Tuesday, 15 July 2025

आयुष्याचा शेवटचा काळ कसा जायील ?

 || श्री स्वामी समर्थ ||


शनी वार्धक्याचा कारक आहे. रवीपासून सगळ्यात दूर असलेला हा ग्रह आपल्याला आयुष्याच्या संध्याकाळी भेटतो . थोडक्यात वार्धक्य दर्शवतो. शनी हा मंद गती ग्रह , शनै शनै प्रगती करणारा आणि म्हणूनच तो संयम ठेवायला शिकवतो. शनी प्रत्येक गोष्टीला विलंब करतो पण तो विलंब आपल्याला वाटत असतो खरा तो विलंब बसून प्रत्येक गोष्ट वेळच्या वेळीच शनी करतो . तो जेव्हा गोष्टी घडवतो ती वेळ आपल्यासाठी उत्तम असते हे फक्त त्यालाच माहित असते . आपला संयम संपल्यामुळे आपल्याला तो उशीर वाटत राहतो . उशिरा देतो पण देत नाही असे कुठे म्हणतो ? जे देतो ते सर्वोत्तम देतो. पण तरीही आपण त्यालाच दुषणे ठेवतो कारण आपल्यात संयम नाही . 


एखाद्या मुलाचा विवाह जरी उशिरा झाला तरी ते त्याच्यासाठी उत्तम असते कारण कदाचित आधी होवून त्याला लाभणारा नसतो पण कारण पुढील काळ मात्र सुखाचा असतो . एखादा आजार झाला तरी विलंबाने बरा होतो . कारण शेवटी आजार हा आपल्या कर्माचा आरसा आहे. जितकी कर्म वाईट तितका विलंब अधिक . दवाखाना डॉक्टर दिसले आणि सुई टोचली कि कुणाला काय काय बोललो आहोत , कसे वागलो आहोत ते सगळे समोर उभे राहते आणि मग ३३ कोटी देवांच्या चरणी शरण जातो . 


ह्या सगळ्याची जाणीव करून देण्यासाठी आजार लगेच शनी कधीही बरे करत नाही. लगेच बरे झालात तर मग पुन्हा वाट्टेल तसे उधळायला मोकळे. सहमत ?


पत्रिकेत शनी धनु किंवा मीन राशीत असेल तर आयुष्याची संध्याकाळ शांततेत जाते. अश्या लोकांचा नोकरीत मान असतो सुस्थितीत सतत , सामाजिक कार्यातही भाग घेताना दिसतात . अष्टम भावात शनी असेल तर अनेकदा दीर्घ मुदतीचे आजार पण आयुष्यमान चांगले असते . शनिवार गुरूची शुभ दृष्टी असेल तर परिणामांची दाहकता कमी होते 

शनी हेच जीवनाचे अंतीम सत्य आहे . आयुष्यभर केलेल्या चुका , कुकर्म शेवटीच आठवतात तोपर्यंत मनुष्य मदमस्त , बेताल , बेफिकीरीत जगत असतो . कुणाचा बाप माझे वाकडे करणार आहे हाच अविर्भाव असतो . पण तुमचा बाप तुमच्या आधीच देवाने जन्माला घातला आहे हे विसरून कसे चालेल . कर्म शुद्ध असावे हाच शनीचा संदेश आहे. कुणाचे ५ रुपये जरी ठेवले तरी कर्म वाढले आणि त्याची परतफेड करण्यासाठी पुन्हा जन्म घ्यावा लागतो. 

ओम शनैश्चराय नमः


सौ. अस्मिता दीक्षित 

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230


Monday, 14 July 2025

जेव्हा आनंदाला लागते ग्रहण

 || श्री स्वामी समर्थ ||


विवाह आयुष्यातील आनंदाचा सोहळा. पण हा सोहळा उपभोगण्याचे भाग्य सगळ्यांना मिळत नाही हे दुर्दैव आहे. पण जे आहे ते आहे . प्रत्येकाच्या आयुष्यातील कुठलातरी एक कोपरा रिता असतो . शैक्षणिक प्रगती , नोकरी, परदेशगमन , व्यवसाय , अर्थार्जन , विवाह , वैवाहिक सुख , संतती , मानसिक स्थैर्य , शरीर संपदा ह्यातील काहीतरी एक गोष्ट एक तर मनासारखी नसते किंवा ती मिळतच नाही . 


शिक्षण नोकरी ह्या प्रवासानंतर जेव्हा मुलगा कमावता होतो तेव्हा आई वडिलांचे सगळे लक्ष्य मुलाचे दोनाचे चार म्हणजेच विवाह कधी होईल ह्याकडे लागते. सुनबाई , जावई येण्याचे वेध लागतात आणि मग सगळीकडे नाव नोंदणी सुरु होते , नातेवाईक , जवळचे आप्त ह्यानाही चार ठिकाणी यंदा मुलाला कर्तव्य आहे अश्या प्रकारे सूचित केले जाते. तरुणाई सुद्धा आयुष्यातील नवीन वळणाची चाहूल लागल्याने खुश असते . मनात स्वप्नरंजन होत असते . थोडक्यात सगळे कुटुंब एक वेगळाच आनंद अनुभवत असते . पण अनेकदा ह्या आनंदाची सुरवात होण्याआधीच त्याला ग्रहण लागते जेव्हा अनेक स्थळे पाहूनही कुठेतरी काहीतरी अडते , नाडी दोष , सगोत्र , गुणमिलन आणि पुढील ग्रहमिलन ह्यातील उणीवा , आजकालची मोठी समस्या म्हणजे “ पगार किती “ . मुलाचा पगार आणि आर्थिक सुबत्ता हि पहिली अट ह्याचा अर्थ मुलगा इतर बाबीत कसाही असेल तरी चालणार आहे का? असो विषयांतर होत आहे म्हणून तूर्तास थांबते .

तात्पर्य असे कि विवाह उत्सुख मुले मुली अनेक प्रयत्न करूनही जेव्हा विवाह जुळत नाही तेव्हा हताश , निराश होतात. अश्यावेळी मग पत्रिका तपासून घेण्यासाठी किंवा असे का होत आहे हे जाणून घेण्यासाठी ज्योतिषाकडे मोर्चा वळतो .

विवाह हि आयुष्यातील सुखद घटना आहे . अनेकदा हे सुख परमेश्वराने अनेकांच्या ओंजळीत घातलेले नाही , भले त्यांना पैसा आणि इतर भौतिक सुखात कमतरता नसेल पण विवाहापासून अनेकांना वंचित ठेवले आहे. हे असे का? तर त्याला उत्तर नाही .हे आपले भोग आहेत आणि ते जितके लवकर स्वीकारू तितके आयुष्य पुढे जायील . पण ते स्वीकारणे खरच कठीण असते . एखाद्या मुलाच्या नशिबात विवाह नाही हे त्याच्या पालकांना सांगणे हे सांगणाऱ्या व्यक्तीला किती दडपण आणणारे आहे ह्याची कल्पना येणार नाही. 


आज पत्रिकेतील अश्या ग्रहस्थिती बघूया जिथे  विवाहाचे सुख नाही .कदाचित ह्या विषयावरील विश्लेषण अभ्यासकांना उपयोगी पडेल असा विश्वास वाटते . विवाह म्हंटला कि शुक्र आलाच . आपण विवाह आपल्या मनाच्या पसंतीने करतो म्हणजे चंद्र आला . विवाहासाठी थोरया मोठ्यांचा आशीर्वाद लागतो म्हणजे गुरु हवाच , सप्तम भाव शुद्ध हवा , शेवटी विवाह होणार कि नाही हे ठरवणारा दशा स्वामी हवा . त्याच्याशिवाय घटना घडणे अशक्य. 


पहिली ग्रहस्थिती – मेष लग्नाला चंद्राची दशा आणि चंद्र वृश्चिकेत बुधाच्या जेष्ठा नक्षत्रात . बुध स्वतः भाग्यात असून केतूच्या मुळ नक्षत्रात केतू चतुर्थ भावात .इथे चंद्र बुधाच्या नक्षत्रात असल्यामुळे मुख्यत्वे बुधाची फळे देणार बुध ३ ६ ९ ४ हि स्थाने देत आहे जी विवाहाची नाही . त्यात भरीस भर म्हणून वैवाहिक सुखाचा कारक ग्रह शुक्र दशम भावात श्रवण नक्षत्रात जे वैवाहिक सुखात न्यूनता दर्शवते. दशम भावात शनी राहू अंशात्मक युतीत , शनी लाभेश लाभेश्याच्या व्ययात . पितृदोष , शुक्र दुषित , चंद्र अष्टम भावात , दशा स्वामी विवाहाच्या विरोधी भावाची फळे अश्या ग्रहस्थितीत चंद्राची दशा सोडून द्यायला लागेल तोवर वय होयील ४५ च्या आसपास . ह्या आधीची रवी आणि नंतर येणारी मंगळाची दशा सुद्धा विवाहासाठी पूरक नाही. 


दुसरी ग्रहस्थिती – शुक्र पत्रिकेत लग्नी मुलगा देखणा हुरहुन्नरी पण मंगळ केतू युती भाग्यात त्यात मंगळ सप्तमेश , त्यामुळे मंगळ शत्रुराशीत केतू सारख्या विरक्त ग्रहासोबत . राहूची दशा आणि राहू स्वतः तृतीय भावात गुरूची फळे देणार त्यामुळे राहुने ३ ६ आणि केतूच्या नक्षत्रात असल्यामुळे ९ स्थान पण दिले . हि सर्व स्थाने वैवाहिक सुख देणार नाहीत पुन्हा भौतिक सुखात कमतरता नाही पण ती उपभोगण्यासाठी सहचारिणी चे सुख मात्र वंचित ठेवले. 

अनेकदा अतिगंड योग , प्रामुख्याने विष्टी करण ह्यांच्या शांती करून घ्याव्यात असे माझे मत आहे जर ते योग पत्रिकेत असतील तर . पत्रिकेत शनी ( वक्री )चतुर्थ भावात ज्याची लग्नातील शुक्रा वर दृष्टी. शनीची दृष्टी म्हणजे विलंब आलाच . राहूची दश सोडून द्यावी लागणार कारण राहू विवाह देत नाही .त्याधीची मंगळाची दशा त्यात विवाह झाला नाही कारण मंगळ राहुच्याच नक्षत्रात पुन्हा तेच चक्र फिरणार . 

तिसरी ग्रहस्थिती – गुरूची दशा गुरु व्यय भावात आणि चंद्राच्या नक्षत्रात चंद्र स्वतः चतुर्थात वृषभ राशीत असला तरी फळे देताना तो तृतीय भावाची देत आहे , म्हणजे दशा स्वामी ३ आणि ६ स्थानांचा कार्येश झाला . कुंभ लग्नाला गुरु तशीही विशेष फळे देत नाही . ह्या पत्रिकेत विशेष म्हणजे शनी लग्नेश असून दशम भावात पण स्तंभी आणि त्याची दृष्टी सप्तम भावावर जो विवाहाचा मुख्य भाव आहे . 


अश्या अनेक ग्रहस्थिती बघितल्या कि इतर सुखांची रेलचेल दिसते पण वैवाहिक सौख्याला दृष्ट  लागलेली असते. नोकरी उत्तम , सगळच उत्तम असलेला मुलगा फोनवर बोलत होता. त्याच्या आवाजावरून आणि विचारात असलेल्या प्रश्नांवरून त्याला लग्न करायची किती तळमळ इच्छा होती ते जाणवले. पण पुन्हा तेच विवाहाचा योगच नाही .

अश्यावेळी काय बोलावे सुचत नाही . पण उमीद पे दुनिया कायम है ... खरच अश्यावेळी डोळ्यात पाणी येते . अहो ज्योतिषी हा सुद्धा तुमच्यातलाच एक आहे त्यालाही संसार मुले सुख दुक्ख आहेत . आपण सगळेच संसारी लोक असून लहान लहान इछ्या पूर्ण झाल्या तरी खुश होतो , फार मोठे काही मागायचे नसते आपल्याला , फक्त आयुष्याच्या संध्याकाळी आपल्या मुलांचा संसार नांदताना डोळे भरून पहावासा वाटतो .हि इतकीही इच्छा पूर्ण नाही का करणार महाराज आपली असे मनात येत राहते. 


त्याची पत्रिका मिटली आणि देवाजवळ प्रार्थना केली , आयुष्याची सुरवात आहे ह्या मुलांची असा राग धरू नकोस रे बाबा त्यांच्यावर देऊन टाक त्यांना काय हवे ते आणि पडूदेत अक्षता सर्व विवाह करणाऱ्या सर्व मुला मुलींच्या डोक्यावर ...पालक डोळ्यात प्राण आणून त्या क्षणाची वाट पहात आहेत बाबा. महाराजांनी लेकीची हि मागणी ऐकावी इतकीच विनम्र विनंती आहे त्यांच्या चरणी .

सौ. अस्मिता दीक्षित 

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230 


  



फक्त एक निम्मित्त ( राहूची खेळी यशस्वी झाली )

 || श्री स्वामी समर्थ ||


एक विचित्र घटना एका कुटुंबात घडली . अनेक वर्षाचा संसार अपत्य काहीच कमतरता नाही. आता नवरा बायको मध्ये वाद हे कधीतरी होणारच आणि ते झाले कि सुख अजून वाढतेच. पण घरातील स्त्रीला घरात काहीतरी एक गोष्ट अचानक समजली ज्याच्याबद्दल तिला पुसटशी माहिती नव्हती . ह्याबद्दल इथे अधिक लिहिणे उचित होणार नाही म्हणून लिहिता येत नाही . पण ते महत्वाचे नसून महत्वाचे हे आहे कि ती घर सोडून गेली .राहूची खेळी यशस्वी झाली .

पत्रिका पाहिल्यावर काय दिसले असेल ते तुमच्या लक्ष्यात आलेच असेल. गैरसमजाचे आणि मनात शंका आणि संशयाचे वादळ निर्माण करणारा “ राहू “ पत्रिकेत चांगलाच active होता त्यात दशा राहुचीच पूरक होती . इतक्या वर्षाचा संसार क्षणात मोडायची वेळ आली तर काय चित्र असेल ह्याची कल्पना करता येणार नाही . राहू ची दशा अजून बरीच वर्षाची आहे असे दिसले. राहूच्या दशेत झालेले नाते संबंधातील गैरसमज हे उग्र स्वरूप धारण करतात आणि राहू ते गैरसमज तसेच ठेवून त्यांच्यातील दुरावा कायम ठेवण्यात माहीर आहे. 


राहू हा बेमालूम फसवणारा आहे तुम्हाला काहीही कळायच्या आधीच तुम्ही फसलेले असता किंवा गैरसमजाचे भूत डोक्यात घोंघावत असते . त्यातून बाहेर येणे अशक्य असते. 

सुरळीत चाललेल्या आयुष्यात मोठा धक्का बसावा असे झाले . चतुर्थ भावात राहू आणि त्याचा भावेश शनी तृतीय भावात म्हणजे तो तृतीयाचीही जोरदार फळे देणार आणि तसेच झाले . सुनबाई घरातून निघून गेल्या . 

फक्त संसारात नाही तर आपल्या जवळच्या नात्यात एकंदरीत पारदर्शकता हवी तरच नाती टिकून राहतात नाहीतर उध्वस्त व्हायला वेळ लागत नाही . एकदा विश्वास उडाला आणि मन मेले कि पुन्हा सुर जुळत नाहीत तसेच काहीसे ह्या घटनेबाबत झाले. दोघांच्याही पत्रिकेत शुक्र बेताचेच सुख देणारा पण तरीही राहू समोर कुणाचेही चालत नाही .

आयुष्यात फक्त एक निम्मित्त झाले आणि कुटुंबातील माणसांत दरी निर्माण झाली. राहुने आपला डाव साधला . नुसती कुटुंबात नाही तर कुटुंबातील माणसांच्या मनात निर्माण झालेले गैरसमज निर्माण करणारा हा राहू आत्ताच कसा काय आपला डाव साधण्यास आला. ह्यालाच म्हणतात राहू दशा . काळ आणि वेळ कुणाला सांगून येत नाही त्यामुळे माणसाने उपासना आणि आपली कर्म शुद्ध ठेवावी . 

ह्या केस मध्ये पत्नी परत येणे कठीण आहे पण आलीच तर आयुष्यभर मनात संशयाची सुई घेवून वावरेल ज्याला खरच काही अर्थ असेल ? आपली सून माप ओलांडून घरात आली कि ती आपली झाली . तिचे कुळ बदलले . आपल्या मुलाच्या संसारात सुखाचे क्षण वेचणारी आणि त्याच्या आनंदासाठी ती आली आहे त्यामुळे तिच्या सोबत नात्यात कुठेही लपवा छापवी नको . तिच्याच नाही तर एकंदरीत नाती सहज सरल असावीत. 

ह्या जगात अनेक लोक आहेत जे बिचारे एकटे एकटे आहेत , त्यांना कुणीही नाही . म्हणूनच ज्यांची आपली माणसे आहेत , घरात गोकुळ आहे त्यांनी त्याची किंमत आणि जाणीव ठेवून तसे वागावे म्हणजे असे प्रसंग उद्भवणार नाहीत .

राहू हा राक्षस आहे आणि तुमचा नातेवाईक अजिबात नाही . राहूची दशा ज्यांनी भोगली असेल त्यांना हे समजेल. 


रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग अशी स्थिती होते कारण रोज नवीन व्याप आणि डोक्याला ताप . एखाद्या गजर्यातून  फुले निखळून पडावी अशी नाती आणि संबंध रोज = एक एक करून आपल्यापासून दूर जातात तीही केवळ एका गैरसमजाने जो आपण दूर करण्यात अयशस्वी ठरतो . राहू हि अदृश्य शक्ती आहे आणि जन्मभराची नाती एका गैरसमजामुळे कायमची तुटतात तेव्हा राहूच्या ताकदीचा अंदाज आपल्याला येतो . आपण काहीही करू शकत नाही . राहू हा तळतळाट आहे . पूर्वजन्मीचा शाप .महादेवाचे वरदान घेवून नवग्रहात आपली बैठक मांडणारे राहू केतू . आपल्या आयुष्याचे पूर्वीच्या अनेक जन्मांशी संधान बांधणारे राहू केतू . आयुष्यभर आपल्यासोबत वावरणारी आणि “ मी तुला चांगली ओळखते किंवा ओळखतो “ असे म्हणणारी आपलीच माणसे क्षणात परकी होतात कशी काय ? हीच तर आहे राहूची जादू . भ्रमित , संभ्रमित करणारा राहू कितीही सतर्क राहिलात तरी आपला डाव साधतोच .

आज राहूचे शततारका नक्षत्र आहे . पत्रिका बघताना राहू रुलिंग ला होताच

सौ. अस्मिता दीक्षित 

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230


Sunday, 13 July 2025

हृदयाचा बायपास

 || श्री स्वामी समर्थ ||



विचारातून होते आजारांची निर्मिती . मला कसलेही टेन्शन नाही स्ट्रेस नाही असे कितीही म्हंटले तरी ते असतेच. हा न दिसणारा स्ट्रेस अनेक मोठ्या आजारांची नांदी करतो. मी किती सुखी आहे हा मुखवटा घालून जगण्याची धडपड प्रत्येकात दिसते. आजची बदललेली जीवनशैली , आहार ह्या गोष्टी आजारांना कारणीभूत आहेत . आज फक्त वयातीत लोकांत नाही तर अगदी लहान वयातील तरुणाई मध्ये सुद्धा प्रचंड स्ट्रेस आहे आणि त्यातून असमाधान , उदासीनता , एकटेपणा , एकलेपणा , मानसिक अनारोग्य अश्यासारख्या गोष्टी फोफावत आहेत . कुणाकडे मन मोकळे करावे हेच समजत नाही कारण कुणी आपले वाटावे हा विश्वासच कुणाबद्दल मनात नाही . नात्यातील दिवसागणिक वाढत जाणारी दरी प्रत्येकाला मी आणि माझे कुटुंब ह्या कोषातच अडकवत आहे . एकमेकांची सुख दुखे वाटून घेण्याचा काळ मागे सरत आहे आणि त्यामुळे मनाच्या आजारांची समस्याही वाढत आहे. मन स्थिर नसेल कि त्याचा परिणाम आरोग्यावर झाला नाही तरच नवल. 


पूर्वीच्या काळी लोक शारीरिक कष्ट खूप करत असत . रोज नियमित व्यायाम , धावणे चालणे , घरातील कामे जसे अगदी जात्यावर दळण , घरातील अनेक कष्टाची कामे स्त्रिया स्वतः करत त्यामुळे त्यांचे शरीर आजारांना थाराच देत नसे. आजकाल सकाळी लवकर न उठणे हे सुद्धा अनेकांना भूषणाव वाटावे अशी स्थिती आहे. जगाचा चालक मालक पालक सूर्य असा आळशी झाला आणि वेळेवर आलाच नाही तर ? अवकाशातील ग्रह तारे आपल्या दैनंदिन आयुष्याला शिस्त लावण्याचा प्रयत्न करत आहेत . विचार करण्यासारखी गोष्ट आहे . सूर्योदय येण्याच्या आधी चरचर सृष्टी त्याच्या स्वागताला तयार असते आणि आपण ? सकाळचा सूर्यप्रकाश किती महत्वाचा असतो ह्यावर भाषण द्यायचे पण उठायचे मात्र नाही हे सत्य आहे. 

पूर्वीच्या काळी मधुमेह , थायरोईड , B12 ची कमतरता हे ऐकायलाही मिळत नव्हते कारण योग्य आहार आणि चौकटीतील दैनंदिनी ., भरपूर आणि शांत झोप , माणसामाणसातील प्रेम , व्यायाम , सुधृड शरीरयष्टी आणि उत्तम पचनसंस्था . आजकाल कधीही उठा , पोट भरून घेण्याच्या नावावर  समोर येईल ते पोटात ढकला . पण ह्या सर्वांचा दूरगामी परिणाम तब्येती आपल्याही नकळत होत असतो . 

बदललेल्या जीवनशैलीत अपुरी झोप , रात्री झोप येत नाही म्हणून मोबाईल वरती सर्फिंग करत राहणे जो मेंदूच्या आजारांचा  धोका वाढवतो , दृष्टीवर परिणाम करवतो , अति विचार मनाला सैरभैर करतात . रात्री झोपताना १० मिनिटे मेडीटेशन केले तर आपण सोशल मिडीयावर नाही म्हणून मुंबई पुणे बंद नाही होणार . 

आज आपण हृदया संबंधी आजारांची ज्योतिष शास्त्रीय कारणे बघुया . एखाद्या गोष्टीची चिंता मागे लागणे म्हणजे विचारांचा ( toxic ) गुंता मनात असणे. मन म्हणजे चंद्र आणि चंद्र प्रामुख्याने दुषित झाला तर मन सैरभैर होते . चंद्र शनी युती , चंद्र राहू /केतू युती त्रासदायक . अनेक वेळा गोष्टी अपेक्षेप्रमाणे घडत नाहीत आणि मग संताप चिडचिड , अपेक्षाभंग ह्यामुळे मन उदास निराश होते . आरोग्याचा विचार आपण रवी ह्या ग्रहावरून करतो. काल पुरुषाच्या कुंडलीत पंचम भावात रवीची सिंह राशी येते त्यावरून आपण आपले मन हृदय बघतो . चतुर्थ भावावरूनही अनेक जण हृदय बघतात . 


शरीरातील रक्ताभिसरण हे प्रामुख्याने शनी आणि रवी ह्यांच्याकडे आहे . पत्रिकेतील शनी मंगळाचा कुयोग तसेच दृष्टी संबंध बायपास ची स्थिती निर्माण करू शकतो त्याला पूरक गोचर भ्रमण आणि दशा असेल तर शक्यता बळावते . गोचर राहू केतू ह्यांचाही विचार करावा लागतो .


शनी हा आकुंचन आणि प्रसरण करणारा आहे . आपले हृदय सुद्धा आकुंचन प्रसरण ह्या क्रिया सातत्याने करत असते . रक्तामध्ये ब्लॉक म्हणजे अडथळा निर्माण झाला तर रक्ताचा प्रवाह विस्कळीत होतो आणि हृदयविकार होण्याचा धोका वाढतो. मनस्ताप देणारे किंवा मृत्यू सम पिडा देणारे अष्टम भाव ( शस्त्रक्रिया )आणि १२ वा भाव ( दवाखाना , वैद्यकीय उपचार ) , दुषित शनी रवी जर पत्रिकेत असतील आणि ६ १२ च्या दशा अंतर्दशा असतील तर बायपास करण्यास पूरक ग्रहस्थिती समजावी . शस्त्रक्रिया म्हणजे मंगळ आलाच . चंद्र हा मनावर आणि पर्यायाने आरोग्यावर परिणाम करतो म्हणून बायपास शस्त्रक्रियेच्या दिवशी चंद्र हा स्थिर तत्वाच्या राशीत असावा. 

प्रामुख्याने शनीचे कार्य हे हृदयाच्या झडपांची उघडझाप करण्याचे आहे. तिथे शनी बिघडला तर नलीकांच्या मध्ये अडथळे निर्माण होतात. शनी हा प्रत्येक गोष्टीत विलंब करणारा ग्रह आहे त्यामुळे शनीमुळे झालेले आजार हे दीर्घकालीन असतात . शनीचा प्रभाव सूर्य त्याचसोबत ४ ५ आणि रोगांचा भाव ६ वा तपासावा लागतो .

शनीची दशा असेल आणि शनीचा संबंध ५ ,६ व्या भावाशी असेल तसेच शनी सिंह नवमांशात असेल तरीही हृदयासंबंधी विकार होण्याची शक्यता असते. तापट व्यक्तींच्याही पेक्षा वरून शांत दिसणाऱ्या व्यक्ती जास्त प्रमाणात ह्या विकारांना आजारी पडतात . वरवर शांत असतात पण अंतर्मनात खळबळ असते . म्हणून धबधब्यासारखे माणसाने मोकळ्या मनाने बोलले पाहिजे . वृश्चिक राशीतील बुध हा व्यक्तीला मूक अबोल करतो त्यांच्या मनात विचारांचे द्वंद्व सतत चालू असते आणि त्यात ते कुणाला बोलून मोकळेही होत नाहीत . गमतीने त्यांना आपण आतल्या गाठीचे म्हणतो पण त्यांच्यातील हा दोष अनेक विकारांना प्रेरित करतो. अष्टम भावातील शनी , मंगळाचे गोचर महत्वाचे किंवा मूळ पत्रिकेतील शनी मंगळ कुयोग दुष्टीयोग त्रासदायक होतोच . शनी दशा , अष्टम भावातील शनी तसेच राहू दशा आणि शनी मंगळ राहू चा पंचम भावाशी असलेला संबंध .

थोडक्यात पत्रिकेतील शनी राहूचा रविशी कुयोग , साडेसाती अष्टम शनी , मंगळ,. ४ ५ ६ ८ १२ भाव दुषित , ८ १२ भावाची दशा किंवा शनी दशा आणि शनीचा चंद्राशी संबंध “ बायपास “ सारखे मोठे आजार देवू शकतो .


उपासना : मन मोकळे जग , सात्विक आहार , झोप पूर्ण घ्या आणि सगळ्यात मुख्य म्हणजे कटपुतली बाहुलीसारखे कुणाच्यातरी दडपणाखाली जगू नका . मोकळ्या आकाशाखाली मस्त जगा . आदित्य हृदय स्तोत्र  , हनुमान चालीसा , शनीचा बीजमंत्र , सकाळी सूर्याला अर्घ्य घालणे आणि योग मेडीटेशन ह्यामुळे आपल्या पत्रिकेतील ग्रहांना बळ मिळेल. 

ज्योतिष शास्त्राला कुणी कितीही नावे ठेवली तरी नित्य सूर्योदय होतोच आणि सृष्टीच्या अंतापर्यंत होतच राहणार . म्हणूनच आपली पत्रिका काही प्रमाणात आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे अगदी सर्वार्थाने .


सौ. अस्मिता दीक्षित 

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230