Tuesday, 16 January 2024

ट्रेडिंग करताना घ्या प्रश्न कुंडलीचा आधार

|| श्री स्वामी समर्थ ||



शेअर मार्केट मधून लाभ मिळेल का ?  त्यात गुंतवणूक करू का ? असा प्रश्न अनेक जातक विचारतात . अथक परिश्रमाने मिळालेल्या लक्ष्मीची गुंतवणूक विचार पूर्वक करावी लागते. शेअर मार्केट मध्ये अल्प काळात अधिक धन कमावणे ह्या उद्देशाने आलेले अनेक जातक गुंतवलेले धन सुद्धा घालवून बसतात . असो.

प्रत्येक  गोष्टीमागे अभ्यास हवाच . एखादा शेअर विकत घेताना प्रश्न कुंडलीचा आधार घ्यावा . प्रश्न कुंडली मांडली आणि त्यात पंचम भावाचा सब हा 2 6 11 भाव दर्शवत असेल तर नक्कीच केलेली गुंतवणूक फायदा देयील. जर 2 आणि 10 भाव लागत असतील तर अल्प स्वरूपातील फायदा होईल . प्रथम आणि तृतीय भाव असतील तर फायदा अगदीच थोडा असेल. 5 आणि 12 भाव असतील तर नुकसान होईल हे वेगळे सांगायला नको .  त्याचप्रमाणे 4 व 8 असे भाव लागले तर कदाचित ट्रेडिंग करायची इच्छाच नष्ट होयील , विचारच बदलेल . 7  8 9 भाव नुकसान दर्शवते .

ट्रेडिंग कसे करायचे ते आपण शिकत नाही तर ते “ कधी करायचे ?” ते शिकत आहोत . कुठलीतरी गल्लत करून पैसे लावायचे आणि मग ते बुडले कि शास्त्राच्या नावाने बोंबलत बसायचे असे होऊ नये म्हणून हे स्पष्टीकरण . आजकाल अर्धवट वाचून , शिकून कुठलाही नियम कुठेही लावतात आणि मग फलादेश चुकला कि शास्त्र कसे चुकीचे आहे अर्थहीन आहे हे सांगायला मोकळे. असो.

शेअर मार्केट नक्कीच लाभ करून देणारे आहे . पण हा लाभ मिळवताना अभ्यासपूर्वक गुंतवणूक करावी इतकच . रोज ट्रेडिंग करावे कि दीर्घ काळासाठी गुंतवणूक फायद्याची ठरेल हे समजले तर काहीच व्यर्थ जाणार नाही . कुठला भाव लागला तर कुठल्या कंपनीचे शेअर विकत घ्यावे हासुद्धा एक अभ्यासाचा विषय आहे.

कमी कष्टात अधिक धन मिळवण्याच्या हव्यासापोटी अनेक जण रस्त्यावर आलेले आपण पहिले आहे. शेअर मार्केट मध्ये फायदा होईल कि तोटा ह्याबद्दल मुळात लग्न कुंडली बोलणारच आहे पण त्याही पेक्षा प्रत्यक्ष ट्रेड करताना जर प्रश्न कुंडली चे “ ब्रम्हास्त्र “ वापरले तर त्याची अचूक फळे मिळतील आणि नुकसान होणार नाही .

सौ. अस्मिता दीक्षित
संपक : 8104639230

 

चतुर्थ भावाचा सब

 || श्री स्वामी समर्थ ||

 

अनेकदा आपण वास्तूबदल करतो . आजकाल घराच्या सजावटीवर सुद्धा लाखोंचा खर्च होतो. असो . चतुर्थभावाचा सब आणि त्याचा नक्षत्र स्वामी जर चर राशीत असतील तर व्यक्ती एका जागी फार काळ वास्तव्य करत नाही . त्यामुळे ह्या गोष्टींचा अभ्यास करून मगच घरात किती खर्च करायचा ते ठरवावे लागते. कारण तुमची वास्तू तयार होते आणि काही दिवसातच तुमचे अजून दुसर्या वास्तूत राहायला जाणे अश्या घटना घडतात .

सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क: 8104639230

Friday, 5 January 2024

वरदहस्त – ईश्वरी कृपा

 || श्री स्वामी समर्थ ||



आपल्या सर्वांच्याच आयुष्यात गुरुचे अनन्य साधारण असे महत्व आहे . गुरूंच्या समोर आपण नेहमीच नतमस्तक होतो . आपल्या शाळेतील शिक्षक आठवतात का ? शाळा सोडताना किती डोळे पाणावले होते त्यांना नमस्कार करताना .आई आपला प्रथम गुरु आणि पुढे आयुष्याच्या प्रवासात आपले आयुष्य ज्ञानाच्या प्रकाशाने उजळून टाकणारे  आणि समृद्ध करणारे असंख्य मार्गदर्शकरुपी गुरु आणि अर्थात आपले सद्गुरू . ह्या सर्वाना मनापासून अभिवंदन करत आजचा हा लेख त्या सर्वाना समर्पित करत आहे.

सगळ्यांना सगळे मिळालेले नाही , कुठेतरी काहीतरी अपूर्ण आहे आणि त्याची जाणीव असल्यामुळेच आपण परमेश्वराची शक्ती मानतो आणि जे अपूर्ण आहे त्याच्या पूर्णत्वासाठी प्रार्थना करतो. आपल्याला सगळ्याच गोष्टी मिळाल्या तर ईश्वरी शक्तीचे अस्तित्व आपण कदाचित मानणार सुद्धा नाही . म्हणूनच  “ जगी सर्व सुखी असा कोण आहे. “ त्या अपुर्णत्वा मधेच तो आहे. नवग्रहातील बलाढ्य ग्रह म्हणजे गुरु . काय वर्णन करावे त्याचे ,शब्दच अपुरे आहेत . आपले संपूर्ण आयुष्य त्यानेच तर व्यापले आहे. आपल्या पत्रिकेवर आणि अर्थात आयुष्यावर गुरु ग्रहाचा प्रचंड प्रभाव आहे. गुरु म्हणजे ज्ञानाची शिदोरी. गुरु पत्रिकेत बलवान असेल तर असंख्य दुक्खांची होळी होतेच आणि आयुष्य राजमार्गावर मार्गस्थ होते .


आशीर्वाद , प्रतिष्ठा , संपत्ती , नशीब , संतती , संस्कार , नैतिकता ह्या सर्वाचा कारक गुरु आहे. पत्रिकेत गुरूची स्थिती आपल्याला आयुष्यात कुठे आशीर्वाद मिळणार ते दर्शवते . गुरूची दृष्टी अमृततुल्य आहे. 


महानायक श्री अमिताभ बच्चन ह्यांच्या षष्ठ भावात कर्क राशीचा गुरु आहे ज्याची दृष्टी दशम म्हणजे कर्म भावावर आहे . त्यांच्या आयुष्यात स्वतःचे राहते घर सुद्धा गहाण ठेवावे लागले इतकी अगतिक परिस्थिती आली पण दशम भावावरील गुरूच्या दृष्टीने त्यांना पुन्हा एकदा त्यांची dignity पद प्रतिष्ठा सन्मान आधीच्याही पेक्षा अधिक प्राप्त करून दिली . गुरूची दृष्टी पत्रिकेत ज्या भावावर असेल त्याचा अभ्यास केला तर , विशेष करून 9 वी , गुरूचा आशीर्वाद कसा फळत आहे ते समजेल. गुरु व्यय भावात असेल तर अष्टम भावावरील त्याची 9 वी दृष्टी तुम्हाला मृत्युच्या दाढेतून सुद्धा बाहेर आणण्यास समर्थ ठरेल. 

षष्ठ भावातील गुरु षडरीपुंचा नाश करण्यासाठी आपल्याला मदत करेल. 2 5 9 11 ह्या भावांचा कारक गुरु असल्यामुळे त्या भावांचे काम तो करतच राहणार. काही ग्रंथात 12 वा भाव पण नमूद केलेला आहे . धनभाव शुक्राचा असला तरी कारक गुरु आहे म्हणूनच तिथे गुरु समृद्धता देयील . राजमार्गाने येणारा पैसा इथे आहे. दशम भावातील गुरु धन भावावर दृष्टी टाकून कुळाचा उद्धार करण्यास मदत करेल. षष्ठ भावावरील गुरूची दृष्टी रोजच्या जीवनात काम करण्यास मदत करेल . चरितार्थ चालवण्यास आणि उदरनिर्वाह करण्यास मदत करेल .  पत्रिकेतील 5 9 वी दृष्टी जिथे आहे त्या भावाचे काहीतरी विशेष फळ आणि त्या भावांनी दर्शवलेल्या गोष्टींसाठी लागणारी गुरुकृपा तुम्ही नक्कीच अनुभवत असणार . व्यय भावातील गुरूची दृष्टी 4 तसेच 8 व्या भावावर राहील. चतुर्थ भाव म्हणजे आई , मानसिक शांती , सुखासीनता , वास्तू  . अष्टम भाव वडिलोपार्जित संपत्ती , गूढ शास्त्र , नवर्याचे धनस्थान . ह्या सर्व गोष्टी मध्ये मांगल्य दिसून येयील. दशम भावावर गुरूची 5 9 वी शुभ दृष्टी असेल तर जातक नैतिक आणि अनैतिक तेच विचार करूनच कृती करेल , नैतिकतेच्या आधारावर कर्म करेल. लग्नातील गुरु स्वतःच्या प्रकृतीबद्दल प्रश्न निर्माण करेल . गेल्या जन्माचे पुण्य कर्म 5 वा भाव आणि ह्या जन्मातील पुण्य कर्म 9 वा भाव .ह्या जन्मात उत्तम कर्म केले तर पुढील जन्मात 5 व्या भावात चांगला ग्रह येयील. 9 वा भाव फक्त स्वतःची पुण्यकर्म नाहीत तर आपल्या पितरांची सुद्धा आहेत म्हणून 9 वा भाव पूर्वजांच्या आशीर्वादामुळे फळेल. तुमच्या संततीचे आचार विचार , वागणूक आणि संस्कार बघा तुम्हाला तुमच्या पत्रिकेतील  गुरु कसा आहे ते लगेच समजेल.

