|| श्री स्वामी समर्थ ||
आकाशातील तारकांकडे बघताना सुखद अनुभव येतो , शीतल चांदणे कुणाला आवडत नाही , त्यात लुकलुकणारे आणि आपले अस्तित्व युगांनु युगे अबाधित ठेवणारे लहान मोठे तारे सुद्धा आपल्याला खुणावतात . आपल्या प्रेमाचा आपल्यावर वर्षाव करत आपले आयुष्य सुखकर , जगणेबल करतात .
ह्या तार्यांचे किंवा ग्रहांचे आपल्याशी गूढ नाते आहे तेही अनेक जन्मांचे . आपली सगळी गुपिते त्यांना ठाऊक असतात बरे का . आपण कुट कुट काय काय केल हाय ते सार काही ठाव आहे त्यास्नी. वरून बघत असतात ना टकामका . असो.
रोज दिवस आणि रात्र आपण आपले कर्म करत असतो ज्याचा लेखाजोखा कुणीतरी ठेवत असतेच जे आपल्याला माहित नाही किंवा आपण कोण काय करणार आपले ? ह्या अविर्भावात वावरतो . बघू काय होईल ते असा आपला थाट असतो.
गेले काही दिवस “ शनी आता मीन राशीत जाणार मग मेष राशीला साडेसाती ...” असा बागुलबुवा करणारे अनेक video येत आहेत ...सध्या तो कुंभेत आहे मग मीन राशीत आणि मग मेषेत असे तो आपले भ्रमण करताच राहणार . त्यात काय ? मेष राशीच्या लोकांनी अजिबात घाबरू नका खरतर ज्या ज्या गोष्टीना आपण घाबरतो त्या गोष्टी कधीही घडतच नाहीत हे येतंय का लक्ष्यात ? बिचारे शनिदेव काहीच करणार नाहीत उलट ह्या भीतीमुळे आजारी पडल आणि खापर आहेच मग शनिवार .
त्या शनीला इतके बदनाम करून ठेवल आहे कि विचारू नका. असे काय घोडे मारले आहे त्याने तुमचे . अभ्यास केलात तर पेपर चांगला जाणार पण नाही केलात तर नापास किंवा मार्क कमी मिळणार आणि हाच तर शनी आहे. अगदी जन्मल्यापासून तुमच्या सोबत आहे. गुरु आंजारून गोंजारून सांगतो बाबानो नीट वागा पण त्याचे कोण ऐकतोय ...म्हणून मग शनीला यावे लागते तो काय चीज आहे हे दाखवण्यासाठी. प्रत्येकात काहीतरी चांगले वाईट हे असतेच पण अहंकार काबूत ठेवणे किती लोकांना जमते ? कुणालाही नाही हि खरी गोम आहे. १००० रुपये पगार वाढला तरी ताठ चालायला लागतो आपण.
शनी मेष राशीत निचीचा होणार मग अधे मध्ये तो वक्री पण होणार . होऊदे त्यात काय , अहो व्हायलाच लागते त्याला कारण त्याला आपल्याला सरळ करायचे असते तेही अगदी सुतासारखे . आपण लई शाने समजतो स्वतःला . कायदा , अनुशासन आहे हेच दाखवण्यासाठी साडेसाती आहे.
तुम्ही कसेही वागायचे आणि कुणी काही बोलायचे नाही असे चालणार नाही . मेष राशी हि प्रत्येकाच्या पत्रिकेत कुठल्या तरी भावात येणार , तुमच्या पत्रिकेत कुठेतरी शनी सुद्धा विराजमान असणार , हा शनी कसा आहे त्यावर सुद्धा अनेक निकष अवलंबून असतात . शनी मंगळ षष्ठ भावाचे कारक जरी असले तरी शनी षष्ठ भावात आजरपण देणारच , नाही कसे ?
ज्योतिष हे अनुभव देणारे थोडक्यात प्रचीती देणारे शास्त्र आहे. राहूची दशा ज्यांची चालू आहे किंवा भोगून झाली आहे त्यांना विचार आयुष्यातील १८ वर्ष कशी गेली ते. स्वतः अनुभवल्याशिवाय ग्रह आपल्या पत्रिकेत काय फलीत देतात ते सांगता येणार नाही . तूळ लग्नाला शनी योगकारक , म्हणजे तो तुमच्या चुका पदरात घालेल असे नाही हे समजून घ्या. कुठल्याही राशीचा , जातीचा , धर्माचा माणूस असुदेत . चूक झाली कि केस शनीकडे जाणारच जाणार .
गुरु व्यय भावात आहे म्हणजे लगेच विमानात बसणार का तुम्ही अमेरिकेला जायला . असे नाही कदाचित दवाखान्याच्या फेर्या सुद्धा होतील .असे आहे सर्व. हा अभ्यास खूप सखोल आहे .
आपल्याला शनीचा धाक आहे हे जरा बरेच आहे . माझे कोण वाईट करणार मी बेताल वागणार . ह्याला कुठेतरी लगाम आहे शनीमुळे . शनी राहू युती सुद्धा होते आहे आता एप्रिल मे दोन महिने . बघा आपापल्या पत्रिका तपासा आणि बघा मीन राशी कुठे आहे? आणि तिथे होणारी हि युती काय फळ देयील ?
आपली कर्म आपल्यालाच सांभाळायची आहेत ती सांभाळली आणि उपासनेची जोड दिली तर खरच कुणीच आपले काहीच वाईट करणार नाही. ताप आला कि आपण औषध घेतो ना अगदी तसेच साडेसाती पनवती जे काही असो अथवा नसो . रोज चार वेळा जेवतो न आपण मग निदान एकदा तरी देवाचे नाव घ्या कि.
मी साधना काय करू???? असा प्रश्न सगळे विचारतात पण सांगितले कि करतात किती आणि तेही श्रद्धेने हे महत्वाचे आहे . आपल्या रुचा , वेद , स्तोत्र ह्यात प्रचंड ताकद आहे श्रद्धेने , मनापासून म्हंटली तर ती अनुभव देण्यास समर्थ आहेत हे नक्की . पण आपण सगळे उरकून टाकतो आणि म्हणूनच आपल्याला हवे ते फळ मिळत नाही. मनाची शांतता हरवून बसलेल्या ह्या आजच्या कलियुगात साधनेची किती आवश्यकता आहे हे मी वेगळे सांगायला नको .
आपल्या देशात येवून पाश्चिमात्य लोक योग , साधना , मेडीटेशन शिकत आहेत त्यावर Ph.D. करत आहेत पण आम्हाला साधे सूर्याला अर्घ्य घालायला सांगा तेही जमत नाही.
शनी मेषेत जावूदे नाही तर सिंहेत ह्या सर्वाला कोण घाबरेल ? ज्या व्यक्तीला आपण काय काय केले आहे ते माहित आहे तो घाबरेल. कर नाही त्याला डर कश्याला ??? चुका होतात माणसाकडून पण त्याचे परिमार्जन करता आले पाहिजे मुळात त्या मोठ्या मानाने स्वीकारता आल्या पाहिजेत .
आजूबाजूला इतके विद्वान इतक्या अहंकाराने माज करताना बघताना असे वाटते , जेव्हा शनी कडे ह्यांची केस जायील तेव्हा काय होईल. शनी विकलांग करून ठेवतो शरीराने आणि मनाने सुद्धा . शनीकडे पत्रिकेतील १० ११ भाव आहेत म्हणजे गुडघे आणि त्याखालील भाग . शनी वाताचा कारक हाडे सुद्धा . त्याच्यासमोर कुणाचे चालणार म्हणा . तिथे ओळख चालत नाही आणि पैसा तर अजिबात काम करणार नाही उलट शिक्षा वाढेल .
शनी कुठल्याही राशीत असो , त्याचे साम्राज्य आणि अस्तित्व दोन्ही अबाधित आहे . आयुष्याच्या संध्याकाळी काही नको वाटते . नुसते शांत बसावे आणि नेमकी हीच शांतता आज आपण घालवून बसलो आहोत .
