Sunday, 26 April 2026

शरणागती

 || श्री स्वामी समर्थ ||


आयुष्य ओंजळीतून निघून जाताना देवाची आठवण येते. आयुष्याच्या संध्याकाळी सगळा अहंकार नेस्तनाबूत होतो. आपण किती हतबल आहोत ह्याची मनोमनी जाणीव होते आणि खात्रीही पटते . मोठ्या गुर्मीत वावरणारे आपण आयुष्यभर ह्याला कमी लेख त्याची निंदा कर , संपत्तीचा अभिमान , पैशाचा माज , आपल्या कर्तुत्वाचा गर्व अश्या अनेक गोष्टीतून कधी बाहेरच येत नाही. पण एकदा तरी तो आपल्याला आपली जागा दाखवतो आणि ती अश्या प्रकारे दाखवतो कि बस्स..

आपण एकटे येणार आणि एकटे जाणार पण हे माहित असूनही आपल्या अणुरेणूत भिनलेला आहे प्रचंड महाकाय अहंकार . आपण सगळे एकाच बोटीतील प्रवासी आहोत . खोट्या पाशात अडकलेले आणि मोह माया हेच जग समजणारे. जगण्याची खरी लज्जत काय आहे ते आपल्याला दाखवते ते अध्यात्म जेव्हा दुक्ख संकटे गळ्यापर्यंत येतात आणि आपल्याच असहाय्यतेची जाणीव होते. ना रक्त तयार करू शकत आपण ना पाऊस पाडू शकत , पडलेला पाऊस ना थांबवू शकत . कुणाचा जन्म ना मृत्य काहीच हाती नसतानाही इतका अहंकार जन्मभर आपल्या सोबत प्रवास करत असतो. 

जीवन बदलण्याचा एकमेव मार्ग म्हणजे नामस्मरण , सेवाभाव . ह्यामुळे आपल्याला नवीन जीवन प्राप्त होते. नामस्मरण जीवनाचा आणि पर्यायाने आपलाही कायापालट करत , आपलीच आपल्याला नव्याने ओळख होते आणि समर्पणाची भावना निर्माण झाली कि तो आपल्या मागे अनंत हाताने उभा राहतो त्याची प्रचीती सुद्धा येऊ लागते.

ज्योतिष आणि अध्यात्म ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत . अध्यात्मात गेल्यावर मागे वळून पाहायचे नाही कारण आता त्यांच्या शाळेत नाव घातले आहे .मग त्यांच्यावर निस्सीम भक्ती आणि सेवा करत रहायची. आपल्याला काय कधी द्यायचे ते तेच ठरवतील. 

आपल्या कर्माचा कारक शनी आहे आणि म्हणून दशम भावात त्याची नेमणूक आहे जो कर्माचा भाव आहे. आपल्या कर्माचा लेखाजोखा त्याच्याकडे प्रत्येक क्षणी आहे कारण तो आपल्या आतच आहे. आपली कर्म आणि ग्रह हे एकमेकांना पूरक आहेत . ग्रह कर्माची फळे देण्यास बांधील असतात त्यामुळे त्यांना दोष देण्यात अर्थ नाही दोष असेल तर तो आपलाच आहे. 

हनुमान जयंती हा समर्पणाचा दिवस आहे. हनुमानाकडे काय मागायचे ?????? जशी तुझी श्री रामावर श्रद्धा आहे तुझ्या आयुष्यात आणि हृदयात त्यांचे स्थान आहे तसेच माझ्याही मनात माझ्या गुरूंचे महाराजांचे स्थान असुदे. माझी श्रद्धा बळकट होवूदे आणि जीवन त्यांच्याच चरणी समर्पित होवूदे.

इतके मागायचे आणि श्री हनुमान कसे रामाचे भक्त आहेत तसे आपणही आपल्या सद्गुरूंचे निस्सीम भक्त होण्यासाठी त्यांच्या चरणी शरण जायचे. कसलीही चिंता काळजी उरणारच नाही कारण आपला प्रपंच ते चालवणार मग आपल्या हाती उरलेच काय ? चिंता आपल्याला जाळत असते तीच निघून गेली कि आपण भक्तीमध्ये आपला जन्म घालवायला मोकळे .

आयुष्यात असा क्षण येतो जिथे कुणीच आपले रहात नाही त्यावेळी आधार असतो तो प्रत्यक्ष परमेश्वराचा जो चराचरात आहे. प्रश्न आहे तो त्याचे अस्तित्व मान्य करण्याचा आणि त्याने सांगितलेल्या मार्गावर अहंकार विरहित जीवन जगण्याचा . जगण्याचा आनंद प्रत्येक गोष्टीतून मिळायला लागतो. नुसते घेणे नाही तर देणेही होवू लागते . त्याच्या भरवश्यावर जीवन जगण्याची कला आत्मसात केली आणि शरण गेलो तर आयुष्यात काहीही कमी नाही.

इथून काहीच घेवून नाही जायचे आपल्याला त्यामुळे अंतिम क्षणापर्यंत आणि पुढील प्रवासात त्याचा हात घट्ट धरून ठेवायचा आहे. त्यांचे अस्तित्व जाणवल्याशिवाय राहत नाही आणि जीवन सुकर होते.

एकदा का मनाने आपण त्यांचे झालो कि क्षणोक्षणी प्रचीती देणारे तेच आहेत आणि त्याची दिव्य अनुभूती मिळाल्याशिवाय राहत नाही हे निश्चित आहे .   आपला अहंकार मुळापासून उखडून टाकण्यासाठी परिस्थितीही तेच निर्माण करतात आणि भक्तिमार्गाकडे आपले मन आपल्याही नकळत ओढले जाते हि त्यांचीच लीला आहे. 

फक्त अंतर्मनापासून आपल्या चुकांची कबुली आणि शरणागती आपले आयुष्य नक्कीच बदलून टाकेल ह्यात शंका नाही. केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे .

हनुमान चालीसा अंतर्मानापासून पठण केली तर त्याचे शुभ परिणाम मिळतीलच. धैर्य , आयुष्य जगण्यासाठीचे बळ, आत्मविश्वास सगळ्यात वृद्धी होईल. 

हनुमान चालीसा म्हणण्यापूर्वी श्री रामाचा जप करायला विसरू नये कारण प्रत्यक्ष हनुमानाने सांगितले आहे जिथे राम आहे तिथे मी आहे. तसेच मंगळवारी मारुतीच्या देवळात जाऊन शेंदूर मिश्रित तेल त्याच्या पायावर अर्पित करावे .

जय जय जय हनुमान गोसाई, कृपा करो गुरुदेव कि नाई |

जय हनुमान 

सौ. अस्मिता दीक्षित 

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230

असेही एक वादळ

 || श्री स्वामी समर्थ ||


परवा एक स्त्री पत्रिका दाखवताना स्पष्ट म्हणाली , मी खूप सहन केलय आता मात्र मी ह्यांच्यासोबत राहू शकणार नाही. मी तिला म्हंटले आपण दोघांच्याही पत्रिका बघुया आणि मग विचार करू तर म्हणाली विचार झालाय करून माझा . एकदम तप्त वातावरण झाले होते . असो. 

दोघांच्याही पत्रिका बघितल्या . घटस्फोट होईल अशी मूळ ग्रहस्थिती नव्हती . विवाहाला बरीच वर्ष झाली होती आणि संतती सुद्धा होती. आर्थिक स्थैर्य होते , कुणाचे बाहेर काही प्रकरण नव्हते मग कारण काय तेही समजेना. तिचे म्हणणे असे कि नवरा घरात वेळ देत नाही . इतक्या कारणावरून कुणी वेगळे होते का. पण ऐकून घ्यायची मनस्थिती नव्हती . 

सध्याची त्यांची ग्रहस्थिती हि अर्थात बरी नव्हती , एकमेकांच्याबाबत संशय घेणारा राहू नाक खुपसत होता आणि मंगळ जरा जास्तीच प्रबळ होवून हमरीतुमरीवर आलेला होता. आता त्या जातकाची ऑफिस ची परीक्षा होती आणि त्या लेखा परीक्षेत तो पास झाला तर पुढे हुद्दा आणि पगार दोन्ही वाढणार होते . गेले दोन वर्ष घर काम सर्व सांभाळून तो अभ्यास करत होता पण हिचे काहीतरी भलतच .

सांगायचे तात्पर्य असे कि हे रामायण गोचर ग्रहस्थिती विकोपास गेल्याने घडत होते आणि ते कालांतराने शांत होणार होते ते समजत होते पण तोवर हिला धीर धरणे आवश्यक होते . नवरा सतत घराबाहेर असतो , घरात कुठल्याही गोष्टीत लक्ष नाही , निट जेवत नाहीत , अश्या अनेक रोजच्या जीवनातील न संपणाऱ्या कुरबुरी ती सांगत असताना एक जाणवले कि तिचा त्याच्यावर राग नाही प्रेमच आहे . आपले माणूस सतत डोळ्यासमोर असावे असेच तिला वाटते पण सहवास लाभत नाहीय आणि संवाद सुद्धा हरपला आहे त्यामुळे ती कंटाळली आहे. खरेतर संसाराला इतकी वर्ष झाल्यावर असा पोरकट पणा शोभत नाही . मनोमन हसायला येत होते . काही दिवस थांबून मग बघूया असे सांगून तात्पुरती तरी मी तिची बोळवण केली. म्हणाली आज काय आणि उद्या काय फरक नाही पडणार मी होणार वेगळी माझे ठरले आहे असे म्हणत फोन ठेवला ..ठेवला कसला आपटला .

सप्तम स्थानाशी राहूचा संबंध आणि षष्ठ भावाची अंतर्दशा .अनेक ग्रहस्थिती त्यांना एकमेकांपासून दूर ठेवत होत्या पण म्हणून घटस्फोट होईल असे नाही. मुळात त्यांच्यात एकोपा , सहजीवनाचा आनंद देणारे आणि घेणारे ग्रहमान होते म्हणून तर संसाराची गाडी इथवर आलेली होती. त्यामुळे अश्या वेळी ग्रहस्थिती बदलायची वाट बघणे हा एकच उपाय होता . काही महिन्यांनी तिचाच फोन आला म्हणाली आम्हाला नवीन घर घ्यायचे आहे दोघांच्याही नावावर . ह्यांचा पगार वाढलाय आणि आता आम्हाला कर्ज पण मिळतंय . मला काही विचारायची गरज लागली नाही . अंतर्दश बदललेली होती. फोन ठेवताना तिचा स्वर सद्गदित झालेला जाणवला . थोडक्यात निभावले म्हणायचे.

कधीतरी जीवनात नात्यांमध्ये वादळ येते , पण ते येते आणि जाते , त्या मधल्या काळात संघर्ष असतो , पण म्हणून नाती तोडायची नाहीत हे एकदा मानाने ठरवले कि सगळे सोपे होवून जाते . 

आयुष्य प्रत्येक क्षणाला बदलते आणि नवनवीन आव्हान सुद्धा घेवून येते . संसाराला काही वर्ष झाली कि तो लोणच्यासारखा मुरतो असे म्हणतात आणि नवरा बायको एकमेकांच्या सारखे दिसतात असेही ऐकले आहे . जीवनात गोडवा तेव्हाच टिकून राहतो जेव्हा उतरत्या काळात सुद्धा आपण आपल्या जोडीदाराचा हात सोडत नाही. संसार म्हणजे तडजोड आणि अर्थात संयम सुद्धा .

शुभं भवतु . 

सौ. अस्मिता दीक्षित 

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230

घटस्फोट

 || श्री स्वामी समर्थ || 

विवाह हि घटना आयुष्याला खर्या अर्थाने अर्थपूर्ण करणारी , जीवनात प्रीतीचे , सौख्याचे रंग भरणारी आहे. हे रंग प्रीतीचे असतील तर सौख्य प्राप्ती होयील पण अनेकदा ते जीवनात वैफल्य आणणारे असतात . आजकाल घटस्फोटाचे प्रमाण वाढत आहे . त्याला आधुनिक काळातील अनेक गणिते कारणीभूत आहेत . मुलांचे वैचारिक , आर्थिक स्वातंत्र आणि संपलेला संयम हि प्रमुख कारणे वाटतात . दिल्या घरी तू सुखी राहा हा आईचा पाठवणी करताना दिला जाणारा मंत्र जणू काळाच्या पडद्याआड गेल्याचे जाणवते .

विवाह सुखासीन होण्यासाठी दोघानाही सारखीच मेहनत आणि योगदान असले पाहिजे . अनेकदा दोन्ही कडील घरच्या मंडळींचे नको त्या गोष्टीत नाक खुपसणे कारणीभूत ठरते. विचारांचे अति स्वातंत्र सुद्धा भोवते .

आज ह्याबाबत काय ग्रहस्थिती असावी ह्यावर विचार करुया .

सप्तम भाव हा प्रणयाचे अंकुर फुलवणारा भाव आहे . धाक दाखवून जबरदस्ती करून मिळणारे प्रेम खर्च प्रेम असते का? म्हणूनच ह्या भावात पापग्रहांचे काहीच काम नाही . इथे चंद्र शुक्र ह्या कोमल ग्रहांचा अंकुश हवा . मंगळ काही अंशी हवा कारण तो आकर्षण प्रणय दाखवतो . पण पापग्रहांच्या विळख्यात सप्तम भाव आणि सप्तमेश मात्र त्यांचे मूर्त स्वरूपाच हरवून बसतील.  लग्नी मंगळ ,सप्तमात वक्री हर्शल ,सप्तमात वक्री मंगळ तसेच शुक्र हर्षल युती ,शुक्र लग्नी सप्तमात हर्शल , शुक्र आणि सप्तमेश वक्री ,सप्तमेशाची हर्शल ची युती हि ग्रहस्थिती बोलकी आहे.


पंचमातील गुरु थोडा व्यभिचार दर्शवतो . लग्नात शनी हर्शल युती , हर्शल वक्री केतू सप्तमात तसेच सप्तमात नेप म्हणजे गोंधळ. प्रणयाचा राजा शुक्र कृत्तिका नक्षत्रात वाईट फळे देतो.  सप्तम स्थानातील गुरु अशुभ फळे देतो, स्थानहानी करतो. शुक्राच्या किंवा स्त्री राशीतील गुरु अशुभ फळे देतो. पुनर्विवाह , विवाह न करणे होऊ शकते. शुक्र हा गुरूचा नैसर्गिक शत्रू आहे. २ आणि ७ हि शुक्राची स्थाने आहेत इथे गुरु अशुभ फळे देतो .सप्तम स्थानात धनु राशीचा गुरु असेल तर वैवाहिक जीवनात तीव्र असमाधान पाहायला मिळते.

सप्तम स्थान शुभ कर्तरीत चांगले पण पाप कर्तरीत वाईट . ६ ८ १२ चे भावेश ७ मध्ये नकोत .अशुभ फळे देतात . केंद्र कोणाधीपती म्हणजे ५ 9 चे भावेश ७ मध्ये उत्तम. लग्नेश सप्तमात असता पत्नीच्या अधीन राहतात. सप्तम स्थानापासून ६ ८ १२ स्थानातील पापग्रह त्रासदायक असतात .सप्तम स्थानाचे  षष्ठ म्हणजे व्ययस्थान , अष्टमस्थान म्हणजे धनस्थान आणि बारावे म्हणजे षष्ठ स्थान . षष्ठेश अष्टमेश युती सप्तम स्थानात .सप्तमेश व्ययेश युती व्ययात वाईट .शुक्राचे सर्व योग अभ्यासावेत जसे अस्तंगत ,वक्री . शुक्राच्या सप्तमात शनी मंगळ ,शनी राहू ,रवी शनी ,मंगळ हर्शल ,रवीहर्शल अशुभ. सप्तम स्थान शुभ कर्तरीत चांगले पण पाप कर्तरीत वाईट . ६ ८ १२ चे भावेश ७ मध्ये नकोत .अशुभ फळे देतात . केंद्र कोणाधीपती म्हणजे ५ 9 चे भावेश ७ मध्ये उत्तम. लग्नेश सप्तमात असता पत्नीच्या अधीन राहतात. सप्तम स्थानाचा विचार करताना केंद्रातून होणारे योग पण पाहावे लागतात .त्याकडे केलेले दुर्लक्ष्य हि ज्योतिषाची मोठी चूक ठरेल. अनेक स्त्रियांच्या पत्रिकेत लग्नातील पापग्रहांमुळे वैधव्य आलेले दिसते . धन स्थानात  किंवा  व्ययात जर मंगळ असेल तर सप्तमातील शनीशी होणार्या षडाष्टक योगामुळे वैवाहिक जीवनात संकटे निर्माण करेल. सप्तम स्थान दुषित असेल आणि चतुर्थात पापग्रह असतील तरी वैवाहिक जीवनात वादळे येतात .

जीवनात वादळे येतात तेव्हा नेमके कारण शोधणे कठीण जाते किबहुना एक कारण असूच शकत नाही तसेच विवाह मोडताना सुद्धा सर्वांगीण विचार केला तर एकमेकांवर आग पाखडून चालत नाही कारण चुका दोघांच्याही असतात फक्त त्या मोठ्या मानाने स्वीकारल्या जात नाहीत आणि त्याची परिणीती सहजीवन दुभंगण्यात होते. 

सौ. अस्मिता दीक्षित

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230

भाग्योदय

 || श्री स्वामी समर्थ ||


प्रत्येक स्थान हे महत्वाचे असते . आज आपण भाग्यस्थानाचा विचार करुया. भाग्य आणि लाभ ह्यात नेमके कोण मोठे हा प्रश्न पडतो. कर्म सगळेच करतात पण कर्म करताना यशाच्या शिखरावर जाणारे काहीच असतात. कर्मासोबत मिळते ती नशिबाची साथ म्हणूनच भाग्य हे अधिक महत्वाचे आहे. भाग्याची साथ असेल तर लाखातून एकाची निवड होत असते. इथे भाग्याची महती समजते. 