पत्रिकेत बुध आणि गुरु उत्तम असतील तर शैक्षणिक दर्जा सुद्धा अप्रतिम असतो ह्यात दुमत नसावे. पत्रिकेत गुरुचे शुभत्व असणे हे ईश्वरी वरदान आहे असे म्हंटले तर वावगे ठरू नये . गुरु शुभ असेल तर जीवन सुकर होते. शांतता लाभते  समाधानी वृत्ती असते . ईश्वरी अनुसंधान , चिंतन , मनन , कृतज्ञता असते . पारमार्थिक सुखाचा अनुभव देणारे जीवन असते . पत्रिकेतील गुरु संपती देयीलाच पण समाधान देयील ज्याची खरी गरज आजच्या स्पर्धात्मक , धकाधकीच्या जीवनात आहे . आपल्याकडे सर्व आहे पण समाधान नाही . जीवाला सदैव कसल्या ना कसल्या चिंता , काळजी आहे. 

सध्या गुरुचे भ्रमण मेष राशीतून होत आहे . मेष हि धर्म त्रिकोणातील राशी. गेले काही दिवस लोकांमध्ये नैराश्य होते . पण आता गुरु मार्गी आहे. गुरु म्हणजे जीवन जगण्याची प्रेरणा, आशावाद आणि सकारात्मकता . उमीद पे दुनिया कायम है....ह्या युक्तीला धरून भौतिक सुखाची लालसा न करता आपल्या सद्गुरूंच्या निरंतर सेवेत राहणे हे कधीही उत्तम.  पारायण करुया , प्रदक्षिणा घालुया, नामस्मरण करुया,  अन्नदान करुया, तीर्थयात्रेस जाण्याचे  विचार मनात येणे ह्यालाही गुरूंची कृपा लागते . मला सद्गुरुंसाठी काहीतरी करायचे आहे याचाच अर्थ तुमचे मन आता व्यय भावाकडे प्रवास करू लागले आहे कारण तिथेच मोक्ष आहे आणि गुरूंची पाउले , जितक्या लवकर आपण त्यावर नतमस्तक होऊ तितके आपण सुखी समाधानी राहू . तुम्हा आम्हा सर्वांवर गुरुकृपा अखंड बरसत राहुदे . त्यांचा वरदहस्त लाभणे हीच खरी गुरुकृपा . आपल्या सर्व गुरुना  माझा मनापासून साष्टांग नमस्कार .

श्री स्वामी समर्थ 

सौ. अस्मिता दीक्षित 

संकल्प : 8104639230

  


Tuesday, 2 January 2024

चंद्र आणि दशा

 || श्री स्वामी समर्थ ||


चंद्र हा सर्वाधिक गतीने भ्रमण करणारा ग्रह आहे . आपल्या आयुष्यातील घटना ह्या सर्वस्वी महादशेवर अवलंबून असतात आणि ह्या दशांशी निकटचा संबंध चंद्राचाच असतो. आपली जन्मस्थ असणारी दशा हि आपल्या जन्म नक्षत्रावर असते. जसे चंद्र जर मिथुन राशीत पुनर्वसू नक्षत्रात असेल तर जन्मस्थ दशा हि गुरूची असणार आहे . तदपश्च्यात शनी पुढे बुध अश्याप्रकारे सर्व दशा क्रमाने येत राहतील. 


चंद्र ज्या नक्षत्रात त्या ग्रहाची दशा अर्थात त्या ग्रहांनी दर्शवलेले पत्रिकेतील भाव जागृत होतील आणि त्या ग्रहाच्या अमलाखाली आपले जीवन त्या दशाकाळा पुरते असणार आहे . उदा .चंद्र जर मेष राशीत अश्विनी नक्षत्रात असेल तर दशा केतूची असणार आहे . पण चंद्र जर भरणी नक्षत्रात असेल तर दशा केतूची नसून शुक्राची असेल आणि  चंद्र कृत्तिका नक्षत्रात असल्यात दशा रवीची असणार आहे. आता त्याहीपलीकडे हे ग्रह आपल्या पत्रिकेत किती बलवान आहेत ह्यावर संपूर्ण दशेचे फळसुद्धा असणार आहे . 


म्हणजेच आयुष्य संपूर्णपणे बदलण्याची ताकद ह्या चंद्रात आहे. कफ वृत्ती आणि चंचलता , मनातील सर्व इच्छांचा कारक हे गुण चंद्रप्रधान व्यक्तीत दिसून येतात . चंद्र शुभ असेल तर त्याची दृष्टी सुद्धा सुभत्व निर्माण करेल. अत्यंत मधुर वाणी , आई, निसर्ग , खाद्यपदार्थ , प्रवास , समाज , सामाजिक बांधिलकी ,  भावना , मनातील विचार ह्यावर चंद्राचे प्रभुत्व निश्चित आहे. त्यामुळे चंद्राच्या दशा ,अंतर दशेत ह्या सर्व गोष्टींची प्रचीती येते . 

चंद्र हा सर्वात जलत गतीने जाणारा ग्रह आहे . त्याला सतत बदल हवा असतो , एका जागी थांबणे त्याला पसंत नाही त्यामुळे ह्या दशेत चंद्राच्या गुण धर्माला अनुसरून व्यकी सुद्धा एका जागी असणे पसंत करत नाही जसे वेगवेगळ्या पदार्थांच्या चावी चाखणे म्हणजे जेवणात सतत बदल , प्रवास करणे , नोकरीत ,राहत्या वास्तूत बदल अश्या गोष्टी हमखास घडताना दिसतात. 

चंद्र पत्रिकेत पंचम भावात स्थित असेल तर व्यक्तीचे मन हे सदैव त्या भावाने दर्शवलेल्या गोष्टी मध्ये रमलेले किंवा त्याच विचारात असलेले दिसेल. मुलांचे विचार , अध्ययन , कदाचित प्रणय सुद्धा  ह्या गोष्टी ह्या भावावरून पाहतो त्यात मन अधिक गुंतेल .एक पत्रिका पहिली त्यात चंद्राची दशा आणि चंद्र पंचम भावाचा अधिपती आणि स्वतः षष्ठ भावात . त्या व्यक्तीने अचानक शेअर मार्केट मध्ये आपला पैसा घातला आणि प्रचंड लाभ सुद्धा घेतला . चंद्र दुषित झाला तर ज्या भावात स्थित आहे त्या भावाने दर्शवलेल्या गोष्टीत न्यूनता आणेल . दशम भावात असेल तर करिअर मध्ये समस्या निर्माण करेल , व्यय भावात चंद्र असेल आणि बिघडला तर झोपेचे बारा वाजवेल , सगळ्या गोष्टीत गुंतून राहील , आयुष्य पुढेच जाणार नाही आणि म्हणून मुक्ती मिळणार नाही .सर्व सोडून द्यायला लागते तरच पुढील मोक्षाचा प्रवास सुकर होतो . व्ययेश चंद्र असेल तर आपला पैसा नको तिथे व्यर्थ खर्च तर होत नाही ना ह्याचे भान असले पाहिजे . दान धर्माचे हे घर आहे पण दान उचित व्यक्तीला केले तर पुण्य लाभेल अन्यस्था सर्वच व्यर्थ आहे.  द्वितीय भाव हा संपत्ती आणि कुटुंब दर्शवतो . चंद्र शुभ असेल तर व्यक्तीकडे आर्थिक सुबत्ता आणि कौटुंबिक सुख दोन्ही असेल. चंद्र हा सात्विक आणि नैसर्गिक शुभ ग्रह आहे. त्यामुळे आपण जे अन्न खातो त्याप्रमाणे आपले मनातील विचार सुद्धा असतात हा अभ्यासच विषय आहे . अभ्यास करून पहा. 


आयुष्यात आपण केलेली कुठलीही कृती सर्वप्रथम आपल्यावर परिणाम करते मग समोरच्यावर . म्हणूनच प्रत्येक गोष्टीचा मनाशी संबंध आहे आणि मनाचे तेवर सांभाळणे सोपे नाही . अनेक जण विचारतात सर्व आहे पण मनशांती नाही, झोप येत नाही , मन सैरभैर होते , काहीच सुचत नाही कारण चंद्र . पत्रिकेत तुमच्या चंद्र ज्या भावात आहे तिथेच आयुष्यभर तुमचे मन रेंगाळत आहे . तुम्हाला कुणी जबरदस्ती नाही करू शकत , तुमच्या मनाने कौल दिल्याशिवाय हा लेख पण तुम्ही वाचणार नाही . काय पटतय का? तसेच माझ्याही मनाने कौल दिला म्हणून मी आज हा लेख लिहिला.  


सौ. अस्मिता दीक्षित

संपर्क : 8104639230