आपण जेव्हा प्रचंड चिंता करतो ना जसे नोकरी मिळेल का? मुलाचा विवाह कधी होईल ? विसा अडकला आहे , जागा विकली जात नाही अश्या अनेक प्रापंचिक चिंता आपल्या जीवाला लागतात म्हणजेच आपल्या सद्गुरुंवर आपला विश्वास नाही असाच त्याचा अर्थ घ्यायचा का . आपण सतत चिंता करणे हा त्यांचाही अपमान आहे. ते म्हणतील रोज इतकी फुले वाहते. हि आरती ती आरती आणि पुन्हा चिंता करते मग मी कश्याला आहे? एकदा त्यांच्या शाळेत नाव घातले कि ते सांगतील ते , जे करती ते आपल्या भल्यासाठी असेल ह्यावर आपली श्रद्धा हवीच हवी .
शनी ह्या राशीत कि त्या राशीत करत निष्फळ वेळ घालवण्यापेक्षा बसण्यापेक्षा हनुमान चालीसा म्हणा , जसा वेळ मिळेल तसा २४ तासात कधीही म्हणा पण म्हणा . मुर्खासारखे प्रश्न विचारणे कायमचे बंद करा आणि आयुष्यातील प्रत्येक क्षण सत्कारणी लावा . पोळ्या करताना सुद्धा श्रीराम जयराम आपण म्हणून शकतो .इंस्ता , सोशल मिडिया आपल्याला गुरूंच्या पासून दूर नेणारा राहू आहे .त्याला ओळख आणि वेळीच दूर ठेवा . पूर्वी कुठे होते हे सर्व जीवन किती वेगळे होते सगळे कुटुंब एकत्र जेवायचे , मनात आणले तर सर्व पूर्वीसारखे करू शकतो आपण . असो आजचा विषय शनी आहे.
सिंह राशीला शनी आठवा येत आहे तेव्हा त्यांनी आवाज आता बंद ठेवा. मी असा आणि मी तसा खूप झाले , नाहीतर भोगा मग शिक्षा . अनेकदा उत्तम कर्म करतो आपण पण त्याचाही आपल्याला अहं येतो . काही चांगले काम केले तर करा आणि सद्गुरुचरणी ठेवा . मी सुद्धा लेखन करते आणि महाराजांच्या चरणाशी ठेवते आणि पुढील लेखाकडे वळते . महाराजांची इच्छा असेल ते वाचतील . आपण मागे वळून बघायचे नाही म्हणजे अहं येणार नाही . अगदी तसेच रात्री झोपताना सगळे दिवसभर मिळवले ते त्यांच्याच चरणी ठेवा म्हणजे आपल्याकडे अहंकार करायला काही उरणारच नाही .
ग्रहांना त्यांचे काम करुदे आपण आपले करुया . साधना , उपासना , योग , प्राणायम , दानधर्म आणि उत्तम कर्म हीच आजच्या सुखी आनंदी जीवनाची गुरुकिल्ली आहे. दुसर्याला आनंद देता नाही आला तर निदान दुक्ख तेरी देवू नका . चांगले बोलता आले नाही तर वाईट बोलू पसरवू नका . इर्षा , असूया , मत्सर , द्वेष आपल्या मनाला पर्यायाने शरीराला लागलेली कीड आहे ती वेळीच झटकून टाका . द्वेष करून काय मिळणार जो तो आपापल्या कर्माचा धनी आहे . आपण आपल्या स्वतःच्या जीवनाकडे रोज त्रयस्त दृष्टीने बघावे खूप काही शिकायला मिळेल ....
शनी आहे आणि वेळोवेळी आपल्याला त्याचे अस्तित्व तो दाखवून देत असतोच . एका क्षणात आयुष्य बदलते , होत्याचे नव्हते होते , सकाळी भेटलेला माणूस दुपारी ह्या जगातच नसतो , विस्मयचकित , अचानक आणि अभद्र घटना घडतात आणि आपली मती गुंग होते . शनी जागेवर बसवून ठेवतो . अपंगत्व हे मन आणि शरीर पोखरते . आपल्या हातात काहीच नाही , ना कधी होते ना भविष्यात कधी असणार आहे. आपल्या हातात आहे ते उत्तम कर्म करणे हे समजले तरी शनी समजला असे म्हणायला हरकत नाही .
ओम शं शनैश्चराय नमः
सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment