|| श्री स्वामी समर्थ ||
परवा एक स्त्री पत्रिका दाखवताना स्पष्ट म्हणाली , मी खूप सहन केलय आता मात्र मी ह्यांच्यासोबत राहू शकणार नाही. मी तिला म्हंटले आपण दोघांच्याही पत्रिका बघुया आणि मग विचार करू तर म्हणाली विचार झालाय करून माझा . एकदम तप्त वातावरण झाले होते . असो.
दोघांच्याही पत्रिका बघितल्या . घटस्फोट होईल अशी मूळ ग्रहस्थिती नव्हती . विवाहाला बरीच वर्ष झाली होती आणि संतती सुद्धा होती. आर्थिक स्थैर्य होते , कुणाचे बाहेर काही प्रकरण नव्हते मग कारण काय तेही समजेना. तिचे म्हणणे असे कि नवरा घरात वेळ देत नाही . इतक्या कारणावरून कुणी वेगळे होते का. पण ऐकून घ्यायची मनस्थिती नव्हती .
सध्याची त्यांची ग्रहस्थिती हि अर्थात बरी नव्हती , एकमेकांच्याबाबत संशय घेणारा राहू नाक खुपसत होता आणि मंगळ जरा जास्तीच प्रबळ होवून हमरीतुमरीवर आलेला होता. आता त्या जातकाची ऑफिस ची परीक्षा होती आणि त्या लेखा परीक्षेत तो पास झाला तर पुढे हुद्दा आणि पगार दोन्ही वाढणार होते . गेले दोन वर्ष घर काम सर्व सांभाळून तो अभ्यास करत होता पण हिचे काहीतरी भलतच .
सांगायचे तात्पर्य असे कि हे रामायण गोचर ग्रहस्थिती विकोपास गेल्याने घडत होते आणि ते कालांतराने शांत होणार होते ते समजत होते पण तोवर हिला धीर धरणे आवश्यक होते . नवरा सतत घराबाहेर असतो , घरात कुठल्याही गोष्टीत लक्ष नाही , निट जेवत नाहीत , अश्या अनेक रोजच्या जीवनातील न संपणाऱ्या कुरबुरी ती सांगत असताना एक जाणवले कि तिचा त्याच्यावर राग नाही प्रेमच आहे . आपले माणूस सतत डोळ्यासमोर असावे असेच तिला वाटते पण सहवास लाभत नाहीय आणि संवाद सुद्धा हरपला आहे त्यामुळे ती कंटाळली आहे. खरेतर संसाराला इतकी वर्ष झाल्यावर असा पोरकट पणा शोभत नाही . मनोमन हसायला येत होते . काही दिवस थांबून मग बघूया असे सांगून तात्पुरती तरी मी तिची बोळवण केली. म्हणाली आज काय आणि उद्या काय फरक नाही पडणार मी होणार वेगळी माझे ठरले आहे असे म्हणत फोन ठेवला ..ठेवला कसला आपटला .
सप्तम स्थानाशी राहूचा संबंध आणि षष्ठ भावाची अंतर्दशा .अनेक ग्रहस्थिती त्यांना एकमेकांपासून दूर ठेवत होत्या पण म्हणून घटस्फोट होईल असे नाही. मुळात त्यांच्यात एकोपा , सहजीवनाचा आनंद देणारे आणि घेणारे ग्रहमान होते म्हणून तर संसाराची गाडी इथवर आलेली होती. त्यामुळे अश्या वेळी ग्रहस्थिती बदलायची वाट बघणे हा एकच उपाय होता . काही महिन्यांनी तिचाच फोन आला म्हणाली आम्हाला नवीन घर घ्यायचे आहे दोघांच्याही नावावर . ह्यांचा पगार वाढलाय आणि आता आम्हाला कर्ज पण मिळतंय . मला काही विचारायची गरज लागली नाही . अंतर्दश बदललेली होती. फोन ठेवताना तिचा स्वर सद्गदित झालेला जाणवला . थोडक्यात निभावले म्हणायचे.
कधीतरी जीवनात नात्यांमध्ये वादळ येते , पण ते येते आणि जाते , त्या मधल्या काळात संघर्ष असतो , पण म्हणून नाती तोडायची नाहीत हे एकदा मानाने ठरवले कि सगळे सोपे होवून जाते .
आयुष्य प्रत्येक क्षणाला बदलते आणि नवनवीन आव्हान सुद्धा घेवून येते . संसाराला काही वर्ष झाली कि तो लोणच्यासारखा मुरतो असे म्हणतात आणि नवरा बायको एकमेकांच्या सारखे दिसतात असेही ऐकले आहे . जीवनात गोडवा तेव्हाच टिकून राहतो जेव्हा उतरत्या काळात सुद्धा आपण आपल्या जोडीदाराचा हात सोडत नाही. संसार म्हणजे तडजोड आणि अर्थात संयम सुद्धा .
शुभं भवतु .
सौ. अस्मिता दीक्षित
पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment