Tuesday, 14 July 2020

लहरींचा खेळ

|| श्री स्वामी समर्थ ||




आजकाल आपण सर्वच जण किती सहज मोबाईल वापरतो नं?

जो केवळ लहरींचा खेळ आहे. आपण नंबर फिरवला की त्या नंबरच्या लहरी,बरोबर त्याच माणसाला शोधून काढतात, हे आश्चर्यकारक आहे..तसंच आपण जेव्हा एखाद्या देवीचे,संताचे अथवा देवाचे स्तोत्र किंवा पोथी वाचतो किंवा व्याकुळ होऊन त्या देवाला,देवीला, संकटात प्रार्थना करतो तेंव्हा त्या प्रार्थना रुपी सकारात्मक लहरी बरोबर त्याच देवी /देवापर्यंत पोहचतात आणि ती देवता आशीर्वादात्मक लहरी तुमच्याकडे पाठवते..प्रार्थना लहरी जितक्या तीव्र,तितका आशीर्वाद परिणामकारक असतो.

एखादं वाईट काम,पाप करताना आपलं मन एकाग्र असतं पण तेच बऱ्याचदा पूजा,पोथी वाचन अथवा पुण्य करताना नसतं. म्हणतात नं दारूचा प्रभाव चटकन होतो,पण दुधाचा नाही..पण आपण आपल्या तब्येतीवर त्याच्या होणाऱ्या दीर्घ परिणामांचा विचार करावा..
तसंच आपण जेव्हा देवीकवच किंवा शिवकवच वाचतो,तेंव्हा त्याचे शुभ कवच त्यातल्या सकारात्मक लहरींनी आपल्याभोवती निर्माण होत असते आणि ते आपले रक्षण करते..किंवा एखाद्या आजारी व्यक्तीसाठी, रोग्यासाठी जरी आपण ते वाचले तरी त्या शुभ कवचा मुळे त्या रोग्याचं रक्षण होऊन तो त्या आजारातून बरा होतो.

तसंच काही वेळा आपण कोणाला कठोरपणे बोलतो, त्याचे दोष सांगतो,किंवा अपमान करतो, तेंव्हा त्या व्यक्तीच्या क्रोधा मुळे निर्माण होणाऱ्या नकारात्मक लहरी आपल्या कडे येऊन आपल्याभोवती अशुभ कवच निर्माण करतातच.. त्यामुळे मग आपल्याला अस्वस्थ वाटू लागतं,भूक कमी होते, निरुत्साही वाटू लागतं..

तुम्ही क्रिया सकारात्मक करा तुम्हाला प्रतिक्रिया सकारात्मकच मिळेल..नकारात्मक केलीत तर नकारात्मक च मिळणार..क्रियेला प्रतिक्रिया ही होणारच..कारण लहरीचं जाळं हे सगळीकडे पसरलेलं असतं आणि ते खूपच परिणामकारक असतं.

आपल्या संतांनी यावर बऱ्यापैकी अभ्यास करूनच लोकांनी कसं वागावं,आचार विचार कसे असावेत याबद्दल सांगितले आहे..गुरू बऱ्याचदा दूर अंतरावरूनही आपल्या शिष्याला दीक्षा देतात,किंवा एखादा संदेश पाठवतात आणि शिष्याला तिकडे त्याची तीव्र जाणीव होते, हे बऱ्याचदा घडले आहे.
मोबाईल तर आता आले पण 'विचार लहरीं'द्वारे एकमेकांना संदेश पाठवणे ही शक्ती उपासनेने त्या काळी ही अवगत करता येत होती..
'
साईचारित्रा'त याचा उल्लेख आहे की, श्री वासुदेवानंद सरस्वती यांनी एका व्यक्ती कडे साईबाबांना देण्यास एक श्रीफळ दिले होते..ते ज्या क्षणी त्या शिष्याच्या हातात पडले, त्या क्षणी साईं ना त्याची जाणीव शिर्डी येथे झाली होती की, ही व्यक्ती आपल्या गुरुबंधू ने दिलेले श्रीफळ आणत आहे..

तसेच शेगावत गजानन महाराजांनी देह ठेवताना साईनाथांना,"माझे सर्व शिष्य आता तुम्ही तुमच्या पदरात घ्या", अशी विंनती केली आणि त्या क्षणी शिर्डीत साई अतिशय भावविवश झाले. म्हणाले," माझा भाऊ गेला."

आज ही परगावी राहणाऱ्या मुलाने आईची तीव्र आठवण काढता आईला समजते व ती गलबलते..संकटकाळात गुरुचे स्मरण केल्यास त्या क्षणी आपले संकट टळते..ही त्या सद्गुरूं नी पाठवलेल्या आशीर्वाद रुपी लहरींमुळेच ..

या आणि अशा अनेक घटना बघितल्या,वाचल्या की,'विचार लहरीं'चे संक्रमण होत असते हे नक्की..

म्हणजे 'विचारलहरी' या किती शुभ आणि सकारात्मक हव्यात ..ज्या घरात बसून आपण सतत विचार करतो ते किती सकारात्मक हवेत..घरात एकमेकांशी बोलताना,अगदी स्वतःशीही बोलताना ते किती सकारत्मक हवं, हे लक्षात घ्या..तरचं तुम्ही ब्रम्हांडाची सकारात्मक ऊर्जा स्वतःकडे आकर्षित करू शकाल.. जे तुम्ही बोलाल, ज्या गोष्टींचा आणि जसा विचार कराल, तेच सगळं आकर्षित होईल..त्याच गोष्टी घडतील तुमच्या आयुष्यात आणि तुमच्याच विचारांनी तुमचं भाग्य बनेल..त्यामुळे ते सकारात्मक, चांगले हवे की,नकारात्मक, दुःखी हवे हे फक्त तुम्हीच ठरवू शकता.

मला तर वाटतं सतत वास्तुशात्रानुसार घरात फेर बदल करण्यापेक्षा आणि त्याला नको इतकं महत्व देण्यापेक्षा आपल्या घरात प्रार्थना,उपासना,सतत चांगले विचार,एकमेकांशी सौजन्याने वागणं, कलह टाळणं येवढं जरी केलं तरी बघा किती सकारात्मक ऊर्जा निर्माण होते ते..अशा शांत आणि सकारात्मक लहरी तुमच्या वास्तूत तुम्हीच निर्माण करू शकता.

तेंव्हा असं सकारात्मक वागून,सकारात्मक विचार करून एकदा त्या सकारात्मक ऊर्जेचा अनुभव घ्याच...!

संग्रहित

अस्मिता

लेख आवडल्यास खालील लिंक वरती अभिप्राय नक्की द्या.

antarnad18@gmail.com


लेखाच्या शेजारी आपला Email द्यायला तसेच Follow वरती Click करायला विसरू नका.