Wednesday, 21 May 2025

शनी च्या कृपेस पात्र व्हा

 || श्री स्वामी समर्थ ||

लहान पण आपण एक खेळ खेळत असू आठवतंय ? डोंगराला आग लागली पळा पळा पळा.... त्या शनी देवांची अशीच अवस्था करून ठेवली आहे ह्या पृथ्वीवर . शनीची इतकी बदनामी करून ठेवली आहे . साडेसाती पनवती दशा आली कि नुसती पळापळ , दिसेल त्या मारुतीच्या मंदिरात बरणी भरून तेल , ह्या ज्योतिष कडून त्या ज्योतिषाकडे धाव ,काय चाललाय काय हे ?  शनी काय खाणार आहे कि काय आपल्याला ? शनी साडेसाती पनवती आली कि मारुतीला प्रदक्षिणा घालायच्या ऐवजी ज्योतिषाच्या घराच्या पायर्या झिजवतात . नुसती पळापळ चालली आहे. आयुष्यात कधी त्या मारुतीकडे पहिले नाही त्याच्या डोक्यावर तेलाच्या बाटल्या आता कश्याला ओतायच्या ?  कारण आपण केलेल्या सर्व चुकांची छबी आपल्याच चेहऱ्यावर उमटते आहे . आपण गेल्या ३० वर्षात काय दिवे लावले आहेत ते सगळे आठवते आणि मग उडते ती घाबरगुंडी आणि रात्रीची झोप. आता आपली खैर नाही हे बरोबर त्यांना माहित असते त्यांनी गेल्या ३० वर्षात अगणित चुका केलेल्या आहेत . चुकीची कर्म केलेली आहेत . जे सरळमार्गी उपासना करणारे आणि कुणालाही न फसवता अहंकार विरहित जीवन जगणारे आहेत त्यांना घाबरण्याचे करणच नाही आणि ते शनीला शरण आहेत त्यामुळे त्यांना शनी देव कश्याला त्रास देतील . उलट आता त्यांना ते बक्षीसच देतील नाही का?

मारुती काय आणि शनी काय आपल्याला कुणीही नीट समजलेच नाही किबहुना त्यांना आपण समजून घेण्याचा कधीही प्रयत्न केलाच नाही . असाल तिथे नाम घेणे हीच साधना आहे, खर सांगा करतो का आपण ती ? जरा वेळ मिळाला कि मोबाईल हातात आणि मग insta , फेसबुक सगळे दिमतीला हजर. उपासक जन्माला यावे लागतात असे म्हंटले जाते. देवासाठी वेळ नाही आपल्याला . देवाशी व्यवहार करणारे साधक त्याला कसे आवडतील. मुलाचे लग्न व्हावे म्हणून हनुमान चालीसा कुलदेवीची ओटी ..पुढे काय ? लग्न झाले हुश्य सुटलो एकदाचे आता कसा मारुती नि कसली देवी . ऐकवायला वाचायला आवडणार नाही पण हे कटू सत्य आहे. 

ताप आला कि कशी चार दिवस औषधे घेतो तसेच काम झाले देवतेला टाटा. अनेक उदा अशी बघितली आहेत . काल एका जातकाने फोन केला तुम्ही सांगितले होते १५ मे नंतर सर्व चांगले होईल अजून काही नाही झाले . मी म्हंटले 15 मे ला किती दिवस झाले अवघे 5 . कठीण आहे. देव जणू घड्याळ लावूनच बसले आहेत १६ च्या सकाळी ह्याचे काम करायला.

आपण केलेली उपासना नामस्मरण जे काही करू ते कधीही अनाठाई जात नाही .आपली आधीची काही चुकीची कर्मे  ती धुण्यासाठी ती उपयोगी पडते . उपासनेचे मर्मच मुळी संयम आहे. शनी च्या कृपेला मी पात्र कसा ठरेन असे विचार आपल्याला उपासनेची महाद्वारे उघडून देतील. मुळात जे काही करू ते मनापासून . 

देवता आपण केलेली उपासना , मन नाही बघत तर आपला हेतू पाहते . हेतू स्वछ्य स्पष्ट असेल तर ती फलित होणारच. चांगल्या हेतूने मागितलेल्या कुठल्याही गोष्टीच्या पूर्ततेसाठी परमेश्वर अनंत हाताने मागे उभा राहतोच राहतो. 

अखंड विश्वात एका धुळीच्या काणाचेही अस्तित्व नाही आपले मग गमजा किती आपल्या. मोठमोठ्या वल्गना , मी असा मी तसा . सतत मनात द्वेष , मत्सर ,निर्भत्सना , राग , दुसर्याचे वाईट करण्याची वृत्ती .पण हे सर्व परतून आपल्याच कडे परत येणार आणि म्हणूनच मग घर अशांत कारण मनात अशांतता . सतत दुसर्यावर जळण्याची , कुणाचेही चांगले न बघण्याची वृत्ती मग आपले तरी कसे चांगले होणार .

शनी आपल्या आत आहे . शनी आणि गुरूच्या राशी बघा आयुष्याच्या संध्याकाळी भेटतात आपल्याला , कारण वयाच्या पन्नाशी नंतर  मनाने वृत्तीने जरा परिपक्व व्हा हेच त्यांना सुचवायचे असते . पण आपण बालीशच राहणार . आपल्याला ह्या अध्यात्माची खोली कधी न उमजणार न कधी ते समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार म्हणूनच म्हंटले आहे ना मनुष्य जन्म मिळणे कठीण आणि तो सार्थकी लागणे त्याहून कठीण. 

नामस्मरणाची मजा लुटता आली पाहिजे , त्या परमेश्वराला आपल्यात सामावून घेता आले पाहिजे निदान तसा प्रयत्न पाहिजे , सतत नाम घेत राहणे आणि आयुष्यातील बदल अनुभवणे हेही प्रारब्धात असावे लागते. योग खेचून आणावे लागतात , महाराजांना आपल्याला एखादी गोष्ट द्यावीच लागते अर्थात ती योग्य असेल तर पण तितकी श्रद्धा बळकट करावी लागते. सारखे त्या शनीवर आग पाखडून कसे चालेल ? जे चंद्र नाही देवू शकत ते शुक्र देयील आणि शुक्र नाही देणार ते बुध . ग्रहांची खासियत वेगवेगळी आहे म्हणूनच आपल्या आयुष्यात हि नवग्रहांची पालखी मिरवत आली तर आयुष्याचा सोहळा होणारच होणार . कुठलाही ग्रह आपल्याच पाप पुण्याचा आरसा आहे. मग त्यांना दोष का? एकदा का साडेसाती संपली कि शनी ला विसरून पुन्हा आपण वाटेल तसे वागायला मोकळे असेच चित्र आणि व्यवहार असतो आपला. 

कलियुगात देवाचे अस्तित्व जाणवण्यासाठी मनापासून प्रयत्नशील राहणे सतत नाम घेणे हा एकच पर्याय आहे आणि तो सहज सोपा आहे. पुन्हा करोना किंवा त्याचा भाऊ आला काय करणार आपण . सतत भीतीच्या छायेत वावरणार का आपण , सततचे दडपण आपले शरीर पोखरून अनेक रोगांना आश्रय देतय हे लक्ष्यात येतंय का आपल्याला ? नामाने विचारांची शुद्धता होईल , भीती दडपण , पडणारी वेडी वाकडी स्वप्ने बंद होतील . कुणाच्या अश्रुना कारणीभूत ठरू नका , कुणाची निंदा नालस्ती , अत्यंत खालच्या दर्ज्याचे राजकारण नको , सुडाची बुद्धी नको , कुणाला हसू नका चेष्टा नको , पुढील वळणावर आपल्याही आयुष्यात काय घडणार माहित नाही आपल्याला . 

हनुमान चालीसा २१ दिवस रोज २१ वेळा म्हणा आणि अनुभव घ्या. कुठलाही आजार असो त्याचे मुळासकट उच्चाटन होईल., आत्मविश्वास द्विगुणीत होईल. प्रश्नाची उत्तरे मिळतील आणि जगायचे सामर्थ्य मिळेल . इतकुसा जीव आपला किती उड्या मारणार आपण . श्रीरामाचा जप करा त्याना आणि मारुती रायाला समोर बसवा आणि मनापासून शरणागती पत्करून हनुमान चालीसा आनंदाने तालासुरात म्हणा . जीवन बदलून जायील ह्यात शंका नको . 

शनी च्या एका कृपा दृष्टीसाठी आयुष्य त्याच्या चरणावर समर्पित करा ... ओम शं शनैश्चराय नमः 

सौ. अस्मिता दीक्षित 

पत्रिका मार्गदर्शन : 8104639230

    



No comments:

Post a Comment