Tuesday, 15 June 2021

मागणे हे एक आता

 || श्री स्वामी समर्थ ||




अध्यात्माचा मार्ग कितीही खडकाळ असला तरी गुरुकृपेमुळे त्या वाटेवरील काटे मात्र भक्ताला कधीही टोचत नाहीत. प्रत्यक्ष महाराज आपल्या सोबत आहेत हि भावना प्रत्येक भक्ताला आनंदाच्या उत्तुंग शिखरावर नेवून ठेवणारी असते. आपण फक्त शरीराने इथे आहोत आणि मन मात्र आपल्या गुरूंच्या चरणाशी गुंतलेले आहे हि मनाची अवस्था जेव्हा होते तेव्हा काहीच नकोसे वाटू लागते  आणि एक आत्यंतिक प्रेमाची अनुभूती आपण अनुभवू लागतो .  भक्तिरसात इतके आकंठ बुडतो कि कश्याचीच आस राहत नाही. परमेश्वराचे सानिध्य अनुभवणे  ह्यालाही त्यांची कृपा आणि आपले पूर्व संचित लागते ह्यात दुमत नसावे.

गुरूंच्या पदी असलेल्या आपल्या निष्ठा आणि त्यांच्याप्रतीचा भाव हा डोळ्यातील अश्रूंच्या रुपात जेव्हा महाराजांच्या चरणावर वाहू लागतो तेव्हा आत्यंतिक समाधानाने प्रसन्न झालेले गुरुही भक्ताला सांगतात ...माग तुला काय मागायचे आहे ते.

एकेकाळी महाराजांच्या समोर मागण्यांची याचना करणारा भक्त आज कात टाकल्याप्रमाणे बदललेला असतो . प्रापंचिक यातना ,समस्या ह्यांनी गलीतमात्र झालेला भक्त गुरुसेवेत दाखल होतो आणि त्यांना विनवणी करू लागतो कि मला ह्या सर्व त्रासांपासून मुक्ती द्या. म्हंटलेच आहे ना कि भक्तिविना प्रचीती  नाही आणि प्रचीती  वीना भक्ती नाही. नामस्मरणाची गोडी वाढू लागते तसे प्रापंचिक आसक्ती कमी होऊ लागते. महाराजांच्या चरणाशी एकरूप व्हावे इतकच वाटू लागते . मोह मायेचे वेष्टण दूर होऊ लागते आणि समाधी अवस्थेकडे मन प्रयाण करते. मागणे दूरच राहिले  काय स्वतःचे अस्तित्व सुद्धा विसरून गेलेला असतो.

मनाची शांतता आणि उच्च अध्यात्मिक अनुभूती अनुभवणाऱ्या ह्या मनाला गुरु दर्शनाची आस लागते .गुरु कृपेसाठी मन क्षणोक्षणी तळमळत राहते आणि आनंदाने हर्षभरित झालेला भक्त आर्जव करू लागतो ....

प्रसाद हा मज द्यावा देवा, प्रसाद हा मज द्यावा देवा

सहवास तुझाची घडावा देवा, प्रसाद हा मज द्यावा...

परमेश्वरा तुझ्या सहवासात मी तृप्त आहे , समाधानाची अवीट गोडी चाखत आहे म्हणूनच हा  तुझा सहवास मला अखेरच्या क्षणापर्यंत लाभावा.  हाच प्रसादरूपी आशीर्वाद मजला द्यावा ...

निशिदिनी तव मी नाम स्मरावे, वियोग ना तव व्हावा देवा

प्रसाद हा मज द्यावा देवा, प्रसाद हा मज द्यावा देवा...||१||

परमेश्वरा प्रत्येक क्षण मी तुझ्याच नामस्मरणात आकंठ बुडावे कारण  तुझे अस्तित्व नामाशिवाय वेगळे नाहीच  ,  तुझा वियोग हि कल्पना सुद्धा मला सहन होणार नाही .

हरिभजनामृत निशिदिनी पाजुनी, जन्म मृत्यु चुकवावा देवा

प्रसाद हा मज द्यावा देवा, प्रसाद हा मज द्यावा देवा...||२||

तुझ्या ह्या भक्तीचा रस नित्य सेवन करण्याचे सौभाग्य मला लाभूदे आणि त्या योगे जन्म मृत्यू च्या ह्या फेर्यातून हे परमेश्वरा तू माझी सुटका कर .

ह्र्दय मंदिरी तुवा बैसवूनी, ज्ञानयोग शिकवावा देवा

प्रसाद हा मज द्यावा देवा, प्रसाद हा मज द्यावा देवा...||३||

माझ्या हृदयातील तुझे स्थान हे अढळ आहे ,ज्ञान ग्रहण करण्याचा हा योग माझ्या आयुष्यात पुन्हापुन्हा यावा , ते सौभाग्य मला लाभावे हेच मागणे आहे.

आत्मसुखाची हीच विनंती , विसर तुझा न पडावा देवा

प्रसाद हा मज द्यावा देवा, प्रसाद हा मज द्यावा देवा..||४||

तुझी सेवा करण्यातच माझ्या आयुष्याची अखेर व्हावी  .कुठल्याही क्षणी मला तुझा  विसर पडू नये इतकीच हात जोडून विनंती आहे. 

गुरुपदी लीन झालेला भक्त महाराजांकडे दुसरे काय मागणार ? एकच मागणे आहे .... तुमची सेवा करण्याचे भाग्य मला जन्मोजन्मी मिळूदे. किती मागायचे आणि कायकाय मागायचे ...भरून पावलो कि..आता तर द्यायची वेळ आली .अतीव समाधानाचा हा क्षण आयुष्य एका वेगळ्याच उंचीवर घेवून जातो.

अस्मिता

#अंतर्नाद #स्वामीसमर्थ#स्वामीलीला#भक्ती#प्रसाद#गुरुसहवास#मंदिर#सेवाभाव#जन्मोजमी


Saturday, 12 June 2021

मानसपूजा

|| श्री स्वामी समर्थ ||


मानसपूजा हि आपल्या गुरूच्या प्रती उत्कट होणारी अभिव्यक्ती आहे. मानस पूजा आपल्याला आपल्या आराध्याच्या , इष्ट देवतेच्या अत्यंत  समीप  घेवून जाणारी साधना आहे , त्यामुळे त्याला अनन्य साधारण असे महत्व आहे.

मानसपूजा करणारा भक्त हा महाराजांच्या प्रत्येक क्षणी जवळच असतो किबहुना त्याच विश्वात तो रममाण होतो.  मानसपूजा हा पारमार्थिक सेवेतील उच्च बिंदू म्हंटला तर वावगे ठरू नये. 

संसारिक जीवन जगताना , अनेक लढाया लढताना थकलेला जीव जेव्हा गुरुपदी क्षणभर विश्रांती घेतो तेव्हा त्याच्या मनातील गुरुभक्ती शिगेला  पोहोचते आणि एका अवीट गोडीचे आत्यंतिक समाधान भक्ताला मिळते.

मानसपूजा हा सर्वश्रेष्ठ उपचार आहे आणि एका भक्ताची महाराजांच्या पायाशी असलेल्या असीम भक्तीची परिसीमा सुद्धा. 

प्रत्येक भक्ताला आपले गुरु आपल्याला कधी दर्शन देतील ह्याची नेहमीच आस असते किबहुना तो त्याचा हट्ट असतो. महाराज आपल्या लाडक्या भक्तांना दर्शन देतात ते मानसपूजेत .

आज आपण सर्वच दडपणाखाली आहोत . जीवनात एक अनिश्चितता आहे.  मानसपूजेच्या माध्यमातून  महाराजांशी अनुसंधान साधता यावे आणि जीवनात विश्वास , संयम आणि सकारात्मकता ह्याचे बीज पुनश्च पेरले जावे म्हणून मानसपूजा महत्वाची आहे. 

मनातील विचारांवर सुद्धा महाराजांचेच अधिराज्य असते . त्यांच्या कृपेने आणि इच्छेने आपल्या जमेल तशी मानसपूजा नक्की करावी ह्यासाठी हा लेखनप्रपंच.

श्री स्वामी समर्थ 

अस्मिता

antarnad18@gmail.com


Wednesday, 9 June 2021

सार्थक

 ||श्री स्वामी समर्थ ||


आज गुरुवार आणि शनी जयंती असा योग आहे. शनी आणि गुरु हे ग्रहमालीकेतील बलाढ्य ग्रह आहेत. इतर ग्रहांपेक्षाही ह्या दोघांचे आपल्या जीवनात अनन्य साधारण महत्व आहे. ज्ञानाचा महासागर म्हणजे गुरु , त्याच्याकडे संचय आहे. पण आपण चांगल्या गोष्टींचा संचय केला तरच फायदा अन्यथा सर्व व्यर्थ आहे. गुरूंचे आपल्या जीवनातील महत्व अबाधित आहे. गुरु ज्ञानप्राप्ती करून देयील तर शनी सचोटी , कष्टसाध्य आयुष्य देयील. शनी परीक्षेशिवाय काहीच देत नाही .प्रत्येक गोष्टीत विलंब करणारा हा शनी देयील ते कायमस्वरूपी पण त्याची किंमत समजल्याशिवाय नाही ,कारण दान हे सत्पात्रीच असले पाहिजे .जीवनातील भोग भोगताना कुठेतरी थांबायला हवे ,आत्मपरीक्षण करायला हवे आणि अध्यात्म मार्गाची कास धरायला हवी हे सांगणारा शनी आहे  . शनी हा शिस्तप्रिय , कायद्याने चालणारा आणि तुमच्या कर्माची फळे देणारा आहे. त्यामुळे जसे तुमचे कर्म तसे फळ. तुम्ही वाईट कर्म केलेत तर शनी वही पेन घेवून बसलाच आहे.

आपण सर्वांनी शनीला अगदी व्हिलन केला आहे. पण खरतर त्याच्या सारख्या क्षमतेचा  दुसरा ग्रह नाही. तो दाता आहे आणि द्यायला लागला तर तो गुरूलाही मागे टाकेल असा आहे. अष्टम स्थानातील शनी आयुष्य वृद्धी करतो ,असे असेल तर तो दिलेला वेळ सत्कारणी लावणे हेही आपल्याच हाती नाही का.

शनीचा जप , पोथी पुराणे काहीही करू नका पण त्याच्या तत्वाने वागा  तर आपले कल्याण होयील हे निर्विवाद सत्य आहे. त्याने घालून दिलेल्या  लक्ष्मण रेषांचे पालन करा , शनीला काय आवडते तर लीनता , नम्रता . चतुर्थ श्रेणीच्या लोकांची सेवा करा . हा सेवाभाव आयुष्यातील सर्वांप्रती विशेषतः वयस्कर लोकांसाठी मनी असला पाहिजे . कुणालाही कमी लेखू नका आणि आपल्या श्रीमंतीच्या बढाया तर अजिबात नको. शिक्षण , पैसा , रूप ,ऐश्वर्य क्षणात काढून रावाचा रंक करणाऱ्या शनिदेवांचे अस्तित्व आपल्या आतच आहेत ह्याचे भान ठेवा . आपल्या पत्रिकेत निचीचा किंवा उच्चीचा शनी का आहे ह्याचा विचार करा . ग्रह असेच येवून बसले नाहीत आपल्या पत्रिकेत तर त्याची नाळ आपल्या  गत जन्माशी आहे नक्कीच आहे. अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणारे आपण जरा काही झाले कि ताठ मान होते आपली. क्षणिक यशाने अहंकाराचा वारा लागतो आपल्याला आणि तोच अधोगती करतो.  आपल्या शरीरातून आत्मा निघून गेल्यावर आपल्याला नावाने सुद्धा हाक मारली जात नाही  कारण आपले अस्तित्वच संपते. आपल्या शरीराला “ बॉडी आली का” असे संबोधले जाते. श्वास असणे आणि नसणे ह्यात जीवन मृत्यू इतकेच अंतर आहे.  ह्या अखंड ब्रम्हांडात धुळी कणा इतकेही महत्व नाही आपल्याला. ना पाऊस पाडू शकत ना थांबवू शकत , मानवाने इतकी प्रगती केली अगदी दुसर्या ग्रहापर्यंत गेला पण त्याला आजही रक्त तयार करता येत नाही. एखाद्याला जगवता येत नाही . जन्म मृत्यू काहीच आपल्या हातात नाही .देवाने त्याचे सगळेच पत्ते आपल्याला दिले नाहीत तर त्याच्याही कडे काही ठेवले आहेत म्हणून आपल्याला त्याची किंमत आहे. नाहीतर तुमच्या घरात माझा आणि माझ्या घरात तुमचा फोटो लागला असता. आयुष्य जगताना त्याचे भान ठेवले पाहिजे . शेवटी दोन हस्तक आणि एक मस्तक आपल्याला त्यालाच जोडायचे आहेत हे सत्य आहे.

आज शनी जयंती आहे. शनीच्या चौकटीत , त्याच्या राजमार्गाने जाताना त्याला अभिप्रेत असणार्या गोष्टी केल्या तर जीवन सुसह्य होयील. म्हणजे करायचे तरी काय ? तर स्वतःभोवती आरत्या ओवाळणे बंद करा .भाऊबंदकी , कुटील नीती , राजकारण ,व्यसने , पैशाचा लोभ .२४ तास मी मी मी मी हे केले मी ते केले मी घरासाठी इतके केले ...संपतच नाही आपले..जसे काही अखंड  विश्वाचा कारभार आपल्यामुळेच आहे ..मी ला दूर करा आणि “ त्यांनी करून घेतले ”  हे शब्द ओठात रुजवायचा प्रयत्न करा . फुकटचा किंवा दुसर्याचे ओरबाडून घेतलेला पैसा कधीच लाभत नाही. आपण कष्ट केलेलाच पैसा आपल्याला लाभणार आणि सुखाची शांत झोप सुद्धा देणार आहे .आई वडिलांच्या वारसाहक्कात जसा  मुलांचा वाटा असतो तसा त्यांच्या पापपुण्यात सुद्धा . आईवडिलांच्या जीवावर किती काळ राहणार ?   आपले स्वतःचे विश्व कधी निर्माण करणार ?

म्हणूनच शनी पत्रिकेत दशम स्थानातच अधिराज्य करतो . तिथे आपण आपले गुडघे बघतो . उत्तम कर्म केलेत तर नीट गुडघ्यावर उभे राहता येयील आणि समोर सुख स्थानातील शांत झोप मिळेल आणि आयुष्यातील लाभ निर्भेळ आनंद देतील.

शेवटी आपण कोण हो ? करता करवता तोच आहे. शनीला अहंकार अजिबात आवडत नाही आणि हा “ मी “ आपल्याला अहंकाराची द्वारे खुली करून देतो. त्याची कवाडे आधी कायमची बंद झाली पाहिजेत .कुणाला लुबाडू नका , खोटे तर नकोच ,आयुष्य खरेपणाने कायद्याने जगा आणि अहंकाराला तिलांजली द्या.  ताठपणा सोडून लव्हाळ्या सारखे झालात तर जीवन आनंदमय होयील हे नक्की. जो नम्र आहे,लीन आहे  तो जगावर राज्य करेल .

शनी हा आपल्या कर्मांचा आरसा आपल्यासमोर धरतो आणि त्याप्रमाणे फळ प्रदान करतो. शनी हा  विरक्त आहे पण भावनाशुन्य नाही ,त्यालाही पाझर फुटतो .

चला तर मग आजपासून खरेपणा , सचोटी आणि अखंड कष्ट ह्यानेच आपण आपल्या शनी महाराजांना आपलेसे करण्याचा निर्धार करुया . बसेल हरी तर देयील खाटल्यावरी हे म्हणण्याचे दिवस कधीच नव्हते . स्वामी पण हेच सांगतात कि आळशी माणसाचे तोंड सुद्धा बघू नये.

आपल्या श्वासावर अधिराज्य शनी चे आहे. आपल्याला किती श्वास द्यायचे , आपल्याला   Ventilator वरती कधी न्यायचे आणि घरी कधी आणायचे ,आपल्या श्वासाचे बटन कधी दाबायचे हे सर्व शनी  ठरवतो ,. आपल्या जीवनातील त्याचे स्थान आणि महत्व हे अबाधित आहे पण आपण त्याला पापग्रह म्हणतो त्याच्याशी मैत्री करायला जात नाही ,त्याला काय सांगायचे आहे ते समजून पण घेत नाही आणि शेवटी विनाश ओढवून घेतो . इतके सर्व होवून त्याच्यावरच खापर फोडतो.

