|| श्री स्वामी समर्थ ||
जीवन आनंदाने ज्याला जगता येते तो खरा माणूस . आपल्या जगण्याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे असे जगले पाहिजे . आनंद येणार पाठोपाठ दुख्ख वेदना सगळे येणार , कारण त्याशिवाय आनंदाची खरी व्याख्याच समजत नाही . संपूर्ण आयुष्यच काय तर एक संपूर्ण दिवस सुद्धा सगळा आपल्या मनासारखा जात नाही . पण म्हणून आपण जगणे सोडून द्यायचे का ? नाही . पण आपण एखाद्या मनाविरुद्ध घडलेल्या प्रसंगात अडकून राहतो , कुणी एखाद्या शब्दाने दुखावलेले तर तेच तेच धरून व्यथित होतो आणि तेच जीवनभर आठवून आठवून उगाळत बसतो आणि समाधानाच्या असंख्य क्षणांना पोरके होतो.
ह्या क्षणभंगुर आयुष्याचे जिथे माझे काहीही नाही आणि इथेच मला सगळे ठेवूनही जायचे आहे ते जेव्हा खर्या अर्थाने समजेल आणि ते आपल्या कृतीतून वागण्या बोलण्यातून इतरानाही जाणवेल तेव्हा आपल्या जीवनाचा सोहळा झाला म्हणून समजा . मातीतून आलो पण अनेक चुकीचे शब्द आणि चुकीच्या वागण्यातून सर्व मिळवलेले आपणच माती मोल करतो . हो हो आपण स्वतःच . म्हणूनच प्रत्येक शब्द कृती हि विचारपूर्वक केली पाहिजे.
घरातील भौतिक सुखे म्हणजे परमार्थ नाही कारण ते तुम्ही घेतलेले नाम सुद्धा तुम्हाला कधीही मिळवून देत नाही . समाधान मात्र इतके मिळेल कि ओंजळ अपुरी पडेल. माणसाने समाधान कश्यात आहे त्याचा सातत्याने शोध घेतला पाहिजे . गेलेला क्षण पुन्हा येत नाही कारण पुढे जात राहणे हा प्रत्यक्ष सृष्टीचाच नियम आहे ...मग आपण कोण तो बदलणारे , नाही का.
एखाद्या लहान मुलाने आपल्याला दिलेले निरागस स्मितहास्य अहो किती पराकोटीचा आयुष्यभर जपून ठेवण्यासारखा क्षण असतो तो. पण आपण मात्र हा असा वागला तो असे बोलला , ह्याने हे केले त्याने ते केले नाही ह्यातच जन्मभर अडकून राहतो . काय जपायचे आणि काय सोडायचे तेच समजत नाही हीच आपल्या जीवनाची शोकांतिका आहे. सोडायला शिका .
लहान सहान गोष्टीतील आनंद शोधता आला पाहिजे आणि तो जगताही आला पाहिजे. आज जे सोडून द्यायचे आहे तेच हृदयाशी कवटाळून बसलो आहोत आणि मग त्या अपिरीमित वेदना आपल्याला दीर्घकालीन आजार देत आहे . मागील पिढ्यात होते का मधुमेह सारखे आजार पण आज तरुण मुलांना सुद्धा हृदय विकार होताना ऐकतो पाहतो .
लहान सहान गोष्टी सोडून दिल्या पाहिजे आणि त्यासाठी साधनेची आवश्यकता आहे. पण आम्ही खूप शिकलेले आहोत आम्हाला कोण शिकवणार अहो प्रत्यक्ष ब्रम्हदेव खाली आला तर त्यालाही स्ट्रेस देवून परत पाठवू इतका स्ट्रेस आम्ही घेवून जगतोय . द्यायची सवय कधी लागणार आपल्याला , आम्ही फक्त सगळे गोळा करणार . सर्व ज्ञान आम्हाला आहे दुसर्याला काय कळतंय अश्या अविर्भावात जगणे हीच पराभवाची पहिली पायरी आहे. इतरांच्या साठी जागून पाहिले आहे का कधी ?
साधे पाणी मिळायचे मारामार अन्न खूप दूर राहिले असे जीवन ज्यांच्या वाट्याला आले आहे त्यांनी काय करायचे ? कधीतरी विचार करा आणि केलात तर समजेल देवाने किती भरभरून दिले आहे पण त्याची काडीचीही किंमत नाही आपल्याला आणि म्हणूनच वेळ आली कि त्याची किंमत त्याला आपल्याला करून द्यावी लागते
कधी पटकन एखाद्या फळ विक्रेत्याला जवळ असलेला उसाचा रस देवून बघा , कुणाला चहा तर कुणाला काही खायला देवून बघा . उन्हाळ्याने त्रासलेले आहेत आज तरीही सगळे आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी उन्हातान्हातून आपले काम करत आहेत त्यांना ह्या तुमच्या एका लहानश्या मदतीमुळे किती सुख मिळेल त्याची कल्पनाही तुम्ही करू शकत नाही.
आनंद हा देण्यात आहे घेण्यात नाही हे जेव्हा समजेल तेव्हा जीवन समजेल. एक दिवस प्रत्यक्ष परमेश्वराने आपल्याला देणे बंद केले तर काय होईल ? कितीही नारळ वाढवा त्याच्यासमोर काहीही देणार नाही तो मग आम्ही हताश होवू ...पटतंय ना? त्यामुळे खरा माणूस तोच जो आपल्या कुवती ऐपती प्रमाणे देण्यातील आनंद मिळवतो आणि जीवनाचा सोहळा करतो. अश्या लोकांना परमेश्वर न मागता सुद्धा अनेक गोष्टी बहाल करत असतो.
आयुष्य हि त्याचीच देणगी आहे आणि अखेरच्या क्षणापर्यंत आयुष्य सन्मार्गाने जगणे आणि इतरानाही प्ररणा मिळेल असे काहीतरी करून जाणे हेच आयुष्याचे इप्सित असले पाहिजे . पण आपण हेवेदावे मत्सर कुणाला पाण्यात पहा , कुणाची निंदा करा ह्यातच अडकून पडलेले असतो .
एखादी अगदी साधी सोपी गोष्ट सुद्धा आपल्याला असाध्य होते तेव्हा परमेश्वराचे अस्तित्व किती मोलाचे आहे ते जाणवू लागते . लहान सहान गोष्टीतील आनंदाला पारखे होणे हेच खरे दुर्भाग्य आहे. आपल्याला काय मिळाले नाही त्याचेच गाणे आपण गात असतो पण जे मिळाले आहे त्याची किंमत आपल्याला कधीच नसते . तेही मिळाले नसते तर काय केले असते हा विचार सुद्धा मनाला शिवत नाही .
कटू आठवणी येत जात असतात पण तेच आयुष्य नाही.
अखंड आयुष्यात सुखाचे वारे वाहत असतातच त्याचा आस्वाद घ्या तेव्हाच दुखाची झळ पोहोचणार नाही . दुख सहन करायची क्षमता शेवटी सुखाचेच क्षण देत असतात , नाही का?
जीवन जगण्यासाठी आहे तेही आनंदाने . कुणाचे वाईट चिंतून आपल्याला तरी काय मिळणार आहे ? कुरबुरी , तक्रारी , निंदा , मत्सर , हेवेदाने , अति लोभ ह्यात गुंतून पडणे हे केवळ दुर्भाग्य म्हंटले पाहिजे .ज्याला जीवन जगण्याची कला उमगली तो तर आनंदाने जगेल आणि इतरानाही आनंद देयील ...आज नक्कीच विचार करा ....
मनुष्य जन्म मिळणे कठीण आणि तो सार्थकी लावणे त्याहून कठीण ...
श्री स्वामी समर्थ
सौ. अस्मिता दीक्षित
पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment