी का करत आहे ह्याचे कारण निदान स्वतःपुरते तरी मनात सुस्पष्ट हवे. ज्या देवतेची स्मरण करतो त्या देवतेबद्दल मनात प्रेम माया आणि श्रद्धा हवी , संपूर्ण शरणागत होवून समर्पित व्हावे मग बघा ते काय काय सेवा करून घेतील तुमच्याकडून.

अनेक जण गुरुवारी मठात जातात म्हणून मी जातोय का? देखावा करण्यासाठी लोकांना दाखवण्यासाठी जातोय का? कि तळमळीने ८.२३ ची ट्रेन चुकली तरी चालेल पण महाराजांचे दर्शन घेतल्याशिवाय दिवस नाही इतक्या आर्ततेने दर्शनाला जातो आहे ? प्रदक्षिणा घालायच्या म्हणून घालतोय कि कसे? हे सर्व प्रश्न आपल्यालाच विचारून बघा काय काय उत्तरे मिळत आहेत .हे प्रश्न विचारायला सुद्धा धाडस लागते .

आज प्रपंच करणे इतके कठीण झाले आहे , डोळ्यासमोर घरातील अनेक प्रश्न उभे असतात आणि त्यामुळे मन व्यथित होते . सतत भेडसावणारे भविष्य समोर नेहमीच आ वासून उभे असते , ह्या आणि अश्या कित्येक विचारांचा अतिरेक झाला कि शरीर आणि मन दोन्ही थकून जाते आणि मनासारखी सेवा घडत नाही असे मनच कौल देते .

हार तुरे पेढे काहीच नकोय त्यांना , ते भुकेले आहेत आपल्या एका क्षणासाठी . एक क्षण उभा राहा माझ्यासमोर तू मला आणि मी तुला प्रेमाने डोळेभरून बघू तरी इतकेच हवे आहे त्यांना . तो क्षण भरभरून दे आणि घे. त्या क्षणी इतर कुठलाही विचार मनात आणू नकोस इतकेच मागत आहेत ते आपल्या कडे . जीवनातील भौतिक सुखे हवीत पण मर्यादेत ती मागत राहिलो तर जीवन संपून जायील पण मागण्या संपणार नाहीत . आपल्या दोघात मागणे हे नकोच. हवे आहे ते प्रेम निस्वार्थी प्रेम. आणि त्याच प्रेमाची भूक आहे म्हणून महाराज सर्व भक्तांपाशी येत राहतात . खर सांगा प्रगट दिन असो अथवा इतर काहीही दिवसभरात इतकी सजावट , पै पाहुण्यांची सरबराई करताना एक क्षणभर तरी आपण त्यांचे होतो का ? क्षणभर तरी त्यांच्या चरणाशी विसावतो का? त्यांना डोळे भरून पाहतो का? त्यांचे असणे आपल्या वास्तूत अनुभवतो का? नाही खरच नाही. त्यांचे आपल्याजवळ असणे हेच तर आपले आयुष्य आहे. 

ते आहेत म्हणून चार लोक आपल्याकडे येत आहेत केवळ त्यांच्यासाठी , आपल्यासाठी नाही हे लक्ष्यात आले पाहिजे. ते आहेत म्हणून श्वास चालू आहे आणि ते आहेत म्हणूनच सर्व काही आहे . स्वामी सेवा करताना सर्व प्रथम अंतर्मुख झाले पाहिजे. जीवनाच्या नेमक्या कुठल्या टप्प्यावर महाराज मला भेटत आहेत . वयाच्या पंचविशीत कि पन्नाशी ओलांडल्यावर ? नक्की कधी ? अंतर्मुख व्हा आणि विचारा स्वतःलाच हे प्रश्न . जन्मापासूनच ते आपल्यासाठी खूप काही करत आहेत , आणि करत राहणार आहेत , मी काय करतो त्यांच्यासाठी हे महत्वाचे आहे .

अध्यात्म नेमके काय आहे? मला का ह्यात यावेसे वाटले ? कुणी किंवा कुठल्या प्रसंगाने भारावून ओढल्यासारखा आलोय मी ? कुणीं आणले कि मी स्वतः आलोय ? भास होत आहेत का त्यांचे ? जवळ असलेल्या त्यांच्या शक्तीची अनुभूती मिळतेय ? आजवर आयुष्य कसे गेले ? काय मिळवले आणि काय गमावले? सगळे लक्ख डोळ्यासमोर आहे एका क्षणात आयुष्याचा चित्रपट डोळ्यासमोरून जातोय आणि समजत आहेत आपण केलेल्या चुका , अपराध , केलेला आळस आणि अपमान, जे कधी आपण केले तर कधी आपले झाले. 

महाराजांचे अधिष्ठान आपल्या आयुष्यात नेमके कुठे , कसे आहे? नुसते स्वामी स्वामी करून होत नाही तर त्यांच्या आज्ञेत राहणे आणि त्यांचा शब्द खाली पडू न देणे हि तर खरच कसोटी आहे .

नामस्मरण सुरु झाले कि आपल्यातील दोष स्वतःलाच दिसायला लागतात आणि आपल्यात अंतर्बाह्य अनमोल असे परिवर्तन होते. देह सर्वत्र आणि आत्मा मन त्यांच्या चरणी अशी अवस्था प्राप्त होते . आपल्यातील अहंकार लोप पावू लागतो आणि देण्याची वृत्ती बळावते , घेणे मागणे अपोआप कमी होत जाते 

सततची जीवघेणी स्पर्धा आणि त्यात टिकण्यासाठी केलेला संघर्ष ह्यातून दोन सुखद क्षण गुरुपदी अनुभवणे हा खास अनुभव म्हणावा लागेल. 

आज मनुष्याने सर्व काही कमावले आहे पण मनाची शांतता घालवली आहे. सुखाची इतकी लालसा कि नेमके सुख गुरूंच्या चरणाशी आहे ह्याचाही जणू विसर भक्ताला पडावा इतकी आहे. 

अंतर्मुख व्हा दीर्घ श्वसन करा. श्वास हि एकमेव गोष्ट आहे ज्याकडे आपले संपूर्ण दुर्लक्ष आहे . आता त्याकडेच लक्ष्य देवून ध्यानस्थ व्हा आणि सर्व काही त्यांच्यावर सोपवा. तुमच्याकडून काय सेवा करून घ्यायची ते तेच ठरवतील नव्हे तो त्यांचाच अधिकार आहे. 

हम गया नही जिंदा है... ह्याची प्रचीती क्षणोक्षणी आहे. कुणाचीही ओंजळ रिती राहणार नाही इतके भरभरून सुख समृद्धी आपल्या ओंजळीत ते घालणार आहेतच त्यामुळे मागणे आता काहीच उरणार नाही . त्यांचा सहवास लाभणे , चांगले विचार मनात रुजणे , दुसर्याला मदत करायची बुद्धी होणे , सतत दुसर्याचा तिरस्कार , मत्सर ह्यातून निर्माण होतात ते फक्त दीर्घकालीन आजार आणि त्यापासून परावृत्त होणे ह्यासाठी आज मनापासून अंतर्मुख झालात तर तुमची आभाळा इतक्या  चुका आणि अपराध तुमचे तुम्हालाच दिसतील. 


काहीतरी कुठेतरी राहून गेले आहे . नक्की काय ते शोधा ..कुणाचे पैसे द्यायचे राहून गेले आहेत ( मुद्दामून कि अनावधानाने ) ?, कुणाचा अपमान केलाय ? कुणाची बदनामी केली आहे? कुणाची निंदा ? कुणाच्या दुख्खाला कारणीभूत ठरला आहात ? नक्की काय ? विचारा आपल्याच मनाला आणि बघा कशी सोळा नंबरी सोन्यासारखी खरी उत्तरे मिळतील आणि डोळे खाडकन उघडतील. आपल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आपल्याच पाशी आपल्याच कृतीत आहे . महाराज महाराज केले कि सर्व चांगले झाले पाहिजे. आळशी , एदोबे झालो आहोत आपण , जरा उतार नको आपल्याला सतत यश हवे आहे . हव्यास वाईट असतो . घर आहे पण मोठे हवे मग बंगला , अजून हवे अजून हवे हे हवे हवे न संपणारे आहे आणि आपण जीव तोडून ह्या हव्यासापोटी धावत आहोत . ज्या महाराजांच्या चरणाशी त्यांच्या सान्निध्यात आनंद आहे परमोच्च सुख आहे तिथे नको जायला आपल्याला कारण महाराजांच्या चरणाशी गाद्या गिरद्या , AC सर्व सुखाची साधने नाहीत उंची अत्तरे नाहीत कि मेजवानी नाही . पण आयुष्याच्या संध्याकाळी आपण शोधात असणारी शांतता मात्र त्यांच्याच चरणाशी आहे . आणि शेवटी ती शोधात आपण तिथेच पोहोचतो हे त्रिवार सत्य आहे .आज AC मध्ये झोपून रात्रीची झोप नाही . आपण सगळ्या जगाला फसवू पण आपल्या मनाला नाही . का झोप येत नाही कारण अनेक चुकीच्या कर्मांचे मणामणाचे ओझे आहे मनावर . माफी मग , सगळ्यांशी प्रेमाने वागा झोप नक्की येणार . मुळात आपले कुठेतरी चुकले आहे ते स्वीकारा . बस इतकेच करायचे आहे आपल्याला जे कठीण आहे. 

आज आपल्या गुरूंचा महानिर्वाण दिन आहे. स्वीकारा सर्व काही जे जे केले आहे मग ते चांगले वाईट काहीही असो , केलेल्या सर्व कृत्यांची जबाबदारी घ्या . कुणाला दुखावले असेल त्यांची माफी मग तरच महाराज सुद्धा माफ करतील. आणि त्यांच्या चरणी आपला प्रपंच वाहा . ह्यापुढे ते सांगतील ते आणि ते नेतील तिथे. बुद्धी देणारे तेच आहेत शेवटी करते आणि करवते सुद्धा ह्यावर दृढ निश्चय ठेवा आणि समर्पित व्हा. हाच तो क्षण ज्याने आपले जीवन कात टाकल्यासारखे बदलून जायील. आनंदाला बहार येयील आणि आशेला नवीन पालवी फुटेल. जीवन घडवण्यासाठी मिळालेली हि सुवर्णसंधी आहे आणि त्याचा उपयोग करून घेणे निव्वळ आपल्याच हाती आहे. 

दुषित कर्मे जीवनात पाठ सोडत नाहीत म्हणून कर्म करताना महाराजांचा चेहरा डोळ्यासमोर आला पाहिजे , त्यांना हे आवडेल का? हा प्रश्न सतत मनाला पडला पाहिजे आणि त्यानुसार आपले वर्तन असायला हवे. 

रागा लोभाच्या पलीकडे गेलेला आणि स्वतःशी अत्यंत प्रामाणिक राहणारा भक्त महाराजांच्या सेवेत निरंतर दाखल होतो ह्यात वाद नाही . पुण्यस्मरण म्हणजे अधिकाधिक स्मरण , सतत त्यांचा ध्यास , त्यांच्याच विचारात जीवन व्यतीत करणे म्हणजेच खरी सेवा .

श्री स्वामी समर्थ 

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230  


Monday, 21 April 2025

वंश

 || श्री स्वामी समर्थ ||


मध्यंतरी एका जातकाचा फोन आला प्रश्न होता संततीचा . त्यांना म्हंटले सून आणि मुलगा दोघांच्याही पत्रिका पाठवा त्यावर म्हणाल्या मुलाची कश्याला ? मुल सुनेला होणार तिची पुरेशी नाही का? येतंय ना लक्ष्यात .??? इथूनच सुरवात आहे. असो. मी त्यांना म्हंटले विवाह दोघांचा म्हणून अपत्यही दोघांचे म्हणून दोघांच्याही पाठवा. तसेच पुढे जावून सांगावेसे वाटते घटस्फोटा च्या सुद्धा केस मध्ये  दोघांच्या पत्रिका हव्यात शेवटी विवाह दोघांचा आहे. 

मुल स्त्री जन्माला घालणार त्यामुळे ते झाले नाही किंवा त्यात काही अडचणी आल्या तर अर्थात सर्व दोष स्त्रीचा हे पूर्वापार पासून आपल्या मनावर मेंदूवर जणू बिंबवले गेले आहे. शाळेपासून आपण शिकलो आहोत XX आणि XY गुणसूत्रे पण म्हणतात ना मागचे पाढे पंचावन्न. कितीही शिकलो तरी आपल्या पुरुष प्रधान संस्कृतीत पुरुष टेस्ट करायला सुद्धा तयार नसतात असे अनेकदा पाहायला मिळाले आहे . मध्यंतरी एक पत्रिका आली होती . त्या जातक स्त्रीने सांगितले कि काही प्रमाणात दोष त्यांच्या पत्रिकेत आहे आणि तो त्यांनी आणि मीही स्वीकारला आहे. क्षणभर मला काय बोलावे सुचेना , खूप प्रयत्न करून झाले होते देवाचे सर्व उपाय आणि IVF सुद्धा . मला त्यांच्या दोघांच्याही खरेपणाचे कौतुक वाटले . हि खरी जोडी असे अनेकदा मनात आले. एकमेकांच्यातील त्रुटी स्वीकारून ते संसार करत होते . किंतु परंतु बाजूला ठेवले होते . हे सर्व करायला पण किती मोठे मन लागते . असो

विवाह हा वंश वाढवण्यासाठी केला जातो हे वेगळे सांगायला नको. विवाह बंधनात अडकणे हे आयुष्यभराचे बंधन आहे पण त्यात गोडवा आहे. कुठल्याही गोष्टीना बंधन किंवा वेष्टण नसेल तर सर्वच बेधुंद होयील तसे होवू नये म्हणून शास्त्राने हे विवाह बंधनाचा संस्कार दिला आहे. 

जोडीदाराबद्दल प्रेम आदर असेल तर सप्तम फुलते आणि त्याची परिणीती पंचमातील फळ म्हणजेच संतती मिळण्यात होते . म्हणूनच पत्रिकेत सर्वात महत्वाचा आहे तो चंद्र मनाचा कारक ग्रह . एखाद्या स्त्रीला आणि पुरुषाला आत्यंतिक मनापासून अपत्याची जेव्हा ओढ लागते तेव्हा त्यांचा प्रणय खर्या अर्थाने फुलतो आणि गर्भ धारणा होते . गर्भ वाढवताना स्त्रीचे सुद्धा नवीन आयुष्य बहरत असते . घरातील सर्वांनी घेतलेली काळजी आणि आपल्या ह्यांनी क्षणोक्षणी दिलेली साथ स्त्रीला आणि पोटात वाढणाऱ्या गर्भाला सुद्धा सुखावत असते . 

आज संतती आणि संतती सौख्याबद्दल ज्योतिषीय दृष्टीकोनातून काही गोष्टी जाणून घेवूया .

सर्वांचे आयुष्य सारखे नसते . आपले क्षणभंगुर आयुष्य त्याच्या हाती आहे. आपल्याला काय द्यायचे आणि काय नाही ते तो ठरवणार आणि त्या त्या वेळेत ते देणार सुद्धा हा विश्वास आपल्याला जीवन जगायला पुरेसा आहे. पूर्वीचा काळ आता राहिला नाही तेव्हा अगदी वर्षाला पाळणा हलत असे . अनेकदा आजी आई आणि लेक तिघी बाळंतीणी असत .आता तसे राहिले नाही . एक झाले तरी पुरे म्हणायचे कारण आज जीवन घड्याळ्याच्या काट्यावर आहे. आर्थिक विवंचनेत अडकलेला माणूस कुठवर पुरा पडेल ह्याची भ्रांत आहे.

अनेकांना नको असतानाही अपत्ये होतात आणि अनेकांची अपत्यप्राप्तीची इच्छा अपूर्ण राहते. परमेश्वराच्या न्यायापुढे मनुष्य हतबल आहे हेच खरे . आपण कितीही आधुनिक झालो तरी अनेक गोष्टीत जुन्या रूढी तेच तेच धरून ठेवले जाते . गावातून , खेड्यापाड्यातूनच नाही तर अगदी शहरातून सुद्धा संतती सौख्य नाही म्हणून पत्नीला माहेरी धाडून दुसरा विवाह केलेल्या घटना आपल्याला ऐकायला मिळतात . स्त्रीचा दोष नसतानाही तिला संसारापासून बेदखल केले जाते . जग कुठे चालले आहे , मंगळावर चंद्रावर जाण्याच्या गप्पा मारणारे आपण ह्या भावनिक गोष्टीत कधी बदलणार आहोत ?

संतती होणे आणि संततीपासून सौख्य मिळणे ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत . संतती साठी अहोरात्र कष्ट उपसणाऱ्या आई वडिलांना म्हातारपणी मुले सरळ वृद्धाश्रमाची वाट दाखवतात . अश्यावेळी वाटते संतती साठी उपास तपास केले , पोटाला चिमटा घेवून हौस मौज बाजूला ठेवून मुलांना सर्व सुखे दिली पण आता त्यांना आपल्या पालकांचे ओझे वाटू लागले आहे. अशी संतती आपल्या निराशेला  कारणीभूत ठरते.

ज्योतिष दृष्टीकोनातून संतती म्हंटली कि पंचम भाव पाहावा लागतो अर्थात त्याआधी सप्तम कारण . सप्तम भावात त्या दोघांचे मनोमिलन झाले नाही तर पुढे सर्वच अटळ आहे. त्यामुळे पंचम भावातील राशी लग्न , पंचमाचे पंचम , अपत्य प्राप्तीसाठी गुरु , पंचम भावातील हर्शल नेप सारखे बाधा आणणारे ग्रह विशेष करून प्लुटो ह्या सर्वच अभ्यास करावा लागतो . घटना घडवणारा दशास्वामी आणि गोड बातमी देणारा अंतर्दशा स्वामी ह्यांची मंजुरी लागतेच . 

पंचमेश कुठल्या नक्षत्रात आहे तसेच पंचम भावावरील शुभ अशुभ ग्रहांच्या दृष्ट्या .  अपत्य जन्माला येण्याच्या वेळी असणारे गोचर भ्रमण सुद्धा विचारात घ्यावे लागते . पंचम पाप कर्तरी योगात असेल किंवा पंचम अशुभ ग्रहांनी दृष्ट असेल तर अडचणी येवू शकतात . पंचम भावातील बुधाच्या शनीच्या राशी किंवा बुध शनी अपत्य प्राप्तीस अडथळ्यांची शर्यत किंवा विलंब करतात . पंचमेश बुध किंवा सिंह राशीत असेल तरीसुद्धा अपत्य प्राप्तीमध्ये विलंब अडचणी येतात . पंचमातील जल तत्व हे संततीसाठी उत्तम असते. पत्रिकेतील शनी राहू , गुरु राहू , गुरु नेप युती सुद्धा वैवाहिक सुखावर परिणाम करणाऱ्या आणि पर्यायाने संतती सुखावर सुद्धा परिणाम करणाऱ्या असतात . 

प्रत्येक पालक आपल्या अपत्यासाठी त्याच्या सुखासाठी जीवाचे रान करतात. आपल्या जे जे मिळाले नाही ते त्यांना मिळावे ह्यासाठी आयुष्य पणाला लावतात . अश्यावेळी संतती कडून त्यांना कष्ट मिळतात तेव्हा काय अवस्था होत असेल ह्याचा विचार न केलेला बरा. संतती म्हणजे त्या दोघांच्या प्रेमाच्या वेलीवर बहरलेले हवेहवेसे वाटणारे सुंदर फुल आहे त्याला ते कसे बरे कोमेजून देतील.  मुलांच्या शिक्षणासाठी दोन दोन नोकर्या करून पैसे जोडणारे पालक आपण बघतो तेव्हा वाटते उत्तर आयुष्यात मुलांनी त्याचे चीज करावे. अनेकांच्या नशिबी ते सुख असते पण अनेकांची हि सुखाची ओंजळ रीतीच राहते .

 नऊ महिने पोटातील गर्भ वाढवणे , त्याला मोठे करणे , संस्कार करणे , माणूस म्हणून घडवणे , त्याला जगाची ओळख करून देत त्याला त्याच्या पायावर उभे करणे हे एक तपापेक्षा कमी नाही. हि खरी साधना आहे आणि त्या साधनेचे फळ त्यांना त्यांच्या उतार वयात मुलांनी भरभरून द्यावे ह्यासारखे दुसरे सुख ते काय .

सौ. अस्मिता दीक्षित 
संपर्क : 8104639230


अचूक निर्णय

 || श्री स्वामी समर्थ ||

नागमोडी वळणे घेवून जेव्हा आयुष्य आपल्याला हुलकावण्या देते तेव्हा आपल्याला असंख्य प्रश्न पडतात , अचानक घडणाऱ्या घटना विस्मयचकित करणाऱ्या आणि आयुष्याचा आजवरचा आलेख खाली आणणाऱ्या असतात . अश्यावेळी दुर्लक्षित केलेल्या आकाशातील ह्या लुकलुकणाऱ्या ताराकांचे स्मरण होते आणि आपली पाऊले ज्योतिष जाणकाराकडे अपोआप वळतात . खरतर आपल्याला ज्योतिषाशी काहीही घेणेदेणे नसते , आपला रस असतो तो आपल्या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यात . 

आधुनिक आजच्या युगात ज्योतिषाकडे आलेले जातक भले विद्वान असतात . सोशल मिडीया वरील अर्धवट मिळालेले ज्ञानामृत ज्योतिषालाच पाजू पाहतात . असो. माझा राहू इथे आणि मला अमुक ग्रहाची दश सुरु आहे वगैरे वगैरे त्यांचे सांगून झाल्यावर आता बोला काय ते अश्या अविर्भावात असलेल्या जातकाची मनाची केविलवाणी अवस्था लपून राहिल्याशिवाय राहत नाही. पत्रिकेचे वाचन किंवा फलादेश सांगणे सहज सोपे खचितच नाही . ज्योतिष हि एक तपस्या आहे आणि फलादेश सांगताना व्यक्तीला पत्रिकेचे अनेक पेहलू तपासावे लागतात . 

सर्वप्रथम लग्न आणि लग्नेश . त्याची स्थिती भक्कम असायला हवी. लग्न मेष असेल तर पत्रिकेतील मंगळाची स्थिती डावलून चालणार नाही . जातकाचा प्रश्न मुळात नीट समजून घेणे आणि त्याभोवतीच चित्त असणे आवश्यक आहे. एखादा नोकरीचा प्रश्न जातकाने विचारला असता , आपले लक्ष्य हे पत्रिकेतील १ ६ १० भाव , रवी ,आणि प्रामुख्याने दशा अंतर्दशा ह्यावर केंद्रित झाले पाहिजे. उगीचच तुमचे केस किती छान असतील आणि तुम्हाला स्वयपाक किती उत्तम येत असेल ह्यावर वायफळ चर्चा नको . आपल्याला असलेले सगळे ज्योतिष ज्ञान जातक घ्यायला आलेला नाही त्याला त्याच्या प्रश्नाच्या उत्तरात रस आहे इतकेच .  

परदेशगमन पाहण्यासाठी अर्थात ३ ९ १२ त्यात १२ अति महत्वाचे मह तिथे चर , स्थिर , द्विस्वभावी कुठल्या तत्वाची राशी आहे आणि राशीस्वामी कुठे आहे . प्रवासाचा कारक चंद्र आणि दशा महत्वाची .

संतती असेल तर मुळात ७ वे स्थान बलवान हवे. संततीचा कारक गुरु , पंचमेश सुस्थितीत हवा . लग्नेश बलवान हवा कारण मुल त्यालाच होणार आहे म्हणून लग्नेश सुद्धा पाहावा . पंचमाचे पंचम आणि एकंदरीत पंचमेशाच्या अनुषंगाने येणारे पंचम भावाचे सर्व नियम . धन भाव कारण अपत्याच्या आगमनाने कुटुंबात होणार आहे ती एका सदस्याची वाढ . 

सद्य दशा संततीसाठी अनुकूल असेल तर अपत्य प्राप्ती कधी होणार त्यासाठी अनुकूल अंतर दशा पहावी. घर खरेदी साठी चतुर्थ   लाभ , व्यय तर घराच्या विक्रीसाठी दशम , तृतीय लाभ हि स्थाने पहावी लागतील. 

अनेक लोक विचारतात मला शांतता कधी मिळेल ? माझे अखेरचे दिवस कसे जातील , मुले पाहतील ना आमच्याकडे म्हातारपणी . ह्या सर्वासाठी चतुर्थ पाहावे कारण तेच आपले सुखस्थान आहे. हे सगळे सोपस्कार झाले कि  शेवटी गोचर लावायला विसरू नये . 

थोडक्यात काय तर प्रत्येक प्रश्नावरच  आपले लक्ष्य केंद्रित असले पाहिजे आणि त्याच अनुषंगाने आपला अभ्यास असेल तर अचूक फलादेश करण्यात सहजता येयील. 

यात्रा ह्या कामासाठी असू शकतील , मौज मजेसाठी आणि धार्मिक सुद्धा असू शकतात . नेहमी अष्टम भाव लागला कि मृत्यू येतो हे डोक्यात धरून ठेवणे चुकीचे आहे. मृत्युत्युल्य कष्ट होतील पण मृत्यू नाही.  जातक अनेकवेळा एकापेक्षा अनेक प्रश्न विचारतात तेव्हा ज्योतिषाची गल्लत होता उपयोगी नाही म्हणून काय पाहायचे ते समजले पाहिजे. समोरच्याला विचारू दे काय ते आपले लक्ष्य प्रश्नावर केंद्रित हवे .

संपूर्ण पत्रिका त्यात लग्नेश , चंद्र रवी ,जन्म नक्षत्र , दशास्वामी त्याचे नक्षत्र हे सर्व विचारात घेवून मुळ प्रश्नाकडे गेले तर फारसा गोंधळ होत नाही . संतती नाही म्हणून एकदम पंचमावर उडी मारली तर उत्तर चुकण्याचा संभाव असतो कारण मुळात त्याचा उगम सप्तमातून होतो आणि हीच गोष्ट प्रत्येक प्रश्नासाठी होवू शकते कारण सर्वप्रथम आपण प्रश्नांच्या मुळाशी जाणे अपेक्षित असते तसे झाले तर प्रश्नाचे उत्तर उलगडते आणि सद्य स्थितीत चालू असलेली महादशा उत्तरापर्यंत पोहोचवते कारण घटना कधी घडणार हा अधिकार दशा स्वामीने राखून ठेवला आहे.  पत्रिकेत कितीही राजयोग असुदेत आणि कितीही ग्रह उच्चीचे असुदेत , दशा स्वामी जर घटनेशी संबंधित भाव देत नसेल तर बाकी गोष्टी फोल आहेत .

सारासार विचार करून तारतम्य , जातकाचे वय आणि प्रश्नाचा गाभा , गोचर लक्ष्यात घेवून केलेले विवेचन हे अचूक उत्तरापर्यंत नक्कीच पोहोचवेल ह्यात शंका नसावी .

सौ. अस्मिता  दीक्षित 

संपर्क : 8104639230   

 


Thursday, 17 April 2025

सर्वगुणसंपन्न

 || श्री स्वामी समर्थ ||



जोडीदाराबद्दल अपेक्षा असल्याच पाहिजेत कारण आपल्याला त्यासोबत उर्वरित आयुष्य काढायचे आहे. रोज उठून भांड्याला भांडे लागून शेजार्यांना करमणूक होण्यापेक्षा आपल्या पसंतीचा , आपल्या आचार विचारांशी जुळते घेणारा आणि आयुष्याकडे पाहण्याचा आनंदी दृष्टीकोन असणारा जोडीदार कुणाला आवडणार नाही. पण ह्यासोबत आपल्या खंडीभर अपेक्षा असतात त्या जरा पुन्हा तपासून पहिल्या पाहिजेत .

दोन महिन्यापूर्वी एक पत्रिका मिलन करताना त्यांना मी सांगितले दोन्ही पत्रिका ठीक आहेत पण आपल्या मुलीसाठी हे स्थळ फारसे योग्य वाटत नाही . ते दोघेही एकमेकांना भेटत होते वगैरे वगैरे सर्व ठीक. शास्त्र काय सांगते ते असे कि ह्यांचे सनई चौघडे वाजले तर आयुष्याचे नक्कीच बारा वाजतील . असो मी आपले मत सांगितले पुढे त्यांची इच्छा . काही दिवसापूर्वी त्यांचा फोन आला आणि तेव्हा समजले कि आता ते दोघे वेगळे झाले आहेत . मनात म्हंटले चला एक होउ घातलेला घटस्फोट वाचला . दोघानाही योग्य जोडीदार मिळून त्यांचे भले होवूदे .

थोडक्यात सांगायचे कि त्या मुलाच्याच पत्रिकेत विवाहास अडचणी आणणारी ग्रहस्थिती होती. त्यांना म्हंटले तुमचा मुलगा अत्यंत लहरी आणि विक्षिप्त स्वभावाचा आहे. सांगायला आवडेल कि त्यांनी ते मोठ्या मनाने मान्य केले म्हणून मला त्यांचे कौतुक वाटले. अनेकदा आपण येणाऱ्या स्थळाकडून असंख्य अपेक्षा ठेवतो पण आपल्या अपत्याचा चेहराही एकदा आरशात बघावा असे सुचवावेसे वाटते. अनेकदा समोरच्या स्थळाला नाव ठेवण्यापेक्षा आपण सुद्धा त्यांच्या तोलामोलाचे आहोत का ते पुनश्च तपासून पाहावे असेच मी सांगीन . शेवटी समोरच्याने आपल्याला होकार किंवा नकार द्यावा हा त्यांचा प्रश्न आहे . 

आपल्या मुलामुलींचे स्वभाव आपल्याला त्यांच्या जन्मापासून माहित आहेत . एखादा चंचल असेल तर एखादी मुलगी आयुष्याला फार सिरीअसली घेत असेल. एखादा बेधडक वागणारा बोलणारा असेल तर एखादा आतल्या गाठीचा तर एखादा खूप समजूतदार असेल. आपल्याला आपली मुले व्यवस्थित माहित आहेत किबहुना त्यांचे गुण आणि दुर्गुण ह्यांचा विचार करून स्थळ पाहिले पाहिजे. पोतभर अपेक्षा समोरच्याकडून आणि आपले काय ? असे व्हायला नको .

उदाहरण द्यायचे झाले तर मिथुन राशीतील मंगळ किंवा मिथुन नवमांशा तील मंगळ हा स्वभाव जरासा हट्टी करतो . शास्त्र प्रचीती देतेच देते. कन्या लग्न राशी अत्यंत चिकित्सक असतात . वृषभ तुळा किंवा नवमांशा तील गुरु फारसे देवदेव करणारे नसतात . हे काही रॉकेट सायन्स नाही . बेसिक आहे हे. असो त्यामुळे आपला मुलगा देवाला हात सुद्धा जोडत नाही पण येणाऱ्या सुनेने जी त्याच्याच पिढीतील आचार विचारांची तिने मात्र कुलाचार आणि देवदेव केले पाहिजे हा अट्टाहास असेल तर आधी मुलाला रामरक्षा हनुमान चालीसा म्हणायला बसवा . अपेक्षा दोन्हीकडून आहेत . 

थोडक्यात आपल्या मुलाची सर्वार्थाने बाजू आपल्याला माहित असलीच पाहिजे आणि त्याच्यासमोर समोरच्याकडून किती अपेक्षा करायच्या ते ठरले पाहिजे. म्हणूनच गुण मिलनासोबत ग्रह मिलन महत्वाचे आहे. दशा , अंतर्दशा सर्व सतत बदलत असते. खूप वर्ष मित्र असणारे ते दोघे लग्नाच्या बंधनात अडकले कि  आपण एकेकाळी खूप चांगले मित्र होतो हे विसरून का जातात ? त्यांना लग्नाचे “ बंधन “  का वाटायला लागते ???? आणि मग हळूहळू कोर्टाची पायरी चढायची वेळ का येते ? मग इतके वर्ष काय ओळखत होते एकमेकांना ? हा प्रश्न अनुत्तरीत राहतो.    

आपल्या मुलांना कमी अजिबात लेखू नका पण त्यांच्यातील असलेले अवगुण नजरेआड सुद्धा करू नका. आहे ते असे आहे हे सर्वप्रथम आपण पालकांनी सुद्धा स्वीकारले पाहिजे . आपल्या तोलामोलाचे स्थळ शोधावे ते ह्याचसाठी . ह्यात आर्थिक स्थिती पेक्षाही विचारधारा महत्वाची आहे. पैशाची गणिते मांडून विवाह ठरवू नये . 

आज ज्या मुलाला एक लाख पगार आहे तो तितकाच राहणार नाही तो नक्कीच वाढत जाणार आहे . रंग रूप देखणेपणा , पैसा सगळेच बदलत जाणार आहे आणि ते बदल त्या त्या आयुष्याच्या वळणावर खुल्या दिलाने खरेपणाने स्वीकारता आले पाहिजे ते धैर्य दोघांनीही दाखवले पाहिजे. जे व्हावे ते दोघांच्याही पसंतीने. संसार करायचा आहे जोडीदार विकत नाही घ्यायचा आपल्याला. दोन कुटुंबे पुढे अनेक वर्ष सणवार आनंदाने साजरे करताना दिसली पाहिजे . कुटुंबाचे गोकुळ झाले पाहिजे. संसार म्हणजेच तडजोड आणि ती दोन्ही कडून होणे आवश्यक आहे. 

अनेकदा पालक सांगतात मुलाला खूप स्थळे सांगून येत आहेत मग प्रश्न असा आहे कि अद्याप विवाह का जुळत नाही ? कुणाला दुखवायचे नाही म्हणून हे प्रश्न मी स्वतः टाळते पण आपणच आपल्या प्रश्नाचे उत्तर देत आहोत असे नाही का वाटत ? इतकी स्थळे सांगून येवूनही विवाह होत नाही म्हणजे कुठेतरी पाणी मुरते आहे . आपल्या मुलाच्यात असलेल्या कमतरता स्वीकारणे हेही फार धैर्याचे काम असते आणि त्यानुसार अपेक्षा ठेवणे हे अनेकांना जमत नाही. अनेकदा विवाहास अनुकूल दशा नसते अश्यावेळी प्रत्येक स्थळात काहीतरी उणीव कमतरता राहते आणि गोष्टी पुढे जात नाहीत कारण ग्रहस्थिती योग्य नसते .

आम्ही मुलाकडचे म्हणजे काही वेगळे आहोत का तर नाही . तसेच आमची मुलगी इतके लाख कमावते म्हणजे वेगळे आहोत का ? तर अजिबात नाही . आज लाखात पगार असणार्या मुलींची वये 35 च्याही पुढे आहेत . मी तर असे म्हणीन कि आपला मुलगा आणि मुलगी दोघांनीही आपल्या मुलातील गुण अवगुण सर्व अत्यंत खर्या मनाने स्वीकारून स्थळ पाहिले तर विवाह होण्याचे प्रमाण वाढेल असे वाटते. 

कुणीही ह्या जगात “ सर्वगुण संपन्न “ नाही. असा मनुष्य देवाने जन्माला घातलेलाच नाही . आपला मुलगा किंवा मुलगीही अनेक गुण आणि अवगुणांचे मिश्रण आहे . अहो मुलेच कश्याला ह्या पृथ्वी तलावरील प्रत्येक व्यक्ती त्यात आपण स्वतः सुद्धा मोडतो सर्वगुण संपन्न अजिबात नाही .  त्यामुळे डोळसपणे जी आहे ती स्थिती स्वीकारता आली पाहिजे. आपला मुलगा अत्यंत उधळा आहे, वेळ प्रसंगी कठोर बोलतो, त्याच्या मनासारखेच झाले पाहिजे असा त्याचा अट्टाहास असतो हे गुण खुल्या दिलाने स्वीकारले पाहिजेत आणि समोरच्यांना ते तितक्याच खरेपणाने सांगताही आले पाहिजेत . प्रेम विवाह असेल तरीही समोरासमोर बसून दोघांच्याही पालकांनी मोकळेपणाने चर्चा करावी पुढील संकटे टळतील. 

आज प्रत्येकाला एकमेकांशी बोलणे गरजेचे आहे. नुसता फोटो पत्रिका बघून काही होणार नाही एकमेकांना भेटणे विचार समजून घेणे हे अत्यावश्यक आहे. नुसता फोटो बघून जोडीदाराबद्दल मत ठरवणे हि धोक्याची घंटा आहे. भेटीत अनेक गोष्टी उलगडतात . वाटणे आणि असणे ह्यातील फरक समजतो , एकमेकांशी मोकळेपणाने बोलणारी आजकालची पिढी आहे. संवाद हा दोघांना जवळ आणेल असे झाले नाही तर आयुष्यभर विवाह संस्थात नाव नोंदवा त्यांच्या फी भरत राहणे आणि स्थळे बघणे ह्या दुष्ट चक्रात अडकून राहायला होईल. एकमेकांना निदान एकदा तरी भेटा मग हवे तर नकार होकार काय ते ठरवा . पण हिला एकदा तरी भेटायला हवे होते ...असे मनात विचार भविष्यात येवून काहीच उपयोग होणार नाही. 

आज पगाराच्या भिंती विवाहातील मोठी अडचण आहे. पगार अपेक्षेपेक्षा नाही त्यामुळे पुढे भेटी वगैरे एकदम बाद होते . कुठेतरी हे सर्व थांबले पाहिजे . कधी म्हणजे ? आत्ता ह्याक्षणी ......ह्यात मुलांचे पालक , आप्तेष्ट , हितचिंतक सर्वांनी मुलांची मने वळवा, त्यांना योग्य मार्गदर्शन करा. शेवटचा निर्णय घेण्यास ते चुकत तर नाहीत ना हे डोळ्यात तेल घालून बघा .

मध्यंतरी एका गावातून एका शेतकर्याने मला फोन केला होता म्हणाले आज गावातील मुलांची लग्ने रखडली आहेत . गावात यायला कुणी मुली तयार नाहीत आणि गावातील मुलीना शहरात जायचे वेध लागले आहेत ...करावे तरी काय ?

आज विचारांचे परिवर्तन होणे सर्वार्थाने आवश्यक आहे. फक्त मुलांचीच नाही तर मुलींचीही वये चाळीशी कडे झुकत आहेत ....हे सर्व प्रश्न आपले सर्वांचे आहेत तुमच्या आमच्या घरातील आहेत ....सहमत ?

सौ. अस्मिता दीक्षित 
संपर्क : 8104639230 

  


Wednesday, 16 April 2025

कुंडलीतील पंच तत्वांची तर्कशुद्ध मांडणी

 || श्री स्वामी समर्थ ||



पंचतत्वाशी आपली सर्वांची नाळ जोडली गेलेली आहे. त्यांची वेगळी ओळख करून न देता सरळ विषय मांडते. आपल्या ऋषी मुनींनी निसर्ग कुंडली अतिशय अभ्यासपूर्वक मांडली आहे .त्यातील पंचतत्व अभ्यासण्या सारखी आहे. स्मुक्ष अभ्यास केला तर लक्ष्यात येते कि अग्नी च्या समोर वायू तत्व आले आहे. अग्नीसाठी प्राणवायू लागतो आणि म्हणूनच अग्नीसमोर वायू आहे . पण हा वायू प्रमाणबद्ध असला पाहिजे , अतिरेक उपयोगी नाही अन्यथा अग्नी भडकू शकतो .


जल तत्वासमोर पृथ्वी तत्व आहे. कोरडी माती कसलाच आकार घेवू शकणार नाही . मातीचे भांडे बनवायचे तर जल हवेच इतकी साधी सोपी रचना आहे. तसेच जल धरून ठेवायला सुद्धा पृथ्वी तत्व लागते. म्हणूनच त्यांच्या राशी एकमेकांसमोर . केंद्रातील सर्व स्थाने अति महत्वाची आणि आपल्या आयुष्याचा तो आधार आहे तिथे चारही तत्व आहेत अशी तर्कशुद्ध रचना आपल्या कुंडलीची आहे. कुंडलीचा सखोल अभ्यास त्यातील अनेक गोष्टीतील तर्क उलगडून दाखवतो . केंद्रातील स्थानांमध्ये चर तत्व आहे . जन्माला आल्यावर तिथेच थांबून न राहता शरीर बुद्ध मन सगळ्यात वाढ अपेक्षित आहे . चतुर्थ भाव म्हणजे सुखस्थान , प्राथमिक शिक्षण , वास्तू ह्या सर्वात वाढ किंवा अधिक चांगला बदल झाला पाहिजे . सप्तम भावात अर्धांगिनी ,नवीन नाते उमलू पाहणारे हे स्थान , नवीन नाते अनेक अपेक्षा घेवून बहरणारे हे स्थान त्यामुळे सर्वांगीण प्रगती इथे अपेक्षित आहे. सरतेशेवटी दशम भाव , कायम तोच पगार असेल तर कसे निभावणार  नाही का. हुद्दा , दर्जा , सामाजिक पत उंचावण्यासाठी इथे अर्थार्जनाचा लेख सुद्धा उंचावला पाहिजे . थोडक्यात ह्या चारही स्थानात असलेली कार्य हि दिवसागणिक बदलत जाणारी यशाची निर्मिती करून आयुष्याचा आलेख उंचावणारी आहेत म्हणून इथे चर तत्वाच्या राशी ज्या माणसाला सतत कार्यरत ठेवतात , पुढे पुढे नेत राहतात त्याचे अधिष्ठान आलेले आहे .


आयुष्याच्या जवळजवळ मध्यापर्यंत येणारी स्थाने आणि त्यांच्या राशी बघा . आयुष्याचा उपभोग घेणारा शुक्र आणि आर्थिक नियोजन करणारा बुध त्याच्या राशी तिथे आहेत . संसार सुखाचा होण्यासाठी लागणारा शुक्राचा अविष्कार तारुण्यात आलेला दिसतो . त्याआधी शिक्षण आणि पोटासाठी अर्थार्जन बुध देत आहे . मुलीचा बाप मुलगा आपल्या लेकीचे पोट हा कसे भरणार ते पाहणारच कि . जीवनात पन्नाशी नंतर असतो तो वानप्रस्थाश्रम त्यामुळे ९ १० ११ १२ ह्या राशी विरक्ती आणणाऱ्या आणि मोक्षाकडे वाटचाल करायला लावणाऱ्या दोन महत्वाच्या ग्रहांच्या आहेत आणि ते म्हणजे गुरु आणि शनी .आपण आयुष्याच्या संध्याकाळीच काही गोष्टी सोडून देवू शकतो अर्थात तेही अध्यात्माचा पाया जीवनात भक्कम असेल तर अन्यथा नाहीच . सगळे कवटाळून बसतो एखादी साडी विरली तरी ती कुणाची तरी आठवण म्हणून देऊन टाकण्याची वृत्ती आपली नसते . आठवण कसली त्यापेक्षा कुणीतरी ती चार वेळा नेसेल तरी .असो .  वय झाले कि माणसाने प्रपंचातून लक्ष्य काढून प्रभूच्या चरणी मन , चित्त गुंतवावे हेच ह्या कुंडलीच्या मांडणीतून सिद्ध होते . 

लग्न भावात वृश्चिक हि राशी नसून चर तत्वाची मेष राशी आहे. लहान बाळ जन्म झाल्यावर तसेच तेव्हडेच राहते का? नाही हातापायाची सायकल हाच त्याचा व्यायाम पण पालथे पडायला शिकते आणि हळू हळू मोठे होत जाते कारण हाच आयुष्याचा नियम आहे . एका जागी न थांबता सतत पुढे जात राहिले पाहिजे . 

चतुर्थात येणारी कर्क राशी तिथे आपले सुखस्थान आणि माता . आई म्हणजेच घर हे आपले समीकरण आहे . मातेशिवाय घर असूच शकत नाही हे सर्वश्रुत आहे. आईचा मायेचा हात आपल्या लेकरांवरून आणि घरावरून फिरल्या शिवाय घराला घरपण नाही हे त्रिवार सत्य आहे. ह्याचप्रमाणे प्रत्येक ग्रह आणि स्थानाची महती इथे आहे आणि त्याच्यामागे तर्क हा आहेच जसे लग्न हे रूप दर्शवते आणि रूप अग्नी प्रकाशात आणतो म्हणून तिथे मंगळाची अग्नी तत्वाची मेष राशी आहे. द्वितीय भाव हा कुटुंबाचा आहे अर्थात कुटुंब संस्था टिकवायची असते , कुटुंबातील एकमेकांना धरून ठेवूनच संसाराची गाडी पुढे न्यावी लागते म्हणून तिथे पृथ्वी तत्वाची स्थिर गोडवा जपणारी वृषभ राशी आहे. शुक्र हा सुद्धा जल तत्वाचा आहे. इथे मनाचा चंद्र उच्च होतो.  संसारात मन नसेल तर सर्व फोल आहे. 

बुध शुक्र शनी हे त्यांच्या लग्नाला शुभ होतात तसेच रवी चंद्र मंगळ गुरु हे त्यांच्या लग्नाला शुभत्व देतात . कोण स्थानांचे स्वामीही एकमेकांचे मित्र असतात.

बुध हा पृथ्वी तत्व दर्शवतो आणि त्याच्या कडे गंध आहे. गंध आणि श्वास आपण नाकाने घेतो . नाकाला दोन नाकपुड्या आहेत कारण श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे जसे आपण प्राणायमात करतो. बुध हा द्विस्वभावी राशीचा आहे. म्हणून तिथे श्वास घेणे आणि सोडणे हि क्रिया होते. बुधाकडे गंध आहे आणि बुधाकडे त्वचाही आहे.  त्वचेला शिद्र( pores)  असतात ज्यामधून घाम बाहेर फेकला जातो. जर घामाचा उग्र वास असेल तर कुठेतरी शनी सुद्धा बिघडलेला असतो. आपल्या शरीरावर त्वचेचे आवरण आहे म्हणून आपल्या देहाला सुंदरता आणि आकार उकार आहे . 

पोटात आलेल्या अन्नाचे पचन नीट होण्यासाठी षष्ठ भावात सुद्धा पृथ्वी तत्वाच्या बुधाची कन्या राशी आहे. शरीराला आवश्यक घटक जवळ ठेवून इतर बाहेर टाकून देणे हि क्रिया असल्यामुळे इथे कन्या हि द्विस्वभावी राशी आहे. 

कुठल्याही पत्रिकेतील फलादेश पाहणे तेव्हाच शक्य होईल जेव्हा ह्या मुलभूत गोष्टी आपल्याला नीट समजतील. आपला देह सुद्धा एक दिवस पंच तत्त्वातच विलीन होणार आहे.  

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230.


Saturday, 12 April 2025

रामभक्त

|| श्री स्वामी समर्थ ||


एकदा श्री कृष्णाच्या मनात आले सुदर्शन ( चक्र ) आणि गरुड ( वाहन ) ह्यांना त्यांच्या शक्तीचा अहंकार झालेला आहे. त्यांना त्यांची  चूक समजण्यासाठी त्यांनी एक युक्ती केली . गरुडाला सांगितले कि जा अमुक अमुक ठिकाणी अंजनीपुत्र बसलेले आहेत त्यांना सांग मी बोलावले आहे. गरुडाने आज्ञा प्रमाणम म्हणून लगेच प्रस्थान केले आणि हनुमानाच्या समोर उभे ठाकले . श्री हनुमानाचे प्रचंड तेज पाहून त्यांचे नेत्र दिपून गेले. त्यांनी कृष्णाचा निरोप त्यांना सांगितला आणि म्हणाले कि त्यांनी तुम्हाला बोलावले आहे. तेव्हा हनुमान उत्तरले मी तर एक सामान्य रामभक्त आहे माझ्याकडे त्यांचे  असे काय काम असणार आहे ? त्यांनी येण्यास नकार दिला तेव्हा गरुडाने त्यांना दटावत म्हंटले नाही आलात तर मी तुम्हाला बंदी करून घेवून जाईन. हे ऐकल्यावर हनुमान शांत राहिले . मनात रामाचा जप चालू होता त्यांनी समोर असलेल्या गरुडाला आपल्या शेपटीने विळखा घातला आणि गरुडालाच बंदी करून टाकले. 

काही वेळाने गरुड परतलेला नाही हे लक्ष्यात आल्यावर कृष्णाने सुदर्शनास बोलावून सांगितले कि हनुमाना कडे जा आणि त्याला सांग रामाने तुला बोलावले आहे . कृष्णाचा निरोप सांगताच हनुमान सद्गदित झाले , प्रत्यक्ष रामाने माझी आठवण काढली आहे हे ऐकून त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. परंतु सुदर्षणाचा एकंदरीत अविर्भाव पाहून हनुमानाने त्याला आपले रौद्र रूप दाखवले आणि त्याला चिमटीत पकडून आपल्या दाढेत बंदिस्त केले आणि  तात्काळ क्षणाचाही विलंब न करता हनुमान कृष्णासमोर उभे ठाकले आणि नतमस्तक झाले. कृष्णाने रामाचा अवतार घेतला होता त्यामुळे हनुमानाला कृष्णातील फक्त रामच दिसत होता . कृष्णाने त्याला आलिंगन देत म्हंटले गेल्या जन्मी मी तुझा राम असलो तरी ह्या जन्मात मी कृष्ण आहे. हनुमान भारावले आणि म्हणाले जन्मोजन्मीचे हे आपले नाते आहे . आपण कुठल्याही रुपात आलात तरी माझी भक्ती तिळभर सुद्धा कमी होणार नाही . आपण माझी आठवण काढलीत ह्यातच सर्व आले . आपल्याला शतशः प्रणाम. श्रीकृष्ण सुद्धा हनुमानाच्या भक्तीने भारावून गेले . सुदर्शन कुठे आहे हे विचारताच हनुमानाने आपल्या दाढेतून  सुदर्शनाला काढून कृष्णासमोर ठेवले. कृष्णाने स्मित केले आणि सुदर्शन सुद्धा काय समजायचे ते समजले.

गरुड परत आल्यावर सुदर्शनाला म्हणाले कि हनुमान हा बलशाली आहे त्याच्यापासून दूर राहा , तो कधीही इथे येवू शकतो. हे ऐकल्यावर सुदर्शनाने हनुमान कृष्णाच्या दर्शनाला येवून गेले सुद्धा हे सांगितले. दोघेही मनोमन वरमले .असामान्य शक्ती बळ असलेल्या हनुमानासमोर आपण किती खुजे आहोत हे समजल्यावर त्यांचा अहंकार भुई सपाट झाला. इतके बळ तेज असूनही हनुमान किती संयमित , निष्ठावान , श्रद्धावान आहेत आणि रामासमोर नतमस्तक आहेत हे पाहून आपल्यातील उणिवांची जाणीव त्यांना झाली . 

आपण आपल्या कुठल्याही गुणांचा अहंकार करू नये कारण आपला बाप आपल्या आधीच त्या विधात्याने जन्माला घातलेला असतो. भक्तीचा सुद्धा अहंकार नसावा. निरपेक्ष भाव मनी ठेवून केलेली श्रद्धायुक्त सेवा फळ देतेच . आपण ज्याची भक्ती करतो त्या देवावर आपल्याला फळ कधी द्यायचे ते सर्वस्वी अवलंबून असते . त्यामुळे मी इतके करतो , असे अनुष्ठान केले , इतक्या प्रदक्षिणा घातल्या ह्याची मोजदात करणे भक्ताने सोडून दिले पाहिजे. आपण सेवा करत रहायची तीही अखेरच्या श्वासापर्यंत पुढे आपले जीवन कसे असणार आहे ते सर्वस्वी आपल्या अराध्याच्या हाती आहे. 

त्याच्या कामात आपण ढवळा ढवळ करू नये. आपण आपले काम करावे त्याला त्याचे करू द्यावे .

आज हनुमान जयंती . कलियुगात राहू केतू ह्यांनी जग जवळ आणले आहे , तंत्रज्ञानाने इतकी प्रगती केली आहे पण माणसाला त्याचा अहंकार झालेला आहे. सगळे आहे पण मनाची शांतता कुठेतरी ह्या जीवघेण्या स्पर्धेत हरवत चाललेली आहे . गोळी घेतल्याशिवाय झोप येत नाही आणि कितीही पैसा मिळवला तरी समाधान नाही . 

जीवघेण्या स्पर्धेत आपण अनेकदा आपले कुलाचार , धर्म , रूढी परंपरा विसरून जातो किबहुना त्यांना दुय्यम समजतो . वेळ नाही हि सबब आहे ती बाजूला ठेवून आपल्या पुढील पिढीलाही हा वारसा देणे हे आपले कर्तव्य आहे. 

आज “ अजून हवे अजून हवे “ हे त्या मारुतीरायाच्या चरणी समर्पित करूया . खरतर काहीच मागायचे नाही पण अगदी मागायचे झालेच तर “ हनुमाना तुझ्या सारखा निस्सीम भक्त कर “ हे तर आपण नक्कीच मागू शकतो. हनुमानाकडून निस्सीम भक्ती , निखळ प्रेम आणि भक्तीत असणारे सातत्य जर आपण घेतले तर आयुष्य एका वेगळ्याच उंचीवर जाईल ह्यात दुमत नसावे. 

ओं शं शनैश्चराय नमः

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230





   


Friday, 11 April 2025

अंतरात्मा गुरुतुल्य

 || श्री स्वामी समर्थ ||


आजकाल प्रत्येकाच्या ओठी गुरु हे नाव येतेच येते . कलियुगात संकटे गळ्यापर्यंत आली कि मनुष्य कुठल्यातरी शक्तीचा आधार घेतो आणि त्यास शरण जावून नतमस्तक होतो . आजच्या इंस्तंट च्या जमान्यात प्रत्येकाचा संयम संपलेला आहे किंवा संपत चाललेला आहे. पुढील गाडी सिग्नल ला दोन क्षण उभी राहिली कि मागून सगळ्यांचे होर्न चालू होतात . सगळे मनात आले कि लगेच व्हावे असे होत नसते . संयमाचा उगम हा नामातून होत असतो .

विवाहासाठी स्थळ शोधायला सुरवात केली कि जेव्हा काही काळ लोटतो आणि विवाह जमत नाही तेव्हा मुलांचाच  काय पालकांचाही संयम सुटतो आणि त्याचे काळजीत रुपांतर होते . आपल्या अपत्याचा विवाह होणार कि नाही हि एक अनामिक भीती मनाला ग्रासू लागते . आपण देवी देवता नाही आपला संयम सुटणे हे विशेष नाही. असो. 

आजकाल एक सर्वसाधारण प्रश्न विचारला जातो कि साधना कशी करावी ह्यासाठी मार्गदर्शन करा. खरे सांगू का ? हे प्रश्न न मी कधी कुणाला विचारले आणि कुणी विचारावे असेही वाटत नाही. अनेकदा आपण हे करू का ते करू ह्यात गुंतून राहतो. सगळ्यात प्रथम त्यातून बाहेर यावे. सकाळी आपले प्रातःविधी उरकले कि देव्हार्यातील आपल्या कुलस्वामिनीला हळद कुंकू वाहून दिवसाची सुरवात करावी . मनोभावे नमस्कार करून देवीचा जप , श्रीसूक्त जे काही म्हणता येयील ते म्हणावे. आपल्या कुल्स्वमिनीची उपासना केल्या नंतरच पुढील उपासना जसे इष्ट गुरूंचा जप , पोथी वाचन करावे. 

जे काही करू त्यात बदल नको, जे करू ते आत्मिक समाधानाची अनुभूती देणारे असले पाहिजे. आज सी बाबा उद्या शंकर महाराज असे गुरु बदलू नयेत. गुरुतत्व समजणे महत्वाचे आहेत . प्रत्येक मुलाची आह वेगळी पण तिची शिकवण एकाच असते त्याप्रमाणे गुरूंची नावे वेगवेगळी असली तरी गुरु हे एक तत्व आहे. माणसातील देव ओअल्खुन त्याच्यासमोर नतमस्तक व्हा हेच ते सांगत असते.आपण आपल्या कुवतीप्रमाणे आणि हव्यासाप्रमाणे त्यांची सेवा करणे अपेक्षित नाही . कुठल्याही अपेक्षेविरहित आत्यंतिक ओढीने प्रेमाने घेतलेले त्यांचे नाव निश्चित त्यांच्या पर्यंत पोहोचणार . 

गुरु हा आपल्या जीवनाचा मोठा आधार आहे. बघा कुटुंबात नेहमी आपल्यापेक्षा मोठी माणसे असली कि आपल्याला काळजी नसते पण जेव्हा कालांतराने आपणच कुटुंबात मोठे होतो तेव्हा किती फरक पडतो . वट वृक्षाखाली बागडणे आणि स्वतः वृक्षच होणे ह्यात फरक आहेच. कुटुंब प्रमुख म्हंटले कि जबाबदारी आली . असो.

गुरुतत्व समजणे सोपे नाही त्यासाठी षडरीपुंची आहुती द्यावी लागते . अनेक अपमान सहन करून आयुष्यात मार्गक्रमण करायला लागते . दुर्दम्य इच्छाशक्ती लागते तेव्हा कुठे निभाव लागतो . ऊन वर पाऊस काहीही असो नित्याची साधना नित्य करत राहणे हे सोपे नाही. पण जसजसे भक्ती वाढते अनुभूती येते त्याबरोबर मनातील आशा पल्लवित होतात आणि नामस्मरणाची अवीट गोडी लागते . नामाचे महत्व समजू लागते आणि त्याचे जीवनातील अनन्य साधारण महत्व सुद्धा . सारखे मी मी माझे माझे  कमी होते आणि समाजासाठी इतरांसाठी जगण्याची प्रेरणा मिळते . 

गुरु हि व्यक्ती नसून तत्व आहे आणि त्याप्रती सन्मान , आदर आपल्या मनी असला तरच ते ग्रहण होईल. आपल्या पत्रिकेतील गुरु सुस्थितीत असेल तर आयुष्यात कितीही संकटे चढ उतार आले तरी त्यातून सुरक्षित गुरूच आपल्याला काढू शकतात . आता सर्व संपले असे वाटत असतानाच पुन्हा जीवन सुरु होते ते गुरु मुळेच. जीवनातील ज्ञानाचा स्त्रोत गुरूकडे आहे आणि ते ज्ञानामृत मिळणे हे आपले परमभाग्य आहे. 

मी साधना कशी करू हे विचारण्याचा प्रश्नच येत नाही . मुळात मला नाम घ्यावेसे वाटत आहे हा विचार सद्गुरू कृपेशिवाय मनात येवूच शकत नाही .त्यामुळे जेव्हा मनाची अशी अवस्था होते तेव्हा नामस्मरण सुरु करावे. कसे किती कुठे ह्या बंधनात नाम कधीच नसते. आपल्या श्वासागणिक नाम घेता आले पाहिजे जे अर्थात हळूहळू होत जाते. आपली इच्छाशक्ती , आपली गुरूंच्या प्रती असणारी भावना प्रेम जितके खोल तितके नामाची खोली अधिक. 

कुणी किती नाम घ्यायचे ते ज्या देवतेचे तुम्ही नाम घेत आहात तीच ठरवते आणि त्याप्रमाणे तुमचीकडून ते करवून सुद्धा घेते. एक वेळ अशी येते कि आपण नामाशिवाय राहू शकत नाही .

तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम ...हि अवस्था यायला वेळ लागत नाही आणि परमार्थाच्या मार्गावर आपण चालायला लागतो . नाम आपल्याला संयमित करते .मन शांत होते . नाम सकारात्मकता देते , शरीरातील ७ चक्रांचे शुद्धीकरण होते आणि संकटांशी लढण्याचे बळ मिळते. नाम हे जीवनातील जादूच्या कांडी सारखे काम करते . नामाची महती ते घेतल्याशिवाय समजणार नाही. 

आपण घेत असलेले नाम किंवा मंत्र हा गुरूंच्या आज्ञेशिवाय सिद्ध होत नसतो . मंत्राचे विलक्षण परिणाम अनुभवायला येणे हेही त्यांच्याच हाती असते. आपण मनापासून नाम घ्यायचे मंत्र म्हणायचे फळ कधी द्यायचे ते गुरु ठरवणार .

सगळ्यात मोठा गुरु म्हणजे आपला अंतरात्मा आपला आतला आवाज आपले मन काहीही म्हणा. अनेकदा आपण म्हणतो तुझा आतला आवाज काय सांगतो ते ऐक आणि तेच गुरुचे सूक्ष्म रुप आहे. गुरु आपल्या अवती भवतीच आहे , आपलाच एक भाग आहे त्याला अन्य कुठे शोधायची गरजच नाही. गुरु हे आपले कवच आहे . हा नैसर्गिक शुभग्रह आहे. 

आपल्या आयुष्यात असलेल्या सर्व गुरुतुल्य व्यक्तींच्या बाबत सद्भावना , सद्विचार , कृतज्ञता असली पाहिजे तरच गुरु आपले कवच बनतील अन्यथा नाही . अनेकदा पत्रिकेत गुरु इतका बिघडतो कि व्यक्तीला नैतिक , अनैतिकता , चागले वाईट कश्याचेही भान राहत नाही .

उपासना आपल्यासाठी आहे हे लक्ष्यात असुदे . आपण उपासनेसाठी नाही . उपासना आपले आयुष्य समृद्ध करते . जिथे राम तिथे राम आणि राम आपल्या अंतरात्म्याशी एकरूप होण्यासाठीच उपासना आहे . 

आज हनुमान जयंती . हनुमानाची सेवा ज्याला आज कलियुगात पर्याय नाही . राहू शनी ह्यांना हनुमान चालीसा हा उपाय सर्वश्रेष्ठ आहे . रामाचा जप करून हनुमान चालीसा नित्य म्हंटली तर आश्चर्यकारक परिणाम आणि अनुभूती मिळते . कुठलाही विचार न करता आजपासून हनुमान चालीसा , शनीचा जप अखंड करा त्याआधी आपल्या कुल्स्वमिनीचा जप आणि सद्गुरू स्वामी समर्थांचा जप .आयुष्य बदलून जायील. प्रत्येक गोष्टीत मार्ग मिळेल , प्रत्येक पहाट सुखाची असेल . शनी प्रत्येक गोष्ट विलंब करतो पण देणार नाही असे कधीच म्हणत नाही . तेव्हा संयम शिकवतोय ते आपल्याला हे समजले तरी पुरे आणि प्रतीक्षेनंतर चा प्रत्येक क्षण मात्र आनंद सौख्य भरभराट घेवून येणार आहे ...

आज शनीला तेलाच अभिषेक आणि इतर गोष्टी करायच्याच पण त्याही पेक्षा सर्वात महत्वाचे म्हणजे शनीच्या पायावर आपला अहंकार समर्पित करायचा . अहंकार हा “ दागिना “ आयुष्याची माती करतो आणि ज्याला ज्याला माज अहंकार आहे त्याला शनीची अत्यंत निर्घुण शिक्षा झाल्याशिवाय राहत नाही . आता प्रत्येकाने ठरवायचे आज काय समर्पित करायचे , काय घ्यायचे आणि काय सोडून द्यायचे .

ओं शं शनैश्चराय नमः

सौ. अस्मिता दीक्षित 
संपर्क : 8104639230


Tuesday, 8 April 2025

बुध

 || श्री स्वामी समर्थ ||

बुध हा पृथ्वी तत्व दर्शवतो आणि त्याच्या कडे गंध आहे. गंध आणि श्वास आपण नाकाने घेतो . नाकाला दोन नाकपुड्या आहेत कारण श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे जसे आपण प्राणायमात करतो. बुध हा द्विस्वभावी राशीचा आहे. म्हणून तिथे श्वास घेणे आणि सोडणे हि क्रिया होते. बुधाकडे गंध आहे आणि बुधाकडे त्वचाही आहे.  त्वचेला शिद्र( pores)  असतात ज्यामधून घाम बाहेर फेकला जातो. जर घामाचा उग्र वास असेल तर कुठेतरी शनी सुद्धा बिघडलेला असतो. आपल्या शरीरावर त्वचेचे आवरण आहे म्हणून आपल्या देहाला सुंदरता आणि आकार उकार आहे . 

पोटात आलेल्या अन्नाचे पचन नीट होण्यासाठी षष्ठ भावात सुद्धा पृथ्वी तत्वाच्या बुधाची कन्या राशी आहे. शरीराला आवश्यक घटक जवळ ठेवून इतर बाहेर टाकून देणे हि क्रिया असल्यामुळे इथे कन्या हि द्विस्वभावी राशी आहे. 

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230.