Sunday, 1 September 2024

माझे उत्तर नेमके दडलय तरी कश्यात ?

 || श्री स्वामी समर्थ ||


ज्योतिष हे कालविधान शास्त्र आहे . काळ हा अनंत काळापासून आहेच तो काल होता आजही आहे आणि उद्याही असणार आहे . म्हणूनच आपणही काळासोबत चालले पाहिजे . घटना नेमकी कधी घडणार हे नेमके आणि अचूक सांगणारे हे शास्त्र मात्र आज कित्येकांची अवहेलना झेलत आहे. अपुरे ज्ञान आणि शास्त्राचा मांडलेला अक्षरशः बाजार हीच त्याची कारणे आहेत . नुसते क्लास केले आणि सर्टिफिकेट मिळाले कि झाले का सर्व ? क्लास , कार्यशाळा हा शास्त्राची ओळख करून देतील पण पुढे काय ? पाया भक्कम तुमचा स्वतःचा अभ्यास करणार आहे आणि वरची इमारत तुमची तुम्हालाच बांधायला लागेल त्यासाठी प्रचंड मेहनत , हजारो पत्रिकांचे विवेचन , रोजची साधना आणि गोचरीच्या ग्रहांचा अभ्यास महत्वाचा ठरेल . आपल्या वयक्तिक साधनेशिवाय सर्व फोल आहे हे आवर्जून सांगावेसे वाटते .

मानवी मनातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यास हे शास्त्र समर्थ आहे. आपल्या पुढील पिढ्यांचे नामकरण काय असू शकेल ह्याबद्दल गुरुवर्य श्री. श्री. भट सरांनी खूप संशोधन केले होते  . ग्रहांच्या गती ज्या कडे सहसा आपले लक्ष्य जात नाही अश्या कित्येक गोष्टींचा विचार पत्रिकेच्या फलादेशात करावा लागतो . त्यातील एक जरी केला नाही तर आपले उत्तर चुकण्याची शक्यता असते . ज्यांना हे शास्त्र अवगत करायचे असेल त्यांनी आपला उभा जन्म ह्या अभ्यासासाठी वेचण्याची आणि ज्ञानरूपी खोल समुद्रात उडी मारण्याची तयारी ठेवावी . वरवरचा अभ्यास उपयोगाचा नाही . असे करून आपण फक्त दुसर्याची नाही तर स्वतःचीही फसवणूक करत असतो . असो.

ज्योतिष शिकण्यासाठी सर्वात प्रथम शास्त्रावरचा , शास्त्र कर्त्यांवरचा विश्वास अभेद्य हवा , शिकण्याची प्रवृत्ती , जिज्ञासू वृत्ती हवी  , अध्ययन करण्याचा ध्यास , कष्ट करण्याची तयारी हवी . मनन चिंतनाची मनाला सवय हवी तसेच प्रत्येक गोष्टीची सांगड ज्योतिष विद्येशी घालण्याची संशोधक वृत्ती जोपासायला हवी . नुसते पुस्तकातील नियम वाचून काही होणार नाही तर ते प्रत्यक्ष आयुष्यात कसे फळतात तेही पाहायला हवे. उदा. द्यायचे झाले तर ३ दिवसापूर्वी राहूचे नक्षत्र होते . मी काही
video रेकोर्ड केले होते त्यानंतर मी दोन वेळा ते पाहिले सुद्धा होते पण त्या दिवशी मी पाहिले तेव्हा आवाज चित्र काहीही दिसले नाही , राहुने त्याचे अस्तित्व मला दाखवले त्या दिवशी .

ज्योतिष आपल्या मदतीला तत्पर आहे. जसे चंद्र हा सर्वात जलद गती ग्रह आहे त्यामुळे प्रश्न कुंडली मध्ये जर चंद्राचे कर्क लग्न आले तर उत्तर “ हो “ आहे हे बिनधास्त सांगावे. पण शनी असेल तर सगळ्याला विलंब . ग्रहांचे कारकत्व समजले तर प्रश्नाची उकल नक्कीच होईल.

आजकाल इंस्तंट चा जमाना असल्यामुळे आणि संयम संपुष्टात आल्यामुळे सगळ्यांना सगळ्या गोष्टी शोर्टकट ने हव्या असतात .  दुर्दैवाने ह्या शास्त्रात ते नाहीत आणि ते असावे हे वाटणे हि दुर्दैवाची बाब आहे. ज्योतिष हे तर्कशास्त्र आहे. असे तर्क हे रोजच्या जीवनाशी निगडीत आहेत पण आपले त्याकडे लक्ष्यच नसते . निसर्ग सुद्धा आपल्या जीवनावर खूप परिणाम करत असतो , अनेक गोष्टी शिकवत असतो  पण आपले काश्याकडेच लक्ष्य नसते .

आपल्या आयुष्यातील काळ हा सतत पुढे जात असतो आणि हातातून वेळ निघून जाते म्हणूनच प्रत्येक अभ्यासकाने स्वतःला ह्या शास्त्राच्या अभ्यासासाठी झोकून काम केले पाहिजे . इतर अभ्यासकांचा आदर आणि त्यांच्याकडील विचारांचा योग्य मान सुद्धा ठेवला पाहिजे . मानवी जीवन आणि मन हे खूप गुंतागुंतीचे आहे आणि तो गुंता सोडवायचा असेल तर अभ्यासाचा पाया भक्कम हवा . ग्रह तार्यांशी संवाद साधता आला पाहिजे , त्यांची तत्वे , कारकत्व सर्व काही समजले पाहिजे .

कित्येक वेळा एखादी पत्रिका बघून सुद्धा एखादी ग्रहस्थिती किंवा योग आपल्या लक्ष्यात येत नाही . ह्यावरून अभ्यासाची खोली समजेल. सूर्यमालिकेत रवी हा तारा , चंद्र हा उपग्रह आणि बुध शुक्र मंगल गुरु शनी हे सर्व ग्रह आहेत , त्यांचा सखोल अभ्यास आवश्यक आहे . ह्या शिवाय पातबिंदू राहू केतू हेही आहेत . ग्रह जे ग्रहण करतात ते आपल्यापर्यंत आणून देतात .

ज्योतिष हि एक साधना आहे, तपश्चर्या आहे आणि त्यातून तावून सुलाखून निघण्यासाठी संयमाची गरज आहेच आहे . पी हळद हो गोरी इथे लागू पडत नाही . ज्योतिष अभ्यासकांनी प्रत्येक क्षणी आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा अभ्यास करताना गोचर ग्रहस्थितीची सुद्धा सांगड घातली तर अनेक प्रश्नांची कोडी सहज सुटतील .

ज्योतिष तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यास नक्कीच समर्थ आहे , फक्त अभ्यास सखोल हवा . अभ्यासकाला विषयाचे गांभीर्य असावे आणि हि विद्या शिकण्यासाठी समर्पणाची भावना हवी . ग्रह तार्यांची कृपा झाली तर काहीच अशक्य नाही . जितके ग्रंथांचे वाचन तितकी प्रगल्भता अधिक .हा आत्म्याचा अभ्यास आहे जो सर्वार्थाने परिपूर्ण असाच आहे . अंतिम सुख ह्यातच आहे . आपल्याला नोकरी कधी मिळणार हे समजले कि आपली मिटते ती चिंता कारण आपले उत्तर आता मिळालेले असते . एकदा ते मिळाले कि आपण शांत होतो . एखाद्याचा विवाह अटळ असेल आणि ते एकदा समजले तर दुक्ख होईल पण किती दिवस ??? एक दिवस व्यक्ती आहे ती स्थिती स्वीकारेल आणि आयुष्य जगायला प्रवृत्त होयील . देव सगळ्यांना जगवत असतो . कुणाचे काहीही व्हायचे बाकी राहत नाही . माझी आजी ९९ वर्षाची होती ती गेली तेव्हा मला वाटले मी उद्याचा सूर्योदय पाहणार कि नाही कारण तिची आणि माझी अगदी एक नाळ होती . सहवास तितके प्रेम . पण महिन्याभरातच माझ्या मुलाचा जन्म झाला आणि संपूर्ण घर हसते खेळते झाले. आयुष्य पुढे गेले आणि जात राहील.

अत्यंत सन्मानीय असे हे शास्त्र आहे. ह्याचा अभ्यास करायला सुद्धा तितकेच पूर्व सुकृत असायला लागते .  उत्तम ज्योतिषी तयार होणे हि आज काळाची गरज आहे. कारण हे शास्त्र तुम्हाला तुमच्या उत्तरापर्यंत न्यायला आणि जीवन सुखकर होण्यास मदतच करते . आज जीवनात अनिश्चितता आहे आणि एक प्रकारच्या अनामिक भीतीत, दडपण घेवून  प्रत्येक जण जगताना दिसतो . ज्योतिष हा जीवनाचा कणा आहे. उत्तम उपासना हेही जीवनात तितकेच महत्वाचे आहे .

सद्गुरुकृपा , त्यांचा वरदहस्त असल्याशिवाय काहीही शक्य नाही , हे अगाध ज्ञान मिळवणे आणि त्याचा समाज , जन हितासाठी उपयोग करून देण्यासाठी त्यांची कृपा लागते . दोन पुस्तके वाचून ज्योतिषाचे  दुकान उघडलेत तर ते तितक्याच वेगाने  बंद सुद्धा होईल हे लक्ष्यात घ्या . कुणालाही कारण नसताना हि शांत करा , ती शांत करा हा अभिषेक करा हे सांगताना अंतर्मुख व्हा आणि स्वतःला विचार मी सांगतोय ते योग्य आहे ना? कारण सरतेशेवटी आपल्याला त्यालाच उत्तर द्यायचे आहे . आपण जगाला फसवू पण स्वतःला आणि त्याला तर फसवू  शकणार नाही. सगळ्यांचा बाप वरती बसलाय ह्याचा विसर नको.
आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. अनेक उत्तरे आपली आपल्यालाच मिळतात कोण देणार???  तर आपली स्वतःची साधना . आज अमावास्या आहे . चंद्र रवी एकत्रित ताकद अंतर्मुख करते . मनुष्य हा बाह्य जगातील भौतिक सुखात सदैव रमतो आणि अंतर्मुख होण्यास विसरतो . आज अंतर्मुख व्हा , स्वतःशीच संवाद साधायची हि संधी सोडू नका . आज सुषुम्ना नाडी म्हणजेच निसर्गाची नाडी चालू आहे ती तुमची नाळ पुन्हा एकदा निसर्गाशी आणि मातीशी जोडायला समर्थ आहे. आपण ह्या मातीतूनच जन्मलो आहोत आणि ह्या मातीतच विलीन होणार आहोत हेच अंतिम सत्य आहे.

सौ. अस्मिता दिक्षित

संपर्क : 8104639230





शरीरातील पित्त आणि रवी मंगळ

 || श्री स्वामी समर्थ ||

पित्त हे शरीरात असतेच पण ते अति होते तेव्हा त्याचे परिणाम दिसतात , जसे डोके दुखते तेव्हा आपण म्हणतो मला पित्त झाले. पित्त हे रवी मंगळा कडे आहे. रवी जेव्हा मध्यान्ही तळपायला लागतो तेव्हा पोटभर जेवलो नाही तर पित्त होते . पित्त हे रवीमुळे वरती येते म्हणूनच खरेतर सकाळी ९ च्या दरम्यान खाल्ले पाहिजे तर बुद्धी चालेल आणि पित्ताचा त्रास कमी होईल. पित्तामुळे डोके दुखते आणि बुद्धी म्हणजेच आपला मेंदू डोक्यातच असतो . व्यवस्थित खाल्ले तर पित्त होणार नाही. रवी मंगळ चुकीच्या राशीत आले किंवा आपल्या डोक्यावर म्हणजेच लग्न भावात आले तर तुम्ही सकाळी ९ वाजता भरपूर खाल्लेच पाहिजे . अश्या प्रकारे आपली तब्येत आपण जपू शकतो . आपल्या पत्रिकेतील लग्नातील आणि अग्नी तत्वाच्या राशीतील ग्रह बघा ते किती बोलके असतात .   

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230


Wednesday, 28 August 2024

छोटी सोच

 || श्री स्वामी समर्थ ||

परमेश्वराने बुद्धी आणि विचार शक्ती सगळ्यांनाच दिलेली आहे पण त्याचा उपयोग कसा करायचा हे अर्थात प्रत्येकाच्या हातात आहे. आपल्या आजूबाजूला अनेक माणसे रोजच्या जीवनात वावरताना दिसतात त्यातील काही विशाल हृदयाची , इतरांना मदत करणारी आणि दुसर्याच्या आनंदाने खुलणारी असतात . पण काही अत्यंत संकुचित मनाची , सतत एखाद्या गोष्टीची लपवा छपवी करण्याकडे कल असतो , स्वतःचे काहीही सांगायचे नाही पण दुसर्याच्या आयुष्यात खूप रस असणारी , दुसर्याचा सतत द्वेष करणारी , असूया , मत्सर , सतत दुसर्याला पाण्यात पाहणाऱ्या वृत्तीची असतात . अश्या व्यक्ती सतत राजकारण खेळत राहतात , ह्याचे त्याला त्याचे ह्याला , सतत सगळ्या बातम्या हव्या असतात त्यांना , कुणाबद्दल एक शब्द चांगल बोलणे ह्यांना जमत नाही किबहुना कुणाचे हि चांगले बघवत नाही , कुणाची प्रशंसा करणे तर खूप दूर राहिले. उलट दुसर्याचे वाईट झाले कि ह्यांचा आनंद गगनात मावेनासा होतो . 


मुळात हि वृत्ती येते कुठून ? तर आपल्याच आयुष्यात अपेक्षित गोष्टी घडल्या नाहीत कि समोरच्याचे सुख टोचू लागते. जसे सगळ्यांना लक्ष्मीप्राप्ती होते पण आपल्याला रोजचा प्रपंच सुद्धा चालवता येत नाही . शिक्षण नाही म्हणून धड नोकरी नाही , पराकोटीचा अहम त्यामुळे शनीचे फटके पदरी पडणारच , तो कुणालाच सोडत नाही . आयुष्याची संध्याकाळ झाली तरी देवदेव करूनही स्वतःचे राहते घर होत नाही . मग भाऊ बंदकी आली त्यात अत्यंत हृणास्पद खालच्या पातळीचे राजकारण करून संपत्ती जमीन जुमला हडपणे . कारण स्वतःच्यात काहीच करण्याची धमक नाही . 

आपल्याला जे सुख आयुष्यात अपेक्षित असते ते दुरापास्त होते , अगदी रोजच्या जीवनातील लहान सहान गोष्टीत सुद्धा आनंद मिळत नाही तेव्हा माणसाची दुसर्यावर जळण्याची वृत्ती बळावते . दुसर्याचे कसे चांगले चालले आहे ते पाहवत नाही आणि त्यातूनच मग असूयेचा जन्म होतो आणि ती सर्वात प्रथम त्या व्यक्तीलाच मारते .  अहो जो तो आपापल्या कर्माचा कारक , प्रत्येकाला देवाने बुद्धी आणि दोन हात दिलेले आहेत . कष्ट करा आणि सन्मार्गाने जगा , जे आहे त्यात समाधान माना आणि परमेश्वराच्या सान्निध्यात राहा . पण नाही भौतिक सुखाची तीव्र लालसा आणि काहीच पदरी पडत नसल्यामुळे येणारे नैराश्य . ह्याचा परिणाम असा होतो कि सगळी आजारपणे  मागे लागतात . जेव्हा आपण दुसर्याचा मत्सर  करतो तेव्हा आपले स्वतःचेच हार्मोन्स बिघडतात आणि विचार दुषित होतात , विचारांचा प्रभाव आपल्या मनावर आणि शरीरावर व्ह्यायला लागला कि तो आपल्याला अगदी स्मशानापर्यंत सोडत नाही .

अत्यंत छोटी सोच असणार्या ह्या व्यक्तींनी कितीही देवाचे केले तरी त्यांचे कलुषित मन त्यांना देवाच्या द्वारापर्यंत कधीच नेत नाही , परमेश्वराला त्यांची हाक सुद्धा ऐकू येत नाही . दुसर्याचे लुबाडून घरात राजकारण करून आपण संपत्ती हडपू पण पुढे काय ? त्याचा विचार केलाय का कधी ? याच देही याच जन्मी आहे सर्व . आपण आपल्यापुरते जगायला शिकले पाहिजे . जे आहे ते आहे रोजचा दिवस नवनवीन संधी देण्यासाठीच येतो त्या घेवून कष्ट करत राहिले पाहिजे . एक दिवस आपलाही येणारच ह्यावर विश्वास ठेवला पाहिजे . दुनियादारी सोडून जरा आपल्या प्रपंचात लक्ष्य दिले तर बरे होईल. 

जे आपण पेरणार तेच उगवणार , तुम्ही जे देणार तेच तुम्हाला परत मिळणार त्यामुळे चांगले विचार मनात रुजवाल  तर तुमचे विचार , देहबोली सर्वच सकारात्मक होयील ह्यात शंकाच नाही . 

हि छोटी सोच कुठून येते ? तर पत्रिकेतील चंद्र दुषित असेल , बिघडला असेल , पापग्रहांच्या प्रभावाखाली असेल , तर मनाच्या ठिकर्या उडतात . निर्णय क्षमता नसते , आई विक्षिप्त स्वभावाची , आजारी , मानसिकता बिघडलेली असते , गृहसौख्य , वाहन सौख्य नसते . सगळ्या सुखात उणीव . 

घरात अशांतता जाणवते आणि ती व्यक्तिमत्वावर उमटते . अश्या लोकांनी योगासने , ध्यान , साधना करावी . आपले शब्द भांडार जरा जपून वापरावे , विचार आचाराचा मेळ घालावा . शांत ठिकाणी बसून अंतर्मुख व्हावे , आवडते संगीत ऐकावे त्याने विचारांचे परिवर्तन नक्कीच होईल. आपले छंद जोपासावे , सत्कर्मात आपले योगदान द्यावे जसे झाडे लावणे . सर्वात मुख्य आपल्या विचारांची दिशा आपणच ठरवावी . मनाने सुद्धा कुणाचे वाईट चिंतू नये किंवा बोलूही नये. 

आपण दुसर्याचा केलेला तिरस्कार , मत्सर , हृणा , द्वेष , असूया अनेक अनेक आजारांच्या स्वरूपात दाम दुप्पटीने आपल्याच पदरात पडणार ह्याचा कदापि विसर पडू देवू नये . 

चंद्र शुद्ध करण्यासाठी महादेवाचा जप आणि अभिषेक करावा . आकाशातील चंद्राला ओवाळावे . सोमवारी पांढर्या वस्तूंचे किंवा गोड पदार्थांचे गरजू व्यक्तीला दान करावे .

आपले आयुष्य चांगल्या प्रकारे जगता यावे ह्यासाठी कर्म शुद्ध ठेवली पाहिजेत आणि ते सर्वस्वी आपल्याच हाती आहे नाही का?

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230



Monday, 26 August 2024

कृष्णा आमचे मागणे थांबव..

 || श्री स्वामी समर्थ ||


कृष्ण जन्माष्टमीच्या सर्वाना खूप शुभेछ्या . अष्टमी हि अपार सौंदर्याची तिथी आहे. कृष्ण तनामनावर राज्य करणारा , आपल्या हाकेला तत्पर धावून येणारा आणि आपल्या चेहऱ्यावर क्षणात स्मित आणणारा . कृष्णाचे आयुष्य आपल्याला घडवेल इतके जबरदस्त ग्रहयोग त्याच्या पत्रिकेत आहेत  . प्रभू श्रीराम , माऊलीआणि कृष्ण ह्यांच्या पत्रिकेत अखंड ज्योतिष सामावेल इतक्या त्या गहन आहेत . सामान्य माणसाच्या सीमारेखा जिथे संपतात तिथे संतांच्या पत्रिकांचे अध्ययन सुरु होते म्हंटले तर वावगे ठरू नये. 

कृष्णाने सहस्त्र स्त्रियांचे रक्षण केले पण आज तो आपल्या भेटीला येयील तेव्हा त्याला काय चित्र दिसणार आहे ? त्यानेच निर्माण केलेल्या विश्वात आज स्त्रीच असुरक्षित आहे . आजूबाजूला आज घडणाऱ्या घटना विशेष करून आपल्या भगिनींच्या वर होणारे अत्याचार मन हेलावणारे आहेत .  प्रत्येक स्त्री कधी मोकळा श्वास घेवू शकेल ??कुठे चालली आहे आपली मानसिकता आणि समाज ? ह्या आजच्या काळात त्या कृष्णाला , श्री गणेशाला सुद्धा यावेसे वाटणार नाही इतकी भीषण अवस्था  त्यांच्या भेटीला आहे . ते म्हणतील हेच शिकवले का मी तुम्हाला? असो.

आपले देवाकडील मागणे आणि संतांचे मागणे ह्यात किती फरक आहे बघा . दिसला देव कि माग त्याच्याकडे काहीतरी हि आपली नित्याची सवय  . पण मागून मागून काय मागणार तर भौतिक सुखाची न संपणारी यादी . मुलाचे लग्न होवूदे ..झाले लग्न मग आता नातवंड मागा . संपतच नाही हो आपले. का मागतो आपण ? कधी विचार केला का? खरतर त्याला सगळच माहित आहे कि आणि तो देणारच आहे , कारण तो द्यायलाच बसला आहे. पण आपण त्याच्याकडे न मागताही तो आपल्याला देणार हा विश्वासच हरवून बसलो आहोत आपण ...म्हणून सतत हे दे ते दे करत असतो . 