आज सिंहालोकन करुया , कसे आणि कुठल्या वाटेवर जीवन जगायचे  त्याचा शांतपणे विचार  करुया आणि ते समृद्ध करण्यासाठी शनी महाराजांनी घालून दिलेल्या कडक नियमांचे पालन करुया ....हाच कर्माचा सिद्धांत आहे आणि तो थोड्या कडक पणे शिकवणाऱ्या ह्या आपल्या शनी आणि गुरु ह्या दोघांसमोर नतमस्तक होवुया .

आज शनी महाराजांसमोर अनन्यभावे ,मनाच्या गाभ्यापासून शरणागत होवुया तरच  जीवनाचे सार्थक होईल .

ह्या लेखांच्या माध्यमातून शनी आणि गुरु ह्या दोन्ही ग्रहांची सेवा मला अखेरच्या श्वासापर्यंत करता यावी हीच त्या दोघांच्याही चरणी माझी प्रार्थना वजा विनंती आहे. अनन्यभावे मी ह्या दोघांसमोर नतमस्तक आहे.

ओं शं शनैश्चराय नमः.

श्री स्वामी समर्थ


अस्मिता
antarnad18@gmail.com


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 

.

 

Friday, 4 June 2021

शेवटचा दिस गोड व्हावा

|| श्री स्वामी समर्थ ||


खालील मंत्राचा जप अवश्य करावा .

अनायासेन मरणं  विना दैन्येन जीवनम् |

देहान्ते तव सानिध्यम देहि मे परमेश्वरम ||

भावार्थ :

अनायासेन मरणं  – give me death without pain – परमेश्वरा जेव्हा मला मृत्यू येयील तेव्हा मला कुठलाच त्रास नको होवूदे.

विना दैन्येन जीवनम् – grant me a life where I am not dependent on anyone – परमेश्वरा मला असे जीवन प्रदान कर कि मी कुठल्याच गोष्टीसाठी कुणावरही विसंबून राहायला नको . मला आत्मनिर्भर कर.

देहान्ते तव सानिध्यम – at death I see only you – माझ्या शेवटच्या क्षणी मला तुझे दर्शन होवूदे

देहि मे परमेश्वरम –please grant me these three wishes –  परमेश्वरा माझ्या ह्या इच्छा पूर्ण कर .

जो जन्मला आहे त्याचा मृत्यू अटळ आहे हे माहित असूनही आपण त्या शेवटच्या क्षणाला सामोरे जायला घाबरतो . आपले जसे जीवन आहे तसे ते सोडून जायचे हे आपल्याला मनातून मान्यच नसते . पण ते कधी ना कधी होणारच आहे. आपल्या सर्व आप्त स्वकीयांना  सोडून शेवटचा प्रवास फक्त आपल्यालाच करायचा आहे .  शेवटचा क्षण गोड व्हावा ह्यासाठी आयुष्यभर आपण प्रयत्नशील असले पाहिजे. आपली आजची कर्मे आपला उद्याचा दिवस लिहिणार आहेत . तसेच पुढील जन्मासाठी लागणारी पुण्याची शिदोरी सुद्धा आपल्याला इथून बरोबर  न्यायची आहे, त्याव्यतिरिक्त काहीही न्यायला परवानगी नाही.

ध्यान धारणा , नामस्मरण आपल्याला हळूहळू विरक्तीकडे नेतात आणि म्हणूनच त्याला अनन्य साधारण असे महत्वही आहे. विरक्त होणे म्हणजे भगवी वस्त्रे परिधान करून हिमालयात जाणे असा अर्थ इथे अभीप्रेत नसून प्रपंचात राहून विरक्त राहणे असा आहे. म्हणजे थोडक्यात सगळ्यात असूनही कश्यातच नसणे ,हे ज्याला जमले तो खरच जिंकला.

प्रपंचातून मन काढून घेवून परमार्थाकडे  वळवणे हेच त्यालाही अभिप्रेत आहे आणि म्हणूनच वरील मंत्र म्हणावा जेणेकरून  आपला शेवटचा प्रवास आणि क्षण आनंदात जायील कारण शेवटचा दिस गोड व्हावा ..याजसाठी केला होता अट्टाहास ..हेच अंतिम सत्य आहे.

अस्मिता

antarnad18@gmail.com