पत्रिकेतील प्रत्येक स्थान हे कुणाना कुणाचे तरी भाग्य स्थान आहे. कर्माचे भाग्यस्थान हे षष्ठ स्थान आहे. स्पर्धात्मक यश ६ व्या स्थानावरून बघतात. कुठल्याही गोष्टी चा दर्जा सुधारण्यासाठी उत्पादन खर्च कमी होण्याची आणि  वास्तूमध्ये  नाविन्य येण्याची गरज असते. बाजारातील सशक्त स्पर्धेमुळे ह्या गोष्टी होवू शकतात. पूर्वी मारुती कार होती आता कितीतरी नवीन गाड्या आहेत.electronic ने बाजी मारल्यामुळे जाहिराती सुधारल्या . स्पर्धा हि निरोगी असेल तर कर्माचे भाग्य हे उजळताना दिसते.म्हणजेच षष्ठ स्थान चांगले असेल तर कर्म हे चांगले होताना दिसेल. 

लाभाचे भाग्यस्थान हे सप्तमस्थान.लाभाचा विचार करताना संसार सुखाचा होईल जर मिळालेला जोडीदार हा समंजस, विचारी ,योग्य निर्णय घेणारा ,प्रोत्चाहन देणारा असेल तरच . धंद्याची भरभराट कधी होईल जेव्हा तुमचा भागीदार चांगला असेल .तुम्ही एखादी गोष्ट उत्तम कधी करु शकता जेव्हा तुमच्या मागे एखादी व्यक्ती ठामपणे उभी असेल तेव्हाच. ह्या सर्व व्यक्ती सप्तमावरून पाहतो. व्यय हे मोक्ष स्थान आहे. व्यय स्थानाचे भाग्य अष्टमस्थान आहे. मृत्यपश्चात मोक्ष मिळतो .मोक्ष मिळण्यासाठी मृत्य यावा लागतो जो कुणालाच नको असतो पण मोक्ष तर हवा असतो . मृत्यूची स्थिती हि तुमच्या पुढील जन्माची सुरवात असते. अपघाती मृत्यू किंवा रोग होवून येणारे मृत्यू हे मोक्ष मिळण्यास अपयशी ठरतात. उलट सर्व सुखे उपभोगुन अध्यात्माकडे जाणारा माणूस मोक्ष प्राप्त करतो. मृत्यू च्या वेळची स्थिती हि पुढील जन्माचा भाग्योदय दर्शवत असते म्हणून.म्हणून पुढील जन्म चांगला मिळण्यासाठी आधीच्या जन्मी मरण चांगले मिळणे आवश्यक आहे. लग्नाचे भाग्यस्थान हे नवम स्थान आहे. नवम स्थान म्हणजे पिता , वंशवेल , धर्म त्रिकोण जो तुमच्या वंशाचा त्रिकोण आहे. भाग्य म्हणजे तुमचे वडील ,पंचम म्हणजे तुमचे आजोबा ,लग्न म्हणजे तुमचे पणजोबा आणि भाग्य म्हणजे पुन्हा खापर पणजोबा ,पुन्हा पंचम म्हणजे खापर खापर पणजोबा अशी हि मालिका लग्न पंचम आणि भाग्यातून चालू असते. धर्म त्रिकोण हा पितरांचा असून पितर दोष हा धर्म त्रिकोणावरून बघितला जातो. नवम स्थानातील केतू हा पितर दोषाचा कारक ग्रह आहे. नवम स्थान शुभ असेल तार दोष नसणाऱ्या कुटुंबात जन्म मिळतो आणि हे तुमचे भाग्य म्हणावे लागेल कारण दोषी वंशात जन्म मिळाला तर प्रथम ते दोष निवारण करायला लागतात आणि त्यानंतर तुमची कर्म गती चालू होताना दिसते. चांगले कुटुंब आणि वंश चांगल्या भाग्य स्थानामुळे मिळते. धन स्थानाचे भाग्य स्थान हे दशम स्थान किंवा कर्म स्थान आहे. उत्तम धनलाभ किंवा अर्थार्जन हे दशमस्थान चांगले असेल तरच मिळतो . 

तृतीय स्थान म्हणजे प्रगती, भावंडे , शेजारी . त्याचे भाग्य स्थान म्हणजे लाभ स्थान . आपल्या हाताखाली असणार्या लोकांनी चांगले काम केले त्यांच्याशी तुमचे चांगले tuning असेल तर यश मिळते. म्हणजेच लाभस्थान चांगले हवे तरच नेत्रदीपक यश मिळते. 

चतुर्थ स्थानाचे भाग्य स्थान हे व्यय स्थान आहे. व्यय स्थान हे खर्चाचे , गुंतवणुकीचे स्थान आहे. चतुर्थ स्थान हे जमीन जुमला ,वाहन ,घर ह्याशी संबंधित आहे. आजची चांगली गुंतवणूक हि चांगला जमीन जुमला तसेच सुख आणि आनंद मिळवून देत असतो . पैसा खर्च झाल्यावर सुख मिळतो , आयुष्यातील सगळ्या सुखांसाठी चांगला पैसा खर्च करावा लागतो आणि त्याची योग्य गुंतवणूक असेल तरच तो योग्य वेळी हाताशी येतो. खर्च किती चांगल्या रीतीने करत आहात त्यावर मिळणारे सुख अवलंबून आहे. खर्च अवास्तव झाला तार निराशा दुक्ख पदरी येते. पंचम स्थानाचे भाग्य स्थान म्हणजे लग्न स्थान .पंचम स्थान म्हणजे संतती ,विद्या पुढील जन्म . ह्या स्थानाचे भाग्य म्हणजे आपण स्वतःच . आपली प्रगती आपल्याच हातात असते.आपले शिक्षण आपणच करायचे आहे. संततीचे भाग्य सुद्धा आपणच आहोत .संतती वर चांगले संस्कार केलेत ,त्यांना चांगले वळण लावले तर म्हातारपणी हीच संतती तुम्हाला सुख देयील तुमचा आधार होईल.संततीच्या मागे खंबीर उभे राहायला लागते. संततीची गुणवत्ता हि आई वडिलांच्या गुणसूत्रावर अवलंबून असते.संतती वाढताना आपला वाटा त्यात खूप मोठा आहे. षष्ठ स्थान हे अनारोग्याचे स्थान आहे. त्याचे भाग्य स्थान म्हणजे धनस्थान .आरोग्य बिघडण्यास कारणीभूत तोंडाचा मोठा वाटा असतो . जी व्यक्ती आपल्या खाण्यावर ताबा मिळवते तिचे आरोग्य चांगले असते. म्हणून आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी चांगल्या हव्यात त्यावर आपले नियंत्रण हवेच.

सप्तम स्थानाचे भाग्य स्थान म्हणजे तृतीय स्थान. सप्तम स्थान हे काम त्रिकोणातील महत्वाचे स्थान . धन स्थान आणि सप्तम स्थान हे जोडीनेच असतात. अर्थार्जन चांगले झाले म्हणजेच अर्थ त्रिकोणात स्थिरता आली कि सप्तम स्थानाचा उदय होतो. तृतीय स्थान पराक्रम दाखवतो . जोडीदाराचा भाग्योदय कधी होणार त्याच्यात चांगले कर्तुत्व करून दाखवण्याची धमक असले का हे ह्या स्थानावरून सूचित होतात . तसेच उत्तम जोडीदार कधी मिळेल हाही विचार आपल्या स्वतःच्या तृतीय स्थानावरून केला जातो. 

अष्टम स्थानाचे भाग्य स्थान हे चतुर्थ स्थान आहे. चतुर्थ स्थान म्हणजे सुखस्थान .मृत्यू कधी होतो जेव्हा शरीरात बिघाड होतो तेव्हा . जेव्हा चतुर्थ स्थानात बिघाड होतो तेव्हा मृत्यू होतो. नवम स्थानाचे भाग्य स्थान हे पंचम स्थान आहे. नवम स्थान हे खरे भाग्य स्थान.पंचम स्थानावरून संततीचा बोध होतो. हिंदू धर्मात पितरांना मोक्ष मिळण्यासाठी संततीचे आगमन सांगितले आहे. आपल्याला गती देणारा मुलगा हवासा वाटतो . काही जणांच्या भाग्यात उत्तम संतती असते .त्यामुळे त्यांचे म्हातारपण सुखात जाते. संततीमुळे आपला खरा भाग्योदय होतो कारण पंचम स्थान हे आपल्या भाग्य स्थानाचे भाग्यस्थान आहे. 

आपल्या पत्रिकेतील मूळ भाग्यस्थान हे नवम स्थान आहे. जातकाच्या नशिबाचा पाया म्हणजे भाग्यस्थान . वारसाहक्काने जातक कुठल्या कुळात जन्माला आला आहे ते ह्या स्थानावरून समजते ,पूर्ण कुंडलीची बैठक ह्या स्थानावर अवलंबून आहे. अध्यात्मिक प्रगती ,मनाचे अंतरंग ,भूतकाळातील अनेक जन्माचा हा लेखाजोखा आहे. भाग्यस्थान जेव्हा कमजोर असते तेव्हा अनेक जन्मातील पुण्याची शिदोरी संपली आहे आणि पापाची पुढे आली आहे हे समजायला हरकत नाही. ह्या स्थानातील ग्रह जातकाच्या पापपुण्याचा हिशोब सांगत असतात.निसर्ग कुनाद्लीतील गुरूची धनु रास इथे येत असल्यामुळे तो ह्या स्थानाचा कारक ग्रह सुद्धा आहे.

त्यामुळे एखाद्याचे भाग्य पाहताना गुरूचाही विचार इथे होणे गरजेचे आहे.भाग्य ज्या स्थानाभोवती फिरते त्याचा कारक ,पालक ,चालक ,मालक गुरूच आहे. गुरु हा जीवकारक असल्याने मनुष्यास जिवंत ठेवण्यास कारणीभूत असतो . ज्या वेळी गुरु गोचरीने ६ ८ १२ मधून जात असतो तेव्हा भाग्य कमी पडते आणि अशुभ घटनांना सामोरे जायला लागते. गुरु का केंद्र कोणातून किंवा त्याच्या आवडत्या स्थानातून जात असतो तेव्हा शुभ फळे देतो ,भाग्य साथ देते. गुरुचे पत्रिकेतील स्थान हि तुमची खरी संपत्ती म्हणावी लागेल म्हणून गुरूचा विचार प्रथम झाला पाहिजे. गुरु चांगला असेल तर आयुष्यात संकटे कमी असतात. इतर ग्रह आणि सर्व शुभ स्थाने हि गुरूच्या दृष्टीत जितकी असतील तितकी अधिक चांगली नशिबाची साथ अधिक लाभेल. गुरु पत्रिकेत ज्या स्थानात असतो ते स्थान आणि ज्या ग्रहांसोबत असतो ते ग्रह अधिक सक्षम आहेत असे दिसून येयील. त्या स्थान प्रभावित होताना दिसेल. भाग्य म्हणजे भाग्य स्थानाची स्थिती आणि गुरु. ज्या ज्या वेळेस पाहिजे त्या गोष्टी मिळत जाणे म्हणजे भाग्य हि सोपी साधी सरळ व्याख्या आहे. 

प्रत्येक गोष्ट पटकन होणे किंवा मिळणे , बँकेची कामे , रोजच्या व्यवहारातील कामे जलद होताना दिसतात ते भाग्यवान असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही . 

एखाद्या व्यक्तीकडे अमाप पैसा असतो पण त्यांची कामे होत नाहीत आणि एखादी व्यक्ती हातावर पोट घेवून जगते तिची सगळी कामे सुरळीत होत जातात त्यांना भाग्याची साथ मिळते .

पत्रिकेत गुरु कोणात असताना म्हणजे १ ५ ९ मध्ये असताना व्यक्ती भाग्यवान असतो हे नक्कीच कारण हि स्थाने गुरूला मानवताना दिसतात. ग्रहाला ते स्थान मानवले पाहिजे ग्रह त्या स्थानात आनंदी राहिला पाहिजे. गुरु जर मित्रांसोबत असेल आणि आवडत्या स्थानात असेल तर उत्तम फळे देतो. 

गुरु लग्नी असता धन कमी असेलही पण असामान्य कौशल्य आणि बुद्धी असते त्या वेगळेपणावर आपले अस्तित्व सिद्ध करते. गुरु पंचमात असेल तर स्वतःची संतती आणि शिक्षण हे त्याचे वैभव असते. गुरु भाग्यात असेल तर भाग्य प्रबळ असते.त्याला सर्व कार्यात यश मिळते .त्याला दैवी शक्तीची साथ लाभते आणि घराणे सुद्धा कीर्तिमान असते. धर्मत्रिकोणातील गुरु धर्माचे आचरण करायला प्रवृत्त करतो. त्याने धर्माविरुद्ध कृत्य केले तर ते अशुभ असते. ज्या स्थानात गुरु असतो त्या स्थानातून २ नंबर चा पैसा मिळत नाही. तो १ नंबर च्या व्यवसायात दाखवून धंदा करायला लागतो.

गुरु प्रत्येक स्थानात फुलतो.ग्रह ज्या स्थानात आहे तिथे कसा चांगले काम करेल हा विचार करायला पाहिजे. अर्थ त्रिकोणातील गुरु म्हणजे २ ६ १० मधला गुरु पैसा मिळवण्यासाठी चालवत असतो.हि व्यक्ती पैसा कसा मिळेल ह्याकडे चित्त असते. धनस्थानातील गुरु सिझन प्रमाणे व्यवसाय करू शकते. १० मधील गुरु शारीरिक कष्टाची कामे करून वरती येतो . लेबर पासून अधिकारी होताना दिसतो. षष्ठातील गुरु जीवनातील सुलभता कमी देते .पुण्याचा अभाव असल्यामुळे गुरु षष्ठात असतो. 

तृतीय स्थानात गुरु असेल तर. तृतीय स्थान म्हणजे प्रवास , शेजारी , भावंडे ,अंगातील कलागुण ,छंद. येथील गुरु जगापेक्षा वेगळ्या आवडी असतात. प्रवासातून पैसे मिळतो. सप्तम स्थानातील गुरु परदेशी जावून भाग्योदय करताना दिसतो. लाभतील गुरु मनुष्य संग्रह खूप करतो ,समाजसेवा ,माणसे जोडणे आवडते.

४ ८ १२ पैकी गुरु चतुर्थात चांगला. चतुर्थ स्थात गुरु उच्च शिक्षणाची संधी देतो. १२ व्या स्थानात असेल तर प्रत्येक गोष्ट पैसे देवून त्याग करून मिळवावी लागते.गुरु अष्टमात असेल तर भाग्योदयास अवघड जातो. भाग्योदयासाठी प्रयत्न कष्ट करावे लागतात. १२ व्या स्थानातील गुरु जन्म ठिकाणापासून दूर जावून भाग्योदय करतो. भाग्यवान कुंडलीत गुरु स्वगृहीचा किंवा उच्चीचा असतो.

कर्क राशीतील गुरु हा चंद्रावर अवलंबून असणारा असतो. कर्क राशीत गुरु ज्ञानपिपासू असतात , बुद्धीची झेप मोठी असते. धनु आणि मीन राशीतील गुरु सल्ले देणे हे काम करते. सिंह राशीतील गुरु चांगला असतो पुण्यसंचय असावा लागतो. रविसोबत असणारा गुरु चांगला असतो.अशी व्यक्ती अधिकार संपन्न असते. मंगळाच्या राशीतील गुरु क्रांतिकारक असतात. वर वाहील तसे काम करण्याचे धाडस असते. गुरु शिवाय भाग्य आकारास येत नाही.

भाग्येश जर लग्नात असेल तर गत जन्मीची पुण्याई असते.कुलाचाराचे पालन करावे लागतात .श्राद्ध कर्म करावी लागतात.

भाग्येश पंचमात असेल तर ज्ञानाची कास धरणारी व्यक्ती असेल. भाग्येश भाग्यात उत्तम संधी मिळतात.भाग्येश धनस्थानात असेल तर पैसा मिळतो ,कुटुंबाचे नाव पंचक्रोशीत गाजत असते. भाग्येश दशमात घेतलेल्या कार्यात यश मिळतो. २ ६ १० मधील भाग्येश स्वार्थी असतो. भाग्येश सप्तमात असता भाग्योदय विवाहानंतर होतो. भाग्येश लाभत असेल तर थोड्या प्रयत्नात अधिक यश. उठबस चांगल्या ठिकाणी असते, भाग्येश चतुर्थात असेल तर साधन कुटुंबात जन्म होतो . भाग्येश ६ मध्ये असेल तार शत्रूशी झुंजावे लागते. भाग्येश १२ मध्ये असेल तर नशिबावर अवलंबून राहू नये. भाग्येश अष्टमात असता भाग्योदय सहज होत नाही .वडिलांच्या पश्चात भाग्योदय होतो. कुणाचे तरी मरण हे त्याचे सुख होते. भाग्येश तृतीयात असता कमी त्रासात गोष्टी मिळतात. प्रत्येक गोष्ट शारीरिक त्रासाने ,बुधीमत्ताने करावे लागते. भाग्येश ३ र्या स्थानात असेल तर भाग्यासाठी झुंज द्यावी लागते. भाग्यस्थानात रवी चंद्र मंगळ गुरु भाग्य चांगले असते. शुक्र शनी राहू बुध हे भाग्य कमी असते. चंद्र भाग्यात असेल तार तीर्थाटन होते. मंगळ भाग्यात असेल तर कुळातील कृत्य करतो. भाग्यात शुक्र चांगला नाही आयुष्याची दिशा नाही . बुध भाग्यात भाग्योदय करत नाही . बुद्धी असल्याने अनेक प्रश्न पडतात आणि अधर्मी राहते.

पत्रिकेतील भाग्य भाव हा किती महत्वाचा आहे हे वरील विवेचनावरून लक्ष्यात येतेच. भाग्याला दोष देत राहणारी माणसे नशीब घडवू शकत नाहीत . भाग्य भाव हा धर्म त्रिकोणातील गाभा आहे आणि त्या भावाने दर्शवलेल्या गोष्टी जसे उपासना , मोठ्यांचा आदर केला तर हे स्थान अधिक बळकट होईल आणि भाग्योदय होईल.

सौ. अस्मिता दीक्षित

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230