इतके जबरदस्त नामस्मरण वाढवा , अखंड नामात राहा कि मागायचा विसर पडेल आपल्याला आणि त्या नामस्मरणात इतकी शांतता , समाधान लाभेल जे मागूनही मिळणार नाही . तदपश्चात मागण्यासारखे काही उरणारच नाही . न मागताच सगळे वेळ आली कि आणि आपल्या भाग्याप्रमाणे मिळणारच , अनुभव घेवून पहा .

कृष्णाकडे आज जगण्याचे बळ मागुया आणि जिथे आपण सर्व सुरक्षितपणे वावरू अश्या समाजाची उभारणी करुया , स्त्रियांना सक्षम , खंबीर करुया . रांगोळ्या , स्वयपाक शिका पण आधी मार्शल आर्ट , कराटे शिका. आज स्वतःचे संरक्षण स्वतःच करायचे आहे . स्वतःचे अस्तित्व जपा आणि वृद्धिंगत करा आणि त्यासाठी एकच ढाल हवी ती म्हणजे नामस्मरणाची . रामरक्षा , हनुमान चालीसा , श्रीसूक्त , नामस्मरण ह्याचा अक्षरशः पाऊस पाडा , इतका कि तोच शोधात येयील आपल्याला. कोण बर माझ्या नामात इतका गुंगला आहे हे पाहून परमेश्वर सुद्धा हतबुद्ध होईल. पण करणार होण ? कधी सुरवात करणार आपण ? 

आकाशात एकटक बघा जरा अहो सगळे ग्रहतारे आपल्याच कल्याणासाठी बसले आहेत . गोलोकातील कृष्ण सुद्धा आपल्या बाळ लीला पाहून हसत असावा. विश्वासच नाही आपला , कश्यावरच नाही , ना आपण केलेल्या साधनेवर ना स्वतःवर . मन सैरभैर झाले आहे.  परवा एका मुलाने मला सांगितले मी एक माळ रोज करतो म्हंटले अरे वा छान आणि insta /सोशल मिडीयावर किती वेळ असतोस ? निरुत्तर . अहो सोशल मिडीया पण हवे काळाची गरज आहे ती पण म्हणून एक माळ ? त्याचा वेळ वाढवा , वेळ आहे आपल्याकडे तो कश्यात किती घालवायचे ते गणित कदाचित चुकतेय आपले. 


मग ह्या ज्योतिषाकडून त्या ज्योतिषाकडे आमची वारी सुरु ...कारण नामातील ताकद अनुभवलीच नाही आपण . तितका विश्वासच नाही आपला. नामस्मरण म्हणजे म्हतार्यांचे चाळे, वेळ घालवायचे साधन वाटते आपल्याला . मी माळ घेवू ? काहीतरीच ..अहो मित्र हसतील कि मला . चेष्टेचा विषय बनेल मी . चोरून देवळात जायचे कारण मित्र हसतील , म्हणतील तू IT मधला विद्वान देवळात कसला जातोस , बाहेर या ह्या सगळ्या भ्रमातून , स्वतःला सावरा आणि इतरानाही सावरायला मदत करा . ज्ञानेश्वरी , गीता , श्री गजानन विजय अहो जीवनाचे सार आहे ह्यात . प्रत्येक प्रश्नाचे उत्तर सापडेल ह्यात तुमचे तुम्हालाच ,  ज्ञानाने परिपक्व व्हाल आणि एक समृद्ध जीवन सुद्धा जगाल. 

आज कृष्ण जन्म . त्याने असंख्य लढाया लढल्या , त्यातल्या अनेक आपल्याच माणसांच्या विरोधात . त्याला सगळे शक्य होते पण ..हा पण महत्वाचा आहे. संताना , ज्ञानेश्वरांना किती त्रास झाला. ज्यांनी भिंत चालवली , ज्यांनी बारा वर्ष कोरड्या असलेल्या विहिरीला पाणी आणले त्यांना काय शक्य नव्हते , पण त्यांनी आपल्याला काही शिकवण देण्यासाठी प्रपंचातील दाह सोसला.

आज कृष्णाकडे एकच मागुया.... बाबारे आमचे मागणे थांबव ....तुझ्या शक्तीवरचा आमचा विश्वास द्विगुणीत कर , तू आहेस आणि सतत आमच्यासोबत आहेस ह्याचे अनंत दाखले दिलेस तसेच देत राहा बाबा . 

श्रीकृष्ण समजणे सोपे नाही ...खचितच नाही ...

टीप : कृपया लेख नावासकट शेअर करावा हि विनंती . 


